भाजीपाला निर्जलीकरण प्रक्रिया उद्योग | Vegetable Dehydration Processing Industry मार्गदर्शक
भाज्या वाळवून ठेवणे हे फार पूर्वीपासून सर्वांच्या परिचयाचे आहे. ज्याप्रमाणे वस्तू किंवा अन्नपदार्थ मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात तेव्हा त्याची साठवणूक केली जाते. या अन्नपदार्थाचा पुढे जेव्हा ते मिळत नाहीत तेव्हा उपयोग होतो. भाज्या, फळे वापरून लोणची, जॅम, चटण्या इ. टिकाऊ पदार्थ सर्वांच्या आवडीचे असतात. जेवणाची डावी बाजू सजविण्यास, अचानक आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी अनेक खाद्यपदार्थ उपयुक्त ठरतात. पापड, कुरडया, बटाटा कीस, पापड्या हे सर्वांना परिचयाचे आहेत.
भाज्या हंगामात भरपूर प्रमाणात मिळतात. तुलनेने स्वस्त व ताज्या असतात. म्हणून अशा भाज्या उन्हात वाळवून पुढे उपयोगी ठरतात. भारतातील प्रत्येक प्रांतातून अशी वाळवणे वैविध्यपूर्ण रीतीने तयार करतात. भाज्यांची टंचाई असेल तेव्हा या वाळवलेल्या भाज्यांना भिजवून ताज्या भाजीप्रमाणेच रेसिपी बनवली जाते.
विदर्भात हिवाळ्यात मेथी, पालक, आंबटचुका, चवळी, वांगी, टोमॅटो इ. पीक भरपूर घेतले जाते. या भाज्या वाळवण्यासाठी कडक उन लागते. पालेभाज्या निवडून, वाळवून चुरा करून हवाबंद डब्यात व पिशव्यात ठेवतात. भुरका भाजी हा चवदार भाजीचा प्रकार करतांना फोडणीत तिखट, आले- लसूण- मिरची पेस्ट, कांदा इ. परतून भाजीची वाळलेली पूड व मीठ घालून आवडीनुसार दही, लिंबू, चिंच इ. घालून पाणी घातले जाते. व एक चविष्ट भाजी पटकन तयार होते.
युद्धामध्ये सैन्याला नियमित पुरवठा करता यावा म्हणून बटाटे, गाजर, वाटाणे आणि कॉलीफ्लॉवर वगैरे भाज्यांचे निर्जलीकरण सुरू झाले. भाज्या टिकविण्याच्या प्रक्रियांमध्ये डबाबंद करणे, सुकविणे आणि वाळविणे,थंड करणे आणि थंड करून सुकवणे (फ्रीज ड्राईंग) वगैरे प्रक्रिया सरसकट वापरल्या जातात. लोणचे बनविणे किंवा आंबविणे किंवा प्रिझर्वेटीव्ह वापरणे या प्रक्रिया तेवढ्या रुळलेल्या नाहीत. मात्र या सोप्या आणि स्वस्त प्रक्रियांमुळे शेतीत परिवर्तन घडून येईल.

