नारोळ्या ते केळदोडी: माझ्या गावच्या रसाळ आठवणीMemories of Gavran Mangoes
माझं गाव आनंदपूर! तसं तर गाव खूप गोष्टींसाठी प्रसिद्ध असेल, पण माझ्यासाठी आनंदपूरची ओळख म्हणजे तिथले नामांकित आंबे. आमच्या गावात पूर्वी 'लांघी' नावाचा एक भाग होता, जिथे दाट आमराई असायची. त्या काळच्या आंब्यांची चव आणि रूप खरोखरच 'एक से एक बढकर' असे. आजच्या चकचकीत बाजारात मिळणाऱ्या आंब्यांपेक्षा त्यांची सर कशालाच येणार नाही.
| आमची आगळीवेगळी 'आंबा-नामावली'
आमच्या आजोबांच्या आणि वडिलांच्या काळात आनंदपूरचे आणि शेजारच्या चुडापूरचे आंबे घेण्यासाठी लांबून व्यापारी येत असत. तेव्हा आंब्याला फक्त 'आंबा' म्हणून ओळखलं जायचं नाही, तर त्यांच्या आकारानुसार आणि गुणानुसार त्यांना विशिष्ट नावे होतीः
नारोळ्या, घोट्या, सुपाऱ्या, केळदोडी, झावळ्या, लोणच्या, खारोट्या, दोडी यातल्या 'नारोळ्या'चे नाव तर तो नारळासारखा दिसायचा म्हणून पडले होते. ही नामावली खूप मोठी आहे, जी आजच्या पिढीला ऐकून नवल वाटेल.
| बालपण आणि आंब्याचा घमघमाट
लहानपणीच्या आठवणींमध्ये आंब्याचा वास आजही ताजा आहे. घरातल्या खोलीत आंब्याच्या अडीचा जो घमघमाट यायचा, तोच भूक चाळवायला पुरेसा असे. झाडावरून उतरवलेले सर्व आंबे एकत्र असायचे. एखादा आंबा चाखून पाहिला आणि तो थोडा आंबट लागला की तो लगेच टोपलीत जायचा. मग सुरू व्हायची शोधयात्रा 'मधाळ आणि गोड आंबा कोणत्या टापूत मिळेल?' हे शोधण्यातलं सुख काही वेगळंच होतं.
एक ऐतिहासिक आठवणः
जेव्हा आमच्या गावचे डी. जी. पाटील (ज्यांनी नाशिकमध्ये डीजीपी नगर वसवले आणि जे 'बागलाणची वाघीण' म्हणून ओळखले जात) जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले, तेव्हा त्यांनी संपूर्ण गावाला पुरणपोळी आणि आमरसाचे जेवण दिले होते. विशेष म्हणजे, त्यासाठी वापरलेले सर्व आंबे आमच्या गावचेच अस्सल गावरान आंबे होते. त्यांची ती मधुर चव आजही लोकांच्या जिभेवर रेंगाळतेय.
शाक, पेम आणि अस्सल गावरान चव
नैसर्गिक पद्धतीने झाडावर पिकलेल्या आंब्याला आम्ही 'शाक' म्हणायचो. हा शाक खाण्याचा आनंद शब्दांच्या पलीकडला आहे. आंबे पिकवण्यासाठी ते पाचटात घालून ठेवले जायचे. कधी कधी आम्ही मित्रमंडळी आंब्याचे 'पेम' लपवून ठेवायचो आणि चार-पाच दिवसांनी ते आंबे पिकल्यावर चोरून खायचो.
"तुम्ही गावरान आंबे पहिले, आम्ही आता हायब्रीड कलमी बघतो..."
नुकतंच आखाजीच्या (अक्षय्यतृतीया) निमित्ताने आंबे आणले होते. रस करण्यासाठी मिक्सरमध्ये तीन वेळा फिरवावे लागले, तेव्हा कुठे तो तयार झाला. आमच्या पिढीने गावठी आंब्याचा जो नैसर्गिक रस चाखलाय, त्याची चव या हायब्रीड आंब्यांना कधीच येणार नाही. हेच आंबे एकेकाळी सातासमुद्रापारही गेले होते, याचा सार्थ अभिमान वाटतो.
एक खंत आणि साद...
आज मन खंतावते जेव्हा लांघीची ती दाट आमराई विरळ होताना पाहतो. अनेक नामांकित आंबे आता नामशेष झाले आहेत. आपला हा वारसा आपण जपला पाहिजे. फळांच्या राजाने माझ्या मनावर जे गारूड केलंय, तेच प्रेम पुढच्या पिढीपर्यंत पोहोचायला हवं. आजही माझं मन त्या आंब्याच्या डहाळीवर बसून बालपणाच्या आठवणीत रमतंय.
तुमच्याकडे आनंदपूरच्या किंवा तुमच्या गावच्या आंब्यांच्या काही आठवणी असल्यास खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा!
![]() |
| आनंदपूर गावातील चारूदत्तराजे यांची उस्फुर्त प्रतिक्रिया |
नाशिक
deepakahire1973@gmail.com




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा