दूरदृष्टी
Foresight
दूरदृष्टी हा यशाकडे नेणारा मार्ग आहे. मानवाच्या प्रवासात यश आणि अपयश या दोन्ही गोष्टी अनिवार्य आहेत. मात्र जे लोक प्रत्येक पावलामागे विचार करून, भविष्यकाळाचा अंदाज घेऊन चालतात, त्यांना आयुष्यातील अडचणी कमी आणि संधी जास्त मिळतात. या गुणाला दूरदृष्टी म्हणतात. दूरदृष्टी म्हणजे फक्त भविष्यकाळात काय होईल याचा अंदाज लावणे नव्हे; तर वर्तमानात घेतलेला निर्णय पुढे कसा परिणाम करेल, हे समजून योग्य दिशा निवडणे होय.
इतिहासात बघितले तर सर्व यशस्वी नेते, उद्योजक किंवा शास्त्रज्ञ यांच्याकडे विलक्षण दूरदृष्टी होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्यांचे धोरणात्मक बांधकाम करताना, समुद्रावर नौदल उभारताना केवळ त्या काळाचा विचार केला नव्हता; तर पुढील पिढ्यांनाही सुरक्षितता व स्वराज्य टिकून राहावे याची योजना आखली होती. त्यांची दूरदृष्टीच महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली.
आजच्या आधुनिक युगातही दूरदृष्टीचे महत्त्व कमी झालेले नाही. व्यवसायाच्या जगात जो बाजारातील बदल, ग्राहकांची गरज, तंत्रज्ञानाची प्रगती यांचा वेळीच अंदाज घेतो, तोच टिकतो. रिलायन्स, टाटा, इन्फोसिस यांसारख्या कंपन्या वेळेआधी बदल स्वीकारतात, म्हणूनच त्यांचा विस्तार होत राहतो. शेतकरीसुद्धा जर बदलत्या हवामानाची, बाजारभावाची, तंत्रज्ञानाची दूरदृष्टी ठेवून पिक पद्धतीत सुधारणा करतो, तर त्याला जास्त नफा मिळतो.
दूरदृष्टी विकसित करण्यासाठी काही गुण आवश्यक आहेत. त्यासाठी विचारशीलता : प्रत्येक गोष्टीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याची क्षमता, शिकण्याची तयारी : जगात सतत होणाऱ्या बदलांबद्दल जाणून घेण्याची सवय, अनुभवातून शिकणे : पूर्वीच्या चुका लक्षात ठेवून त्यातून मार्ग शोधणे, धैर्य आणि आत्मविश्वास : दूरदृष्टी असली तरी अंमलबजावणीसाठी धैर्य हवेच.
आपल्या वैयक्तिक आयुष्यातही दूरदृष्टी फार महत्त्वाची आहे. एखाद्या विद्यार्थ्याने अभ्यास करताना फक्त परीक्षेपुरते न वाचता पुढील करिअरच्या दृष्टीने ज्ञान मिळवले, तर तो आयुष्यात जास्त प्रगती करतो. नातेसंबंधातही दूरदृष्टी ठेवणारा व्यक्ती अल्पकालीन राग, मतभेद यांना महत्त्व न देता दीर्घकालीन प्रेम आणि समजूतदारीवर भर देतो.
थोडक्यात सांगायचे झाले तर, दूरदृष्टी म्हणजे केवळ भविष्य पाहण्याची कला नाही; तर वर्तमान योग्य रीतीने घडवण्याची ताकद आहे. जिथे फक्त आजचा विचार करणारे लोक अडचणीत सापडतात, तिथे दूरदृष्टी असलेले लोक संधी पकडून यशाची नवी दारे उघडतात.म्हणूनच आपण प्रत्येकाने स्वतःमध्ये दूरदृष्टी जोपासली पाहिजे. कारण आजची योग्य कृतीच उद्याचे यश घडवते.
दूरदृष्टी
Foresight
आज केलेली काटकसर,
उद्याची श्रीमंती बहाल करते,
जी आजसाठीच खर्चतात,
ती अयशस्वी म्हणूनच वावरते..
उद्याच्या उदात्त्त कार्यासाठी,
ज्यांनी पूर्वी झाडे लावली,
झाडं लावणाऱ्यामुळेच,
आजच्या पिढीला फळं मिळाली...
नुसती दृष्टी उपयोगाची नाही,
यशासाठी दुरदृष्टी हवी,
नुसती पाहणारी नाही तर,
भविष्य पारखणारी दृष्टी नवी...
आजच्या दुखण्याकडे दुर्लक्ष,
उद्याच्या आजाराला निमंत्रण,
दूरच्या संकटाकडे लक्ष द्यावे,
त्यावर असावे तुमचे नियंत्रण...
© दीपक केदू अहिरे
नाशिक
www.ahiredeepak.blogspot.com



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा