अथक जिद्दीने घडवलेले यश
श्री. ज्ञानेश्वर गाजरे – Orchid Crop Science
कृषी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकऱ्यांच्या श्रमांमुळे देश अन्नधान्यसंपन्न झाला असला तरी हवामान बदल, कीड-रोगांचा प्रादुर्भाव, वाढते उत्पादन खर्च आणि बाजारातील अस्थिरता यांसारखी अनेक आव्हाने शेतकऱ्यांसमोर उभी आहेत. अशा कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून, वैज्ञानिक दृष्टिकोनातून दर्जेदार कृषी-निविष्ठा उपलब्ध करून देणारे उद्योजक म्हणजे श्री. ज्ञानेश्वर अशोक गाजरे.
बालपण आणि संघर्षमय सुरुवात
१९८६ साली नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील गाजरवाडी या गावात धार्मिक, परंपरावादी आणि कष्टाळू कुटुंबात त्यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती साधी होती. वडील शेती करत असले तरी साधनसामग्री मर्यादित होती. आईच्या संयमी स्वभावातून आणि वारकरी परंपरेतून संस्कारांची शिदोरी मिळाली.
शाळा तीन-चार किलोमीटर अंतरावर होती. सायकल नसल्याने रोज पायी चालत जावे लागे. पावसाळ्यात चिखल, उन्हाळ्यात तडाखेबाज ऊन — पण या कठीण प्रवासानेच त्यांच्या मनात जिद्द आणि आत्मविश्वास रुजवला.
१९९० साली वडिलांनी मोठ्या कष्टातून द्राक्ष लागवड केली. कीड-रोग, उत्पादन वाढवण्याच्या अडचणी, बाजारातील चढ-उतार या सर्वांचा प्रत्यक्ष अनुभव लहान वयातच आला. याच अनुभवातून कृषी-उद्योगाची बीजे त्यांच्या मनात पेरली गेली.
शिक्षणातील प्रावीण्य
गावातील प्राथमिक शिक्षण पूर्ण करून त्यांनी लासलगाव येथे रसायनशास्त्र विषयात पदवी घेतली. पुढे सिन्नर येथे एम.एस्सी (ऑरगॅनिक केमेस्ट्री) मध्ये प्रवेश घेऊन सुवर्णपदक मिळवले. अभ्यासात सातत्य आणि संशोधनाची आवड हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य ठरले.
नोकरीतून उद्योजकतेकडे
पदव्युत्तर शिक्षणानंतर मुंबईतील औषधनिर्मिती क्षेत्रात चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. मात्र संशोधनापासून दूर राहावे लागत असल्याने समाधान नव्हते. “फक्त पगारासाठी नव्हे, तर स्वतःची ओळख निर्माण करायची,” हा निर्धार त्यांनी केला.
२०११ मध्ये सौ. ज्योती यांच्याशी विवाह झाला. त्या देखील एम.एस्सी (ऑरगॅनिक केमेस्ट्री) पदवीधर आहेत. त्यांच्या पाठिंब्यामुळे २०१६ साली त्यांनी धाडसी निर्णय घेत नोकरीचा राजीनामा दिला आणि Orchid Crop Science ची स्थापना केली.
उद्योग उभारणी – एक-एक रुपया जमवून
उद्योग सुरू करताना भांडवलाची मोठी अडचण होती. त्यांनी पगारातून साठवलेली रक्कम आणि भविष्य निर्वाह निधी वापरून सिन्नरच्या औद्योगिक वसाहतीत भाड्याने शेड घेतली. यंत्रसामग्रीसाठी कर्ज घेतले.
सुरुवातीला पी.जी.आर., सेंद्रिय किटकनाशके आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये तयार करण्यावर भर दिला. स्वतः फॉर्म्युलेशन तयार करणे, उत्पादन बॅच तयार करणे आणि शेतात जाऊन चाचण्या घेणे — ही सर्व कामे त्यांनी स्वतः केली.
शेतकऱ्यांचा विश्वास संपादन
द्राक्ष, भेंडी आणि डाळिंब यांसारख्या पिकांमध्ये उत्पादनांचे उत्कृष्ट परिणाम दिसू लागले. पिकांचा आकार, रंग आणि गुणवत्ता सुधारली. शेतकऱ्यांनी या उत्पादनांचा स्वीकार केला.
श्री. गाजरे नेहमी सांगायचे —
“फक्त उत्पादन खरेदी करू नका, त्याचा दर्जा आणि परिणाम तपासा.”
व्यवहारातील पारदर्शकता, वैज्ञानिक मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण संवादामुळे शेतकऱ्यांचा विश्वास जिंकण्यात ते यशस्वी ठरले.
संघर्षमय प्रवास
सुरुवातीच्या काळात दिवसा उत्पादन प्रक्रिया पूर्ण करून रात्री स्वतः माल घेऊन गावोगावी फिरणे, ट्रकमध्ये किंवा शेतात मुक्काम करणे — हा त्यांचा दिनक्रम होता. अवघे दोन कर्मचारी सोबत होते. उत्पादन, व्यवस्थापन आणि विपणन—सर्व जबाबदाऱ्या त्यांनी स्वतः सांभाळल्या.
पण ध्येय स्पष्ट होते —
“शेतकऱ्याला दर्जेदार आणि परिणामकारक उत्पादन द्यायचे.”
व्यावसायिक विस्तार
२०१६ मध्ये सुरू झालेली कंपनी आज महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानसह अनेक राज्यांत कार्यरत आहे.
गुणवत्तेवर तडजोड न करता काम केल्यामुळे कंपनीने अल्पावधीतच कृषीक्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे.
नाविन्यपूर्ण संशोधन
२०२२ मध्ये कंपनीने १००% चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्यांची शृंखला विकसित केली. जलद विरघळणारी आणि खात्रीशीर परिणाम देणारी ही उत्पादने शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय ठरली. तसेच सेंद्रिय आणि पर्यावरणपूरक उत्पादनांवर विशेष भर देण्यात येत आहे.
पर्यावरणपूरक दृष्टिकोन
श्री. गाजरे यांचा ठाम विश्वास आहे —
“शेती टिकवायची असेल तर निसर्गाचा सन्मान करावा लागेल.”
शाश्वत शेतीसाठी पर्यावरणाशी सुसंगत उत्पादने विकसित करण्यावर कंपनीचा विशेष भर आहे.
ऑर्चिड परिवार – यशाचे खरे सूत्र
श्री. गाजरे नेहमी सांगतात —
“कंपनी ही एका व्यक्तीची नसते; ती संपूर्ण टीमच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित असते.”
कर्मचारी, विक्री प्रतिनिधी आणि शेतकरी हे सर्वजण “ऑर्चिड परिवार” या संकल्पनेचा भाग आहेत. या टीमवर्कमुळेच कंपनी आज उंच भरारी घेत आहे.
सन्मान व गौरव
कृषीक्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. हे सर्व पुरस्कार ते आपल्या टीमला, शेतकरी आणि विक्रेत्यांना समर्पित करतात.
प्रेरणादायी संदेश
“आई-वडील हेच आमचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या कष्टांची जाणीव असल्याने शेतकऱ्यांसाठी काहीतरी चांगले करणे हीच खरी जबाबदारी आहे.”
Orchid Crop Science ही केवळ कृषी-निविष्ठा उत्पादक कंपनी नाही, तर ती शेतकऱ्यांच्या विश्वासाची साक्ष आहे. संघर्ष, प्रामाणिकपणा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांच्या बळावर यश कसे मिळवता येते, याचे प्रेरणादायी उदाहरण म्हणजे श्री. ज्ञानेश्वर गाजरे यांची ही यशोगाथा.
© दीपक केदू अहिरे
नाशिक
deepakahire1973@gmail.com
www.ahiredeepak.blogspot.com
******************************************
******************************************
******************************************
******************************************
******************************************
******************************************
******************************************
******************************************
******************************************
******************************************
******************************************