name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (Swa-Kavyankur): Dairy Farming
Dairy Farming लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Dairy Farming लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

डॉ. व्हर्गीस कुरियन : भारतीय दुग्धक्रांतीचे शिल्पकार | Dr. Verghese Kurien – Father of White Revolution

डॉ. व्हर्गीस कुरियन : भारतीय दुग्धक्रांतीचे शिल्पकार
Dr. Verghese Kurien – Father of White Revolution


Doctar varghis kuriyan : Bhartiya dugdhakrantiche shilpkar


  २६ नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय दूध दिन म्हणूनही साजरा केला जातो. जगात राष्ट्रीय दूध दिन १ जून रोजी साजरा करतात परंतु भारताने वेगळा दिवस का निवडला? याचे कारण आहे, २६ नोव्हेंबर हा दिवस केवळ दूधाचा उत्सव नसून दुग्धक्रांती घडवणाऱ्या कुरियन यांच्या योगदानाचा सन्मान आहे. भारतीय कृषी, दुग्धव्यवसाय, सहकार चळवळ आणि ग्रामीण विकासाच्या इतिहासात या दिवसाचे महत्व आहे.हा दिवस राष्ट्रीय दूध दिन म्हणून साजरा केला जातो आणि त्याच दिवशी भारतीय दुग्धक्रांतीचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. व्हर्गीस कुरियन यांची जयंती येते. भारतातील दुग्धउद्योगाच्या संपूर्ण रचनेत एक आमूलाग्र बदल घडवून आणण्याचे श्रेय ज्यांना दिले जाते, ते म्हणजे डॉ. व्हर्गीस कुरियन हे महान व्यक्तिमत्त्व होय. 


    भारतातील ग्रामीण समाजात आर्थिक स्थैर्य, रोजगारनिर्मिती, पोषण, सहकार आणि शेतकऱ्यांचे सशक्तीकरण या सर्व क्षेत्रात अभूतपूर्व क्रांती घडवणारा हा प्रवास सहज नव्हता. शासन, उद्योग, तंत्रज्ञान, सामान्य शेतकरी आणि ग्रामीण महिला यांना एकत्र आणून तयार केलेली ही सामाजिक-आर्थिक चळवळ भारताच्या विकासकथेत एक सोन्याचा अध्याय मानली जाते.


कुरियन यांची प्रारंभीची कारकीर्द : अभियंता ते परिवर्तनकर्ता


        २६ नोव्हेंबर १९२१ रोजी केरळमधील कोळेन्शेरी येथे जन्मलेल्या व्हर्गीस कुरियन यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. फारसा अनुभव नसताना, त्यांची नियुक्ती खेळ (Kaira) जिल्ह्यातील एका सरकारी डेअरी प्रकल्पात झाली. तिथे सुरुवातीला त्यांना फारसे आवडले नाही, काम करण्याची इच्छाही कमी होती. परंतु ग्रामीण भागात शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती, दलालांचे शोषण आणि दुधाला योग्य भाव न मिळण्याची समस्या त्यांना अस्वस्थ करू लागली. ही स्थिती बदलणे आवश्यक आहे, याची जाणीव झाल्यानंतर त्यांनी केवळ एक अभियंता म्हणून नव्हे तर दूरदृष्टी व्यवस्थापक आणि सहकार चळवळीचे प्रवर्तक म्हणून कामाला सुरुवात केली.


अमूलची उभारणी : सहकार तत्त्वावर आधारित क्रांती

    

    १९४० च्या दशकात खेळ जिल्ह्यातील शेतकरी दुधासाठी पूर्णपणे व्यापाऱ्यांवर अवलंबून होते. शेतकऱ्यांना अत्यल्प दर मिळत असताना बाजारात दुधाचे दर जास्त होते. या अन्यायाविरुद्ध उभे ठाकले त्रिभुवनदास पटेल, सरदार वल्लभभाई पटेल आणि नंतर त्यात सहभागी झालेले व्हर्गीस कुरियन. त्यातून स्थापन झाले कैर्‍या डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह मिल्क प्रोड्यूसर्स युनियन लिमिटेड ज्याचे पुढे लोकप्रिय नाव झाले — अमूल.


        अमूलची संकल्पना अत्यंत सोपी पण प्रभावी होती ती म्हणजे दूध संकलन थेट शेतकऱ्यांकडून केले जायचे. सर्व निर्णय प्रक्रिया शेतकऱ्यांच्या हाती होती. नफ्यात शेतकऱ्यांचा थेट सहभाग होता. प्रक्रिया उद्योग, वाहतूक व्यवस्था आणि विपणनाचे एकत्रित नियंत्रण यामुळे शेतकऱ्यांवरचा आर्थिक ताण कमी झाला, स्थिर दर मिळू लागले आणि त्यांचे उत्पन्न वाढू लागले.ग्रामीण भागात या मॉडेलने स्थैर्याची नवीन पायाभरणी केली.


‘अमूल ब्रँड’ : ग्रामीण भारतातून उदयास आलेले जागतिक दर्जाचे मॉडेल


        अमूलच्या यशामागे फक्त दूधसंकलन नव्हे, तर उत्कृष्ट ब्रँड व्यवस्थापन, गुणवत्ता नियंत्रण, आधुनिक तंत्रज्ञान आणि जाहिरात धोरण होते. अमूल गर्ल ही त्यांची विस्तारित ब्रँड ओळख आजही भारतीय जाहिरात इतिहासातील सर्वाधिक यशस्वी मोहिमांमध्ये गणली जाते.डॉ. कुरियन यांचे मत होते कि “ब्रँड मजबूत असेल तर शेतकरी मजबूत होईल.”आणि हे त्यांनी प्रत्यक्षात सिद्ध करून दाखवले.


ऑपरेशन फ्लड : जगातील सर्वात मोठी दुग्धक्रांती


      १९७०च्या दशकात भारतात दूधटंचाई गंभीर स्वरूपात होती. लोकसंख्या वाढत असताना दूधउत्पादनाची प्रणाली अव्यवस्थित होती.या परिस्थितीत भारत सरकार आणि डॉ.कुरियन यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाले ऑपरेशन फ्लड.या प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे देशभर एकसंध दूध साखळी (नॅशनल मिल्क ग्रीड) उभारणे. शेतकरी सहकारी संस्थांचे जाळे वाढवणे. शीतसाखळी, वाहतूक, प्रक्रिया संयंत्रे उभारणे. पावडर मिल्क, टोनड मिल्क आणि इतर उत्पादने तयार करणे. मोठ्या शहरांना स्थिर दरात आणि सतत दूधपुरवठा करणे


      या प्रकल्पाचा परिणाम असा घडला कि भारत दूधटंचाईतून बाहेर पडला आणि ग्रामीण कुटुंबांचे उत्पन्न वाढले. महिलांचा सहभाग वाढला. लाखो जनतेला रोजगार मिळाला. २००० नंतर भारत जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश बनला. या प्रकल्पाची यशस्विता जगभर मान्य झाली. आजही हा प्रकल्प व्यवस्थापन आणि ग्रामीण विकासाचा जागतिक आदर्श मानला जातो.


एनडीडीबी आणि आयआरएमए : संस्थात्मक क्रांती


    डॉ. कुरियन यांना ठाऊक होते की केवळ स्थानिक पातळीवरील सहकारातून दुग्धक्रांती घडू शकत नाही. यासाठी गरज होती देशभरासाठी एक मजबूत संस्थात्मक संरचना उभारण्याची म्हणून एनडीडीबी म्हणजेच नॅशनल डेयरी डेव्हलपमेंट बोर्डची १९६५ मध्ये स्थापन झालेल्या एनडीडीबीच्या माध्यमातून देशभरातील सहकारी संस्था, दूध साखळी आणि प्रक्रिया उद्योग एकत्र आणले गेले.एनडीडीबीने प्रशिक्षण, मार्गदर्शन, प्रकल्प व्यवस्थापन आणि नितीमूल्ये यांचा मजबूत पाया निर्माण केला. दुसरी संस्था आयआरएमएची स्थापना केली.आयआरएमए म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ रूरल मॅनेजमेंट,आनंद संस्था होय. आयआरएमएची स्थापना करून ग्रामीण व्यवस्थापन क्षेत्रातील कुशल नेतृत्व घडवण्याचे कार्य सुरू केले. आज आयआरएमए भारतातील ग्रामीण विकासातील सर्वात प्रतिष्ठित संस्था मानली जाते.


महिला सक्षमीकरणाचे केंद्रबिंदू: दुग्धउद्योग


      डॉ. कुरियन यांच्या संकल्पनेत महिलांचा सहभाग हा दुग्धक्रांतीचा अत्यावश्यक घटक होता. ग्रामीण भागातील अनेक महिला घरातील गायी- म्हशींची जबाबदारी घेत होत्या, परंतु आर्थिक व्यवहारांमध्ये त्यांचा सहभाग कमी होता. दूध संकलन केंद्रे, सहकारी संघाच्या सदस्यता, व्यवस्थापन समित्या— या सर्व ठिकाणी महिलांचा सहभाग वाढवण्यावर त्यांनी भर दिला. त्यामुळे महिलांचे उत्पन्न वाढले. निर्णयक्षमता वाढली. सामाजिक स्थान उंचावले. शिक्षण व आरोग्याविषयी जागृती वाढली. महिला सक्षमीकरणात दुग्धउद्योग हा आजही सर्वाधिक यशस्वी मॉडेल मानला जातो.


व्यवस्थापनशैली


    डॉ. कुरियन यांची व्यवस्थापनशैली अत्यंत स्पष्ट होती.धाडस, पारदर्शकता आणि शेतकऱ्यांवरील अपार प्रेम यामुळे ते राजकीय दबावाला झुकत नसत. निर्णयप्रक्रियेत पारदर्शकता अनिवार्य मानत. तांत्रिक प्रगती आणि व्यवस्थापन सुधारणा यांचे मिश्रण करत शेतकरी हा केंद्रबिंदू आहे त्यांनी हे तत्व न सोडता काम केले. कोणत्याही परिस्थितीत तडजोड न करण्यासाठी प्रसिद्ध होते. ते म्हणत “I do not work for the government. I work for the farmers.” ही त्यांची ओळख ते शेवटपर्यंत जपत राहिले.


      राष्ट्रीय दूध दिन साजरा करण्यासाठी भारताने वेगळा दिवस निवडला -२६ नोव्हेंबर.कारण हा दिवस केवळ दूधाचा उत्सव नसून दुग्धक्रांती घडवणाऱ्या कुरियन यांच्या योगदानाचा सन्मान आहे. या दिवशी देशभर पोषण जनजागृती कार्यक्रम, दुग्धशिबिरे, शेतकरी सन्मान सोहळे, दुग्धजन्य पदार्थांचे प्रदर्शन, शालेय पातळीवरील उपक्रम अशा अनेक उपक्रमांचे आयोजन होते.


पुरस्कार आणि जागतिक मान्यता


         डॉ. कुरियन यांना  अनेक सन्मान प्राप्त झाले त्यांना पद्मश्री (१९६५), पद्मभूषण (१९६६), पद्मविभूषण (१९९९) रॅमन मॅगसेसे पुरस्कार, वर्ल्ड फूड प्राईज, कार्नेगी फाउंडेशन पुरस्कार इ. पुरस्कार मिळाले होते. जागतिक स्तरावर त्यांना “मिल्कमॅन ऑफ इंडिया” म्हणून गौरवण्यात आले.


        ग्रामीण अर्थव्यवस्थेवर कुरियन यांचा दीर्घकालीन प्रभाव दिसून आला. डॉ. कुरियन यांनी फक्त दूध उद्योग बदलला नाही; त्यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेचे संपूर्ण चित्र बदलले.त्यांचे प्रमुख योगदान यामुळे शेतकऱ्यांना नियमित उत्पन्न मिळाले. महिलांचे आर्थिक सशक्तीकरण, ग्रामीण भागात प्रक्रिया उद्योगाची वाढ, कंट्रोल्ड सप्लाय चेन निर्माण झाली. शहरी भागात गुणवत्तापूर्ण दूध उपलब्धता वाढली. सहकार चळवळीचे मजबुतीकरण झाले. देशाच्या पोषण पातळीत सुधारणा झाली. आज भारताचे दूध उत्पादन दरवर्षी वाढतच असून लाखो लोकांना या उद्योगातून रोजगार मिळत आहे.


भारताचा इतिहास बदलणारा चेहरा


    डॉ. व्हर्गीस कुरियन यांचे जीवनकार्य हे भारतातील सर्वात यशस्वी सामाजिक-आर्थिक चळवळींपैकी एक आहे.त्यांनी दाखवून दिले की- सहकार, वैज्ञानिक दृष्टिकोन, पारदर्शकता आणि नेतृत्व यांच्या मिश्रणातून ग्रामीण भारतात चमत्कार घडवता येतो. राष्ट्रीय दूध दिनाच्या निमित्ताने या महामानवाला स्मरण करणे म्हणजे केवळ आदरांजली नव्हे तर भारताच्या प्रगतीचा मार्ग पुन्हा एकदा दृढतेने जाणून घेण्याचा प्रयत्न आहे.

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
https://mr.quora.com/profile/Deepak-Ahire-5?ch=10&oid=1651193170&share=74b6a2ed&srid=hZHxKh&target_type=user
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************


दुग्ध व्यवसायासाठी फायद्याचा मुरघास | Murghas Making & Benefits for Dairy Farming

दुग्ध व्यवसायासाठी फायद्याचा मुरघास | 

Murghas Making & Benefits for Dairy Farming

Dugdh vyavadayasathi fayadyacha murghas

   जनावरांसाठी गहू भुसा, तूर भुसा आणि मुरघास हे तीनही महत्त्वाचे चारा आहेत. यापैकी, मुरघास हा जनावरांसाठी सर्वोत्तम चारा मानला जातो कारण त्यात पौष्टिक घटक जास्त असतात आणि ते वर्षभर उपलब्ध होऊ शकते. गहू आणि तूर भुसा हे जनावरांना खाण्यासाठी योग्य असले तरी ते मुरघासपेक्षा कमी पौष्टिक असतात आणि त्यांची उपलब्धता हंगामात असते.

  

 पावसाळ्यात जेव्हा भरपूर प्रमाणात हिरवे गवत उपलब्ध असते, तेच शास्त्रीय पद्धतीन साठविल्यास त्याचा उन्हाळ्यात हिरवा चारा म्हणून उपयोग करता येतो या चारा माठविण्याच्या पद्धतीस 'मूरघास' म्हणतात. दुभत्या जनावरांना उन्हाळ्यातही हिरवे गवत थोड्या कष्टात उपलब्ध करून देता येईल, अशा या मूरघासविषयी...

  
  मुरघास हा जनावरांसाठी सर्वोत्तम चारा आहे. कारण  हिरवा चारा योग्य प्रकारे साठवून त्यापासून मुरघास बनवला जातो. त्यामुळे त्यात पौष्टिक घटकांचे प्रमाण अधिक असते. मुरघास बनवण्यासाठी योग्य प्रक्रिया आणि जागा लागते. मुरघास हा जनावरांना वर्षभर दिला जाणारा एक पौष्टिक आणि सहज उपलब्ध होणारा चारा आहे. 


  मुरघास हा ज्वारी, बाजरी, मका तसेच लसूण गवत, बरसीम या द्विदल चारा पिकापासून तयार करता येतो. मुरघास कोरड्या चाऱ्याबरोबर एकत्र करून दिल्यास जनावरे आवडीने ती खातात. दुभत्या जनावरांना दररोज १० ते १५ किलो मुरघास खाऊ घालावा.

Dugdh vyavadayasathi fayadyacha murghas

 जर तुम्ही जनावरांसाठी चांगला आणि पौष्टिक चारा शोधत असाल, तर मुरघास हा एक चांगला पर्याय आहे. गहू आणि तूर भुसा हे देखील जनावरांसाठी उपयुक्त आहेत, परंतु ते मुरघासपेक्षा कमी पौष्टिक आणि हंगामात उपलब्ध होणारे असतात.

  सकस हिरव्या चाऱ्याच्या  निर्मितीकडे ज्या प्रमाणात लक्ष द्यायला हवे तेवढे लक्ष सर्वसामान्य शेतकऱ्यांकडून ते दिले जात नाही. त्याच्या बेताच्या अर्थिक परिस्थितीमुळे ते शक्यही होत नाही. त्यामुळे गाई, म्हशी व बकऱ्यांसाठी आवश्यक असलेला हिरवा चारा उपलब्ध होत नाही. ही वस्तुस्थिती आहे. हिरव्या चाऱ्याचे उत्पादन करण्यासाठी साधारणतः बऱ्यापैकी सुपीक जमीन आणि बारमाही पाण्याची उपलब्धतता या दोन गोष्टींची नितांत आवश्यकता आहे. महाराष्ट्रातील शेती बहुतांशी पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे शेतकरी वर्षभर शेतात दुभत्या जनावरांसाठी हिरवा चारा घेऊ शकत नाही.

     स्थानिक हिरवे गवत जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत मुबलक प्रमाणात मिळते. त्यामुळे या कालावधीत चाराटंचाईचा प्रश्नच येत नाही. परंतु त्या पुढील कालावधीत हिरवा चारा मुबलक प्रमाणात मिळणे कठीण असते. त्यामुळे दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांची चांगलीच अडचण होते. हिरव्या चाऱ्याच्या अभावी जनावरांचे कुपोषण होऊन त्यांच्या आरोग्यावरही त्याचा अनिष्ट परिणाम होतो.

      डोंगराळ भाग व इतर पडीक जमिनीत बऱ्याच प्रमाणात स्थानिक हिरवे गवत उपलब्ध होऊ शकते. जुलै ते ऑक्टोबर या महिन्यांत खरिपाची चाऱ्याची पिके उत्पादनक्षम असतात. पावसाळी हवा असल्याने नैसर्गिकपणे वैरण वाळवता येत नाही. अशा वेळी हिरव्या गवताचे मूरघासात रूपांतर करणे हा सर्वांत चांगला व शास्त्रीय मार्ग होय. ज्या ठिकाणी हवा आणि पाणी याचा शिरकाव होऊ शकणार नाही अशा ठिकाणी साठविलेल्या हिरव्या चाऱ्यास 'मूरघास' म्हणतात.

मूरघासासाठी खड्डा
   
 शेतकऱ्याची अर्थिक परिस्थिती, हवामान व सोयीस्कर दृष्टिकोनातून मूरघास खड्ड्यांचा मूरघास तयार करण्यासाठी जमिनीमध्ये गोल विहिरीसारखे किवा चौकोनी खड्डे तयार करावे लागतात. मूरघासाचा खड्डा तयार झाल्यावर त्याच्या आतील सर्व बाजूंनी त्यास सिमेंटचे प्लॅस्टर करून घ्यावे. यामुळे जमिनीतून झिरपणारे पाणी खड्ड्यात येणार नाही. सिमेंट प्लॅस्टर करणे शक्य नसल्यास खड्डा शेणाने किंवा चिखलाने आतून सारवून घ्यावा. अशा प्रकारच्या खड्ड्यात प्लॅस्टिक कापड आच्छादून खड्डा भरता येतो. 

'मुरघास' कसे तयार करावे?

   महाराष्ट्रात साधारणपणे जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत हिरवे गवत मुबलक प्रमाणात असते. मूरघास तयार करण्यासाठी चारा फुलोऱ्यावर असताना कापावा. कापल्यानंतर थोडा वेळ वाळू द्यावा. चिंब भिजलेला चारा खड्ड्यात भरू नये. चाऱ्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्यास मूरघास खराब होतो. गवताची कापणी केल्यानंतर यंत्राने किंवा विळा अथवा कोयत्याच्या साह्याने त्याचे तुकडे करून घ्यावेत. ते थोडा वेळ वाळवावे.

   मूरघासाची चव सुधारण्यासाठी किंवा अन्नद्रव्यांचे मुख्यतः प्रथिनांचे प्रमाण वाढविण्यासाठी अनुक्रमे २ टक्के गूळ (कमी प्रतीचा) अथवा उसाची मळी, १ टक्का मीठ खडे (जाड मीठ) ०.५ टक्के यूरिया घ्यावा. त्याचे एका टाकीत मिश्रण करावे. साधारणपणे १०० किलो हिरव्या गवताकरिता ३५ ते ४० लि. पाणी पुरेसे होते. हे प्रमाण गवताच्या आर्द्रतेवर अवलंबून असते. खड्डा भरताना खड्ड्यामध्ये आच्छादलेल्या प्लॅस्टिक कापडावर बारीक तुकडे केलेल्या सुमारे १०० किलो गवताचा किंवा त्या पटीत थर पसरून घ्यावा व त्यावर वरीलप्रमाणे तयार केलेले मिश्रण (गूळ, मीठ व यूरियाचे) झारीने किवा हाताने शिंपडावे. अशा प्रकारे गवताचे थरावर थर रचून व्यवस्थितरीत्या पायाने घट्ट दाबावे, जेणेकरून आत हवा राहू शकणार नाही. १ घनफूट खड्ड्यामध्ये साधारणपणे १२ ते १५ किलो हिरवे गवत मावू शकते. चारा पायाने दाबताना खड्ड्याच्या भिंतीलगत विशेष काळजीपूर्वक दाबावा, कारण दोन थरांमधील हवा संपूर्णपणे निघून जाणे आवश्यक असते. या पद्धतीने खड्डा पूर्ण भरावा

      खड्डा भरल्यानंतर हिरव्या गवताचे थर जमिनीच्या पृष्ठभागापासून ६० ते १० से. मी. (२ ते ३ फूट) उंचीपर्यंत रचावेत. त्यानंतर सर्वात वरच्या थरावर वाळलेले गवत, भाराचा पेंढा टाकावा. शक्य असल्यास त्यावर जाड प्लॅस्टिकचे आवरण घालावे. अशा प्रकारे खड्डा सर्व बाजूनी झाकून घ्यावा. यावर साधारणतः १५ ते २२.५ से. मी. जाडीचा चिखलाचा थर देऊन खड्डा चोहोबाजूंनी चांगला लिंपूनव शेणाने सारवून घ्यावा. खड्डा लिंपताना त्यास गोलघुमटासारखा आकार द्यावा. असे केल्याने पावसाचे पाणी त्यावर पडल्यास चटकन खाली ओघळून जाईल. लिंपलेल्या खड्ड्याकडे सतत लक्ष द्यावे. कारण लिंपलेल्या चिखलाच्या थरामध्ये भेगा पडतात. अशा भेगांमधून हवा व पाणी खड्ड्यात जाण्याचा संभव असतो. त्यामुळे आतील मूरघास खराब होतो. अशा भेगा दिसल्यास त्या ताबडतोब लिंपून व शेणाने सारवून घ्याव्यात.

मूरघास खड्डा केव्हा उघडावा? 
    
  साधारणपणे खड्डा भरल्यानंतर दोन ते तीन महिन्यांनी मूरघास तयार होतो. उन्हाळ्यात किंवा हिरव्या चाऱ्याची टंचाई असेल तेव्हा खड्डा उघडावा मूरघास काढताना एक थर पूर्ण काढून झाल्यावर दूसरा थर काढावा. खड्डा उघडल्यावर पाऊस आल्यास त्यावर ताबडतोब जाड प्लास्टिकचे आवरण घालावे. मुरघासचा रंग पिवळसर हिरवा असावा. जर खड्डा भरण्यापूर्वी चाऱ्यात पाण्याचा अंश जास्त असेल तर गडद हिरवा किंवा काळसर रंग आढळून येईल तसेच जर चाऱ्यात पाण्याचा अंश अपेक्षेपेक्षा जास्त असेल तर गडद हिरवा किंवा काळसर रंग आढळून येईल. तसेच जर चाऱ्यात पाण्याचा अंश अपेक्षेपेक्षा कमी असेल किंवा मूरघासाच्या खड्‌याचे तोंड चांगल्याप्रकारे बंद केले नसेल तर तांबूस, करपलेला, काळसर असा मुरघास तयार होईल. यास हलक्या प्रतीचा मूरघास म्हणतात. उत्तम प्रतीच्या घासास आंबटगोड वास येतो. चांगल्या मूरघासात बुरशी वाढलेली नसते. बुरशीजन्य मूरघासाचा थर आढळल्यास तो पूर्णपणे काढून टाकावा व खालील चांगला थर खाद्यासाठी वापरावा. साधारणपणे तयार केलेल्या मूरघासासाठी जास्तीत जास्त ५ ते ७ टक्के वाया जाऊन उरलेले उत्तम प्रतीचे मूरघास उपलब्ध होऊ शकते.

Dugdh vyavadayasathi fayadyacha murghas

मूरघास खाऊ घालण्याचे प्रमाण 
 मूरघास सर्व प्रकारच्या जनावरांना खाऊ घालता येतो. दररोज १० ते १२ लिटर दूध देणाऱ्या गायींना १५ किलो मूरघास खाऊ घालावे व सर्वसाधारणपणे इतर जनावरास प्रत्येकी ८ ते १० किलो मूरघास द्यावे. दुभत्या जनावरांना धारा काढण्यापूर्वी मूरघास खाऊ घालू नये. त्यामुळे दुधास वास येण्याची शक्यता असते. मूरघास केल्यामुळे हिरव्या चाऱ्यातील जास्तीत जास्त अन्नद्रव्यांची साठवण होते. दुग्ध व्यवसायांमध्ये मूरघासाचा हिरवा चारा म्हणून उपयोग केल्यास दुभत्या जनावरांना उन्हाळ्यात पौष्टिक हिरवा चारा खाऊ घालता येतो.

       कमी पावसाच्या भागात अथवा जेथे विहिरींना कमी पाणी असते अशा भागातील शेतकऱ्यांनी व दुग्ध व्यावसायिकांनी खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या हिरव्या चाऱ्यापासून 'मूरघास' तयार केल्यास त्यांचा दुग्ध व्यवसाय निश्चितच फायद्याचा होईल. दूध उत्पादन व्यवसायाच्या विकासासाठी सकस हिरव्या चाऱ्याची मुबलक उपलब्धतता आवश्यक असते. 'मूरघास' तयार करून शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसाय अधिकाधिक वाढवावा. 

 गहू भुसा (Wheat husk)

Dugdha vyavadayasathi fayadyacha murghas

  गहू पिकाच्या काढणीनंतर उरलेला भाग म्हणजे गहू भुसा होय. हा चारा सहज उपलब्ध होतो आणि जनावरांना आवडतो. गहू भुसा हा इतर चाऱ्यासोबत किंवा वैरण म्हणून वापरला जातो. गहू भुसा हा तसा पोषक नसतो. त्यात प्रथिने आणि जीवनसत्त्वांचे प्रमाण कमी असते. त्यामुळे जनावरांना फक्त गहू भुसा खाऊ घातल्यास त्यांच्या आरोग्यावर आणि दूध उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. म्हणून हा चारा इतर चाऱ्यासोबत खाऊ घालावा. 

 तूर भुसा (Tur husk)

Dugdha vyavadayasathi fayadyacha murghas

  तूर भुसा हा गहू भुसापेक्षा थोडा अधिक पौष्टिक असतो. त्यात प्रथिने आणि फायबरचे प्रमाण थोडे जास्त असते. तूर भुसा देखील मुरघासपेक्षा तुलनेने कमी पौष्टिक असतो आणि तो हंगामातच उपलब्ध होतो. तूर भुसा हा गहू भुसाप्रमाणे इतर चाऱ्यासोबत किंवा वैरण म्हणून वापरला जातो. 

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

******************************************
******************************************
******************************************
******************************************

******************************************
******************************************
Koo :
******************************************
******************************************
******************************************
@DeepakA86854129
******************************************

******************************************

करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न ! Sada Karvanda: A Revolution in Sustainable Fruit Farming by Sadashiv Adkine

  करवंदाच्या शेतीतून एकरी १.५ लाखांचे उत्पन्न! कुंपणासाठी लावली झाडे अन् आता देशभर होतेय विक्री; वाचा सदाशिव अडकिणे यांची यशोगाथा. Sada Karv...