name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): August 2025

माऊली गांडूळ खत व बीज उत्पादन प्रकल्प : सेंद्रिय शेतीकडे वाटचाल I Mauli Vermicompost and Seed Production Project: Moving towards organic farming

माऊली गांडूळ खत व बीज उत्पादन प्रकल्प : सेंद्रिय शेतीकडे वाटचाल
Mauli Vermicompost and Seed Production Project: Moving towards organic farming

Mauli gandul khat va beej utpadan prakalp : sendriya shetikade vatchal

 श्री.युवराज सखाराम कदम, रावळगाव (ता. मालेगाव, जि. नाशिक) हे एक दूरदृष्टी असलेले शेतकरी.त्यांच्याकडे तीन एकर शेती असून दोघे भाऊ  शेतीबरोबरच गांडूळ खत व्यवसाय सांभाळत आहे. त्यांनी आपल्या मेहनतीने आणि चिकाटीने केवळ स्वतःच्या शेताचीच नाही तर परिसरातील अनेक शेतकऱ्यांचीही वाट बदलून टाकली आहे. त्यांचा माऊली गांडूळ खत व बीज उत्पादन प्रकल्प आज शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. श्री.कदम बंधू यांच्या माऊली गांडूळ खत व बीज उत्पादन प्रकल्पाला विभागीय कृषी आयुक्त काटकर साहेब यांनी भेट दिली. त्यांनी हा प्रकल्प पाहून समाधान व्यक्त केले. 

Mauli gandulkhat va beej utpadan prakalp : sendriya shetikade vatchal

   आज रासायनिक शेतीचा दुष्परिणाम आपण पाहत आहोत. आजच्या शेतीपद्धतीत रासायनिक खतांचा अतिवापर होऊ लागला आहे. या रसायनांमुळे जमिनीतील उपयुक्त सूक्ष्मजिवाणू नष्ट होतात. जमिनीची नैसर्गिक सुपीकता कमी होते. पिकांची गुणवत्ता घसरते आणि शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात भर पडते. याचा परिणाम असा की शेतकरी दबकळीस जातो, कर्जबाजारी होतो. या गंभीर परिस्थितीवर विचार करून युवराज कदम यांनी “सेंद्रिय शेती” हाच पर्याय निवडला. कृषिभूषण शेतकरी अरुणबापू पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपल्या शेतावर १६ बेड्स लावून गांडूळ खत उत्पादनाची सुरुवात केली.


  अल्पभूधारक शेतकरी श्री. युवराज कदम यांनी पारंपरिक कांदा, मका पिकांमधून मिळणाऱ्या मर्यादित उत्पन्नाऐवजी पूरक व्यवसायाचा शोध घेतला. गावातील कृषिभूषण अरुण पवार आणि छत्रपती संभाजीनगर येथील गोरखनाथ गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गांडुळखत प्रकल्पाची सुरुवात केली. जुन्या पोल्ट्री शेडमध्ये २०० किलो गांडुळ बीज घेऊन सुरू केलेल्या पहिल्या प्रकल्पातून अवघ्या ७० दिवसांतच ४५ हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळाला आणि त्यातून त्यांचा आत्मविश्वास दुणावला.




     प्युअर शेणखतापासून तयार केलेले ट्रायकोडर्मायुक्त माऊली गांडूळखताचे अनेक फायदे आहेत. गांडूळखताला “काळ्या सोन्याचे खत” असे म्हटले जाते. त्याचे अनेक फायदे आहेत. मातीची भुसभुशीत रचना तयार होते, ज्यामुळे मुळांना हवा व पाणी सहज मिळते. सेंद्रिय कार्बन वाढतो, परिणामी जमीन सुपीक राहते. पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, सूक्ष्मअन्नद्रव्ये नैसर्गिकरीत्या मिळतात. रासायनिक खतांच्या तुलनेत उत्पादन खर्च कमी होतो. पिकांची गुणवत्ता सुधारते, बाजारात चांगला दर मिळतो. भाजीपाला, फळपिके, कांदा, ऊस, डाळी–कडधान्ये यावर उत्तम परिणाम दिसून येतो. शेतकरी व ग्राहक दोघेही निरोगी व विषमुक्त अन्न मिळवतात. युवराज कदम यांच्या प्रकल्पातून मिळणारे गांडूळ खत वापरून अनेक शेतकऱ्यांना प्रत्यक्ष अनुभव आला की पीक अधिक तजेलदार, रोगप्रतिकारक्षम आणि दीर्घकाळ टिकणारे झाले आहे.


Mauli gandul khat va beej utpadan prakalp : sendriya shetikade vatchal


    माऊली गांडूळ खत प्रकल्पाचा विस्तार व मार्केटिंगविषयी श्री. युवराज कदम यांच्याविषयी अधिक जाणून घेतले असता सुरुवातीला १६ बेड्सपासून सुरू झालेला हा प्रकल्प, खताला मोठी मागणी असल्याने ७५ बेड्सपर्यंत पोहोचला. आज दर अडीच महिन्याला ७० टन गांडूळ खत तयार केले जाते. त्यांच्या मार्केटिंगची काही ठळक वैशिष्ट्ये अशी जाणवली कि जवळपासच्या शेतकऱ्यांकडून थेट मागणी येते. फळबाग, भाजीपाला व कांदा उत्पादक शेतकरी गांडूळ खताला जास्त पसंती देतात. गावोगावी भेटी घेऊन, प्रात्यक्षिके करून शेतकऱ्यांना माहिती दिली जाते. खताच्या गुणवत्तेमुळे तोंडी प्रचार (Word of Mouth) हा सर्वोत्तम जाहिरात माध्यम ठरत आहे. ते  सोशल मिडियाचा आधार घेऊनही या खताची मार्केटिंग करतात. इंस्टाग्राम, फेसबुक, विविध शेतीविषयक व्हाट्सअँप ग्रुपद्वारे त्यांची प्रसिद्धी आणि प्रचार चालू आहे.शेतकरी स्वतः अनुभव घेतल्यावर दुसऱ्यांनाही सुचवतात, त्यामुळे बाजारपेठ नैसर्गिकरित्या वाढते.श्री. युवराज कदम स्वतः शेतकऱ्यांना भेटून त्यांना सेंद्रिय खताचे फायदे समजावतात. त्यामुळे विक्रीसोबतच सेंद्रिय शेतीचे जाळेही निर्माण होत आहे.


   गांडूळखताबरोबरच श्री. युवराज कदम यांच्या प्रकल्पात वर्मीवॉशचेही उत्पादन केले जाते. वर्मीवॉश म्हणजे गांडुळांपासून निघणारे द्रव स्वरूपातील जैविक खत. या द्रवात नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश, एन्झाईम्स आणि सूक्ष्मजीव विपुल प्रमाणात असतात. शेतकरी वर्मीवॉशचा फवारणीद्वारे वापर करून पिकांना रोगप्रतिकारक क्षमता वाढवतात, पिकांची वाढ जोमदार होते आणि उत्पादनात वाढ दिसते. भाजीपाला, फळबाग, कांदा, कडधान्ये अशा सर्व पिकांवर वर्मीवॉश प्रभावी ठरतो. यामुळे रासायनिक कीडनाशके व द्रवखतांवरील खर्च कमी होतो आणि शेतकऱ्यांची मोठी बचत होते.


   माऊली गांडूळ खत प्रकल्पामुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांची सेंद्रिय शेतीकडे वाटचाल चालू झाली आहे. गांडूळ खतामुळे नैसर्गिक शेती शक्य होते. रासायनिक खतांचा वापर कमी झाल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होत असल्याचे अनेक शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यामुळे मातीचा समतोल टिकतो. जलसंधारण व पर्यावरण संवर्धनाला हातभार लागतो,आणि ग्राहकांना सुरक्षित,आरोग्यदायी अन्न मिळत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. 


Mauli gandul khat va beej utpadan prakalp: sendriya shetikade vatchal


    आज श्री. युवराज कदम यांनी ५५ टन क्षमतेचा आधुनिक प्रकल्प उभारून शेतकरी व शहरी ग्राहकांसाठी उच्च प्रतीचे गांडुळखत, गांडुळ बीज आणि वर्मीवॉश उपलब्ध करून दिले आहे. ४० किलो पिशवी, छोटे पॅकिंग, तसेच जिवाणूंची फवारणी करून तयार केलेले सेंद्रिय खत स्थानिक फळबाग, भाजीपाला व कांदा उत्पादकांसाठी वरदान ठरत आहे. मागणीपेक्षा पुरवठा कमी पडत असताना युवराज कदम यांची ही वाटचाल इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.


      श्री. युवराज कदम यांचा हा माऊली गांडूळ खत व बीज उत्पादन प्रकल्प म्हणजे केवळ खत उत्पादन नव्हे, तर शाश्वत शेतीचा एक मार्ग आहे. त्यातून जमिनीतील सेंद्रिय कार्बन वाढवण्याचे, काळी आई जिवंत ठेवण्याचे व शेतकरी सुखी करण्याचे ध्येय साध्य होत आहे. माऊली गांडूळ खत प्रकल्प हा शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्रोत म्हणून काम करत आहे. श्री. युवराज कदम यांच्या प्रकल्पातून काही महत्त्वाचे धडे मिळतात कि  लहान प्रमाणावर सुरुवात करूनही मोठे यश मिळू शकते. रासायनिक शेतीला पर्याय म्हणून सेंद्रिय शेती शक्य आणि फायदेशीर आहे. गुणवत्तापूर्ण उत्पादन असेल तर मार्केटिंगसाठी वेगळ्या खर्चाची गरज नसते. शेतकरी एकमेकांना मार्गदर्शन करून शेतकरी ते शेतकरी (Farmer-to-Farmer learning) या पद्धतीने बदल घडवू शकतात.


       आज “माऊली गांडूळ खत व बीज उत्पादन प्रकल्प” केवळ रावळगावात नाही, तर संपूर्ण मालेगाव तालुक्यात शेतकऱ्यांना प्रेरणा देत आहे. युवराज कदम यांनी दाखवले की, खरी प्रगती म्हणजे निसर्गाशी सुसंगत शेती, जिच्यातून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होतो आणि समाजालाही निरोगी अन्न मिळते. त्यांची ही यशोगाथा स्पष्ट सांगते कि, जमिनीवर प्रेम करा, तिला जिवंत ठेवा; कारण जमिनीतच शेतकऱ्याचे भविष्य दडलेले आहे.

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
https://mr.quora.com/profile/Deepak-Ahire-5?ch=10&oid=1651193170&share=74b6a2ed&srid=hZHxKh&target_type=user
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

कृषिभूषण ओमकार मसकल्ले : विषमुक्त शेतीचा शेतकरी योद्धा (krushibhushan Omkar Masakalle: Farmer warrior of pesticide-free farming)


कृषिभूषण ओमकार मसकल्ले : विषमुक्त शेतीचा शेतकरी योद्धा
Omkar Masakalle: Farmer warrior of pesticide-free farming

Omkar maskalle: vishmukta sheticha shetkari yodha

   “गावात एसटी बस येते ती फक्त मतदानाच्या दिवशी... बाकी वेळेस या गावाने बस बघितली नाही.” ही ओळ ऐकली की लातूर जिल्ह्याच्या देवणी तालुक्यातील महादेववाडी या सीमाभागातील गावाचं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. पायाभूत सुविधांचा अभाव, रोजगाराच्या संधींची कमतरता आणि पारंपरिक शेतीतून मिळणारं तुटपुंजं उत्पन्न. या सर्वांच्या छायेत वाढलेला तरुण म्हणजे ओमकार माणिकराव मसकल्ले. पण या सर्व अडचणींवर मात करत, सेंद्रिय शेतीचा मार्ग निवडून आज ते कृषिभूषण पुरस्काराचे मानकरी झाले आहेत.

संघर्षातून उभा राहिलेला शेतकरी

    घरच्याजवळ साधारण २० एकर शेती होती. पारंपरिक शेतीतून मिळणारं उत्पन्न कुटुंबासाठी अपुरं होतं. अनेक तरुणांप्रमाणेच ओमकार यांच्यासमोरही “शहराकडे धाव घ्यावी का?” हा प्रश्न उभा होता. पण त्यांनी ठरवलं – “शेतीला नवा चेहरा द्यायचा, इथंच उभं राहायचं.” त्यांनी सेंद्रिय शेतीचा अभ्यास सुरू केला. गावकऱ्यांनी सुरुवातीला थोडी टिंगल-टवाळी केली. “रासायनिक खतांशिवाय काहीच होत नाही” अशी धारणा अनेकांची होती. पण ओमकार मात्र ठाम होते.

प्रयोगांची सुरुवात

    पहिल्या वर्षी त्यांनी थोड्याशा जमिनीत प्रयोग केले. गांडूळखत, व्हर्मीवॉश, जिवामृत, बीजामृत, दशपर्णी अर्क यांचा वापर करून पिकं घेतली. कीटकांवर नियंत्रणासाठी कामगंध सापळे, पक्षीथांबे, मित्र-शत्रू कीटकांचं ज्ञान या पद्धती वापरल्या. खर्च कमी झाला, जमीन हळूहळू सुपीक व्हायला लागली आणि सगळ्यात मोठं म्हणजे  विषमुक्त उत्पादन तयार झालं. जेव्हा घरच्यांनी ही रसायनमुक्त भाजी आणि धान्य खाल्लं, तेव्हाच त्यांना या मार्गाची खरी ताकद समजली.

Omkar maskalle:  vishmukta sheticha shetkari yodha

पूरक व्यवसाय – मत्स्यशेती

  “फक्त शेतीवर अवलंबून राहिलं, तर धोका आहे,” या जाणिवेतून ओमकार यांनी शेततळं तयार केलं आणि मत्स्यपालन सुरू केलं. रोहू, कटला, सायप्रिनस यांसारख्या माशांनी त्यांना चांगलं उत्पन्न मिळालं. शेततळ्यामुळे पिकांसाठी पाणीही उपलब्ध झालं. याशिवाय बायोगॅस, गोकृपामृतम, अग्नी अस्त्र, ब्रम्हास्त्र यांसारखे सेंद्रिय प्रयोग करून त्यांनी शेतीला एक प्रकारचं “शास्त्र” बनवलं.

मेहनतीला मिळालेले मानाचे मुकुट

   ओमकार यांची मेहनत शासनाच्या नजरेत आली. २०१७ मध्ये त्यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार मिळाला. २०२४ मध्ये पुन्हा एकदा त्यांच्या प्रयोगशीलतेचा सन्मान झाला आणि ते कृषिभूषण सेंद्रिय शेती पुरस्काराचे मानकरी ठरले. गावकऱ्यांना अभिमान वाटू लागला  “आपल्या गावातला ओमकार आज संपूर्ण महाराष्ट्रात नाव कमावतो आहे.”

समाजासाठी दिलेला हात

   ओमकार फक्त स्वतःपुरते थांबले नाहीत. त्यांनी शेतकरी गटांना प्रशिक्षण दिलं. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतावर घेऊन जाऊन प्रात्यक्षिकं दाखवली. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी सेंद्रिय शेतीचं मार्गदर्शन केलं.त्यांच्या भाषणातले  एक वाक्य आजही सर्वांच्या लक्षात राहतं “जमिनीचं आरोग्य टिकवलं, तर माणसाचं आरोग्य आपोआप टिकतं.”

कुटुंबाचा पाठिंबा

    या प्रवासात त्यांना पत्नी सुनीता मसकल्ले यांचा आणि वडिलांचा मोठा आधार मिळाला. घरच्यांनी शेतीला “केंद्रबिंदू” मानलं. “दिवस शेतात उगवला पाहिजे आणि शेतातच मावळला पाहिजे” हा ओमकार यांचा दिनक्रम त्यांच्या यशामागचं खरं रहस्य ठरलं.

Krushibhushan omkar maskalle vishmukta sheticha shetkari yodha


प्रेरणा काय घ्यावी?

   ओमकार मसकल्ले यांची यशोगाथा आपल्याला सांगते कि, रासायनिक शेतीचा अतिरेक आपल्याला विनाशाकडे नेतो. सेंद्रिय शेतीत श्रम आणि चिकाटी लागते, पण त्याचे परिणाम दीर्घकालीन व आरोग्यदायी असतात. बदल घडवायचा असेल तर आधी एका छोट्या कोपऱ्यात प्रयोग करावा. ग्रामीण युवकांनी शेतीला दुय्यम मानू नये; कारण शेती ही केवळ उत्पन्नाचा नव्हे तर आरोग्य आणि स्वावलंबनाचा पाया आहे. आज ओमकार मसकल्ले हे केवळ एक यशस्वी शेतकरी नाहीत, तर संपूर्ण भागासाठी प्रेरणेचं प्रतीक आहेत. त्यांनी सिद्ध केलं  “चिकाटी, प्रयोगशीलता आणि सकारात्मक दृष्टिकोन असेल तर विषमुक्त शेतीतूनही स्वप्नं साकार होऊ शकतात.”

       “सेंद्रिय शेती ही फक्त नफा मिळवण्याची पद्धत नाही, तर ती जमिनीचं आरोग्य, माणसाचं आरोग्य आणि भविष्यातील पिढ्यांचं आयुष्य सुरक्षित ठेवण्याची दिशा आहे. जिद्द आणि प्रयोगशीलता असेल तर प्रत्येक शेतकरी ‘यशोगाथा’ बनू शकतो.”

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
https://mr.quora.com/profile/Deepak-Ahire-5?ch=10&oid=1651193170&share=74b6a2ed&srid=hZHxKh&target_type=user
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

सपट निरावी हर्ब गार्डन आणि रिसर्च सेंटर नाशिकमध्ये उभारणार (Sapat Niravee Herb Garden and Research Center to be set up in Nashik)


सपट निरावी हर्ब गार्डन आणि 
रिसर्च सेंटर नाशिकमध्ये उभारणार 
Sapat Niravee Herb Garden and Research Center to be set up in Nashik

Sapat niravi harb garden aani research centre nashikmadhe

   भारतात असंख्य औषधी वनस्पतींचा खजिना आहे. आयुर्वेदाने हजारो वर्षांपूर्वी अनेक वनस्पतींची आरोग्यदायी महत्त्वे ओळखली आहेत. मात्र आधुनिक काळात व्यावसायिक शेती, निवासस्थानांचे नुकसान आणि दर्जाबाबत अपुरे नियंत्रण यामुळे शुद्ध औषधी वनस्पती मिळवणे कठीण झाले आहे. हे लक्षात घेऊन सपट ग्लोबल हेल्थने नाशिक परिसरातील मोहाडी येथे सपट निरावी हर्ब गार्डन व रिसर्च सेंटर उभारण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे.

उद्दिष्ट:

    शेतीपासून थेट शुद्ध औषधी वनस्पती नागरिकांच्या घरांपर्यंत पोहोचवणे; यात आयुर्वेदाशी संबंधित नैसर्गिक आरोग्य लाभ लोकांपर्यंत त्यांच्या सर्वात विशुद्ध स्वरूपात पोहोचवण्याचा हेतू आहे. या केंद्रात ६० हून अधिक औषधी वनस्पती जसे की तुलस, अश्वगंधा, ब्राह्मी, निर्गुडी, अर्जुन आणि अदुलसा यांची लागवड व वैज्ञानिक अभ्यास केला जाणार आहे. प्रत्येक वनस्पती तिच्या नैसर्गिक शक्ती जपण्यासाठी काटेकोर देखरेखीखाली वाढवली जाईल. संशोधन टीम सर्वोत्तम प्रजाती, मातीचे प्रकार, हवामान आणि कापणीची योग्य वेळ निश्चित करून प्रत्येक वनस्पतीचे औषधी मूल्य अधिकाधिक करण्यावर लक्ष केंद्रित करेल.


Sapat Niravi herb garden ani reseach centre nashikmadhe


केंद्राचे वैशिष्ट्ये:

    सपट निरावी हर्ब गार्डन व रिसर्च सेंटर हे केवळ एक शेत व संशोधन केंद्र न राहता एक शैक्षणिक पर्यटनस्थळही असेल. येथे पर्यटकांना औषधी वनस्पती बागांची सैर करता येईल, आयुर्वेदाचा वारसा व विज्ञान समजता येईल आणि शुद्ध औषधी वनस्पतींचा "फार्म टू होम" प्रवास अनुभवता येईल. हे केंद्र दिवाळीपूर्वी पर्यटकांसाठी खुले होणार आहे. ६० पेक्षा अधिक औषधी वनस्पती : तुळस, अश्वगंधा, ब्राह्मी, निर्गुण्डी, अर्जुन, अडुळसा इ. वनस्पतींची शास्त्रीय तऱ्हेने लागवड, परीक्षण आणि देखभाल केली जाईल  शास्त्रीय अभ्यास: सर्वोत्तम प्रजाती, मातीचे प्रकार, हवामान आणि कापणीची योग्य वेळ यांचा अभ्यास करून वनस्पतींचा औषधी गुणधर्म वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल 

उत्पादने: 

   मधुमेह नियंत्रण, रक्तदाब संतुलन, हृदय व रक्ताभिसरण, मूत्रपिंड व यकृताची काळजी, श्वसन आरोग्य, वजन नियंत्रण, चयापचय सुधारणा, डोळ्यांचे आरोग्य, रोगप्रतिकारक शक्ती व आरोग्य–या विविध गरजांसाठी औषधी पूरक तयार करण्याचा विचार आहे. ही उत्पादने ऑनलाइन आणि सपाट निरावीच्या विशेष रिटेल स्टोअरद्वारे उपलब्ध होतील ही उत्पादने ऑनलाईन आणि सपट निरावीच्या विशेष रिटेल स्टोअरमधून उपलब्ध होतील, ग्राहकांना विश्वासार्ह आयुर्वेदिक उपाय सहज मिळतील. प्रत्येक पूरक उत्पादनाची शुद्धता आणि परिणामकारकता सपटच्या कठोर मानकांवर आधारित असेल.

    सपट निरावी हर्ब गार्डन आणि रिसर्च सेंटरच्या भूमिपूजन सोहळ्यात बोलताना सपट ग्लोबल हेल्थचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. निखिल जोशी म्हणाले, हा सपट ग्रुपसाठी नवा टप्पा आहे. सपट निरावी हर्ब गार्डन व रिसर्च सेंटर आमच्या शेतातून थेट शुद्ध औषधी वनस्पती लोकांच्या घरी पोहोचवेल, ज्यामुळे लोकांना आयुर्वेदाचे नैसर्गिक आरोग्य लाभ त्यांच्या सर्वाधिक अस्सल स्वरूपात अनुभवता येतील.

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
https://mr.quora.com/profile/Deepak-Ahire-5?ch=10&oid=1651193170&share=74b6a2ed&srid=hZHxKh&target_type=user
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

शेतकरी जीवनातील बैलपोळे — परंपरा, श्रम आणि शेतीची ओळख | Importance of Bullocks in Farmer’s Life

शेतकरी जीवनातील बैलपोळे — परंपरा, श्रम आणि शेतीची ओळख | Importance of Bullocks in Farmer’s Life

Shetkari jivnat bailpolyache mahatva

    भारतीय संस्कृतीत सण-उत्सवांना नेहमीच एक विशेष स्थान आहे. प्रत्येक सणामागे सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि नैतिक मूल्यं दडलेली असतात. ग्रामीण जीवनात साजरे होणारे सण हे निसर्गाशी, शेतीशी आणि पशुपालनाशी घट्ट जोडलेले असतात. बैलपोळा हा असाच एक महत्वाचा सण आहे जो थेट शेतकरी जीवनाशी निगडित आहे.

   बैलपोळा हा शेतकऱ्यांचा आणि त्यांच्या लेकरासारख्या बैलांचा सण आहे. शेतीत बैल हा शेतकऱ्याचा खरा सोबती असतो. दिवसभर कष्ट करून शेताची मशागत करतो, नांगरणी, पेरणी, वाहतूक ही सगळी कामं बैलाच्या जोरावर पार पडतात. त्यामुळे वर्षातून एकदा त्याचा सन्मान करण्यासाठी बैलपोळा साजरा केला जातो. 

यांत्रिक युगातील बैलपोळा

  आजकाल शेतीत ट्रॅक्टर, आधुनिक यंत्रं आणि तंत्रज्ञान आल्यामुळे बैलांचं महत्व कमी होत चाललं आहे. कामं वेगानं, कमी वेळेत आणि कमी मजुरीत ट्रॅक्टरने होतात, त्यामुळे अनेक शेतकरी बैल पाळणं टाळतात. यामुळेच बैलपोळ्याच्या सणाकडेही दुर्लक्ष होतंय, आणि हळूहळू हा सण फक्त औपचारिकतेपुरता उरतोय याची मला खंत वाटते. 

   पूर्वी बैल आणि शेतकऱ्याचं नातं भावनिक होतं. ते नातं कमकुवत होत चाललं आहे. बैलामुळे मुलांना प्राणीप्रेम, श्रमाचं महत्व आणि सहजीवनाची शिकवण मिळायची ती आता कमी होत आहे. सणामुळे गावात एकत्रितपणे आनंद साजरा करण्याची प्रथा टिकायची. ती आज कमी होत चालली आहे. बैलपोळा हा केवळ बैलांचा नाही तर शेतकऱ्याच्या श्रमसंस्कृतीचा गौरव आहे आणि त्या संस्कृतीला धोका निर्माण होतोय.

   आजच्या यांत्रिक युगात ट्रॅक्टर हे अपरिहार्य साधन आहे, पण बैलांचे योगदान आणि महत्व कधीही नाकारता येणार नाही. त्यामुळे परंपरेतला बैलपोळा सण जिवंत ठेवणं हे आपल्या संस्कृतीसाठी आणि पुढच्या पिढीसाठी फार महत्वाचं आहे.

बैल : शेतकऱ्याचा खरा सोबती

   शेतकरी जीवनाची गाथा सांगायची झाली तर ती शेतकरी आणि त्याच्या बैलांशिवाय अपूर्णच आहे. बैल हा शेतकऱ्याचा खरा सोबती, कष्टाचा साथीदार आणि अन्नदाता मानला जातो. शेत नांगरणं, पेरणी करणं, गाडं ओढणं, शेतमाल वाहून नेणं या सर्व कामांत बैल महत्वाची भूमिका बजावतो. आधुनिक यंत्रसामग्री आली असली तरी अजूनही ग्रामीण भागात अनेक शेतकरी शेतीसाठी बैलांवरच अवलंबून आहेत. बैल हा केवळ कामासाठीच नाही, तर भावनिक नात्यानेही शेतकऱ्याशी जोडलेला असतो. तो शेतकऱ्याचा लेकरासारखाच असतो.

बैलपोळ्याची परंपरा

   भाद्रपद महिन्यातील पौर्णिमेला बैलपोळा साजरा केला जातो. हा दिवस बैलांच्या विश्रांतीचा व सन्मानाचा मानला जातो. बैलपोळा सणाच्या आधी बैलांना आंघोळ घालून, अंगाला तेल चोळून स्वच्छ केलं जातं. त्यांच्या शिंगांना रंग लावून सजवलं जातं, गळ्यात घंटा बांधली जाते, डोक्यावर आकर्षक झुलं व फडकी बांधतात. दोन्ही शिंगाना विविध रंगाच्या रिबन बांधल्या जायच्या. प्रत्येक गावात मिरवणुका काढल्या जातात, ढोल-ताशांच्या गजरात बैलांना मानाचा मुजरा दिला जातो. शेतकरी त्यांच्या बैलांना गोडधोड खायला घालतो, पोळ्याच्या दिवशी बैल कामाला लावले जात नाहीत. ही परंपरा शतकानुशतकं चालत आलेली आहे आणि आजही गावोगावी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते.

बैलपोळ्याचं महत्व

   शतकानुशतके चालत आलेली आपली ग्रामीण संस्कृती या बैलपोळा सणामुळे टिकून राहिली आहे. बैल हा शेतकऱ्याचा निसर्गदूत आहे, त्याला मान देणे म्हणजे शेती व निसर्गाला मान देणे.बैलपोळा आपल्याला श्रमाचं महत्व, प्राण्यांबद्दल कृतज्ञता आणि सहजीवनाची जाणीव करून देतो. माझे बालपण खेड्यात गेल्याने मी बैलपोळा सणाचा भरपूर आनंद लुटला आहे. मी संवेदनशील कवी मनाचा माणूस असल्यामुळे बैलपोळा माझ्या नजरेतून कवितेद्वारे मांडला आहे. बैलपोळ्यावरची माझी कविता पुढीलप्रमाणे : 

बैलपोळा (काव्य) 

बैल आहे माझा सखा सोबती 

शेतकरी बंधूंच्या जिवाभावाचा, 

बैलांप्रती आपली कृतज्ञता 

सण आहे हा बैलपोळ्याचा... 

शेतीच्या कामासाठी आली यंत्र 

बैलाच्या मेहनतीला नाही तोड, 

पोळ्याला सजवतात बैलांना 

नैवेद्य पुरणपोळीचा गोड-धोड... 

बैल नाही असे शेतकरी बांधव 

बैलाच्या पुतळ्याची पूजा करतात,

गावखेड्यात निघतात मिरवणुका

गावात नाचत बैल फिरवतात... 

सण माझ्या सर्जा-राजाचा 

ऋण त्याचं  माझ्या भाळी, 

तुझ्या घामानं फुलणाऱ्या शेतीला 

सदा पिकू दे सर्व काळी... 

      शेतकरी वर्षभर बैलांच्या मदतीने शेती करतो. परंतु बैल कधी तक्रार करत नाहीत. त्यांच्यामुळेच शेतातून धान्य, फळं, भाज्या आणि अन्न निर्माण होतं. म्हणूनच बैलपोळा हा सण म्हणजे शेतकऱ्याने आपल्या सोबत्याबद्दल व्यक्त केलेली कृतज्ञतेची भावना होय. बैलपोळ्याच्या निमित्ताने शेतकरी आपल्या बैलांची विशेष काळजी घेतो. त्यांना सजवतो, विश्रांती देतो आणि प्रेम दाखवतो. यामुळे प्राणीप्रेम, माणूस-प्राणी नातं आणि सहजीवनाची जाणीव समाजात टिकून राहते. बैलपोळ्याच्या दिवशी गावात सामूहिक आनंदाचे वातावरण असते. 

       बैलपोळ्याला सर्वजण मिळून मिरवणुका काढतात, ढोल-ताशा वाजवतात, गाणी म्हणतात. यामुळे गावात सामाजिक एकात्मता, बांधिलकी आणि ऐक्यभावना वाढीस लागते. बैल हा शेतीचा आधारस्तंभ आहे. त्यामुळे बैलपोळा हा सण म्हणजे शेतीला, निसर्गाला आणि अन्नदात्याला दिलेला सन्मान आहे. हा सण आपल्याला निसर्गाशी जोडतो आणि त्याच्या उपकारांची जाणीव करून देतो. आजच्या यांत्रिकीकरणाच्या युगातही बैलपोळा आपल्याला आपल्या परंपरा, संस्कृती आणि शेतकरी जीवनाच्या मूळ मूल्यांची आठवण करून देतो. हा सण आपली सांस्कृतिक ओळख जपण्याचं कार्य करतो.

बैलपोळ्याचे  महत्त्व अबाधित

      बैलपोळ्याचं आजच्या काळातील महत्त्व अबाधित आहे. आज बरीच कामं ट्रॅक्टर आणि यंत्रांच्या मदतीने होत असली तरी ग्रामीण समाजात बैलांचं महत्व अजूनही संपलेलं नाही. अनेक शेतकरी अजूनही आपल्या बैलांना लेकरांसारखीच जपतात.बैलपोळा आजच्या मुलांना श्रमाचं महत्व आणि प्राण्यांशी जिव्हाळ्याचं नातं शिकवतो.हा सण शेतकऱ्याच्या श्रमसंस्कृतीचा आणि त्याच्या कष्टमय जीवनाचा सन्मान करतो. बैलपोळ्यामुळे शेतीप्रधान भारताची खरी ओळख टिकून राहते.




         नाशिक जिल्ह्यातील वडनेरभैरव येथील श्री. बाळासाहेब परसराम मोहिते या शेतकऱ्याने बैलांच्या आठवणी जतन करण्यासाठी व बैलांवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी यांत्रिक शेतीच्या काळात देखील आपल्या बंगल्यासमोर बैलांची एक जोडी शिल्प उभे करून त्यासाठी खास अशी जागा निर्माण केली आणि आपले जनावरांवरील प्रेम पोळ्याच्या निमित्ताने व्यक्त केले. एक लाख रु.खर्च करून आपल्या प्रिय बैलांचे बंगल्यासमोर शिल्प उभारले. 

         पोळा हा शेतकऱ्यांचा एकमेव महत्त्वाचा बैलांप्रती कृतज्ञता बाळगण्याचा सण आहे. या सणाला या शेतकऱ्याने बैलांना सहा हजार रुपये किमतीच्या खास झुली बनवून आणल्या. बैलांना गोंडे, माठूट्या त्याचबरोबर घुंगरांच्या माळा असे सर्व काही शोभिवंत दागिने हे बैलांना घातल्यामुळे त्या बैलांचा जिवंतपणा अजूनच बोलका झाला आहे. 

   पिंपळगाव बसवंत येथे असलेल्या बसवंत गार्डन अँपी\अँग्री टुरिझममध्ये ग्रामीण भागातल्या बहुतांश लोकांच्या उदरनिर्वाहाचे सजीव साधन असणाऱ्या कृषी आधारित बैल-संस्कृतीची परिपूर्ण ओळख पहायला मिळते. बसवंत गार्डनमध्ये मांडलेल्या बैलांच्या शिल्पकृतींमधून नवीन पिढीला अतिशय रंजकतेने माहिती दिली जाते. भारतातील बैलांच्या विविध जातींच्या हुबेहुब प्रतिकृती त्यांच्या माहितीसह येथे बघायला मिळतात. 

 नाशिक येथे "कृषिथॉन"आयोजित दरवर्षीप्रमाणे "माझा बैल - माझी शान" ही फोटो स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या बैलपोळा सणाचे आनंदी क्षण फोटो २६ ऑगस्टपर्यंत पाठवून सोबत आपले पूर्ण नाव, गाव, मोबाईल नं. लिहून पाठवा. या स्पर्धेत आकर्षक बक्षिसे आहेत. यानिमित्ताने बैलांसोबत आपल्या कृतज्ञतेच्या आठवणी कैद होतील. 

         बैलपोळा हा केवळ सण नाही, तर शेतकऱ्याच्या जीवनातील भावनिक आणि सांस्कृतिक बंध आहे. हा सण शेतकऱ्याला आपल्यावर उपकार करणाऱ्या बैलांची आठवण करून देतो आणि त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी देतो. आजच्या वेगवान युगात माणसाने प्राणी, निसर्ग आणि श्रम यांचा सन्मान करणे विसरू नये, हेच बैलपोळ्याचं खरं तत्त्वज्ञान आहे. शेतकऱ्याच्या जीवनात बैलपोळा हा सण म्हणजे प्रेम, आपुलकी, कृतज्ञता आणि संस्कृती यांचा सुंदर संगम आहे.

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
https://mr.quora.com/profile/Deepak-Ahire-5?ch=10&oid=1651193170&share=74b6a2ed&srid=hZHxKh&target_type=user
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

शेतकरी गटांसाठी नवी संधी : राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान (New opportunities for farmer groups: National Natural Farming Mission (NMNF)


शेतकरी गटांसाठी नवी संधी : राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान (NMNF)

New opportunities for farmer groups: National Natural Farming Mission (NMNF) 


Shetkari gatansathi navi sandhi: rashtriya naisargik sheti abhiyan


आजच्या काळात शेतकऱ्यांसमोर सर्वात मोठं आव्हान म्हणजे शेतीवरील वाढता खर्च. रासायनिक खतं, कीटकनाशकं, बियाणं यांचा खर्च दिवसेंदिवस वाढतोय आणि त्यातून मिळणारा निव्वळ नफा मात्र कमी होत आहे. दुसरीकडे मातीचं आरोग्य बिघडतंय, पाण्याचा जास्त वापर होतोय आणि शेतकरी कर्जाच्या विळख्यात सापडतोय. अशा वेळी केंद्र सरकारने सुरू केलेलं राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान (National Mission on Natural Farming – NMNF) शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरत आहे.ही योजना २०२४ साली केंद्र सरकारने मंजूर केली असून तिच्यामार्फत देशभरातील शेतकऱ्यांना गटाधारित स्वरूपात नैसर्गिक शेतीकडे वळवण्याचा मोठा प्रयत्न सुरू झाला आहे.

*योजनेची उद्दिष्ट्ये :* 

  शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करणे.रासायनिक खतं व कीटकनाशकांचा वापर कमी करून मातीचं आरोग्य सुधारणे. सुरक्षित आणि आरोग्यदायी अन्नधान्य उत्पादन वाढवणे. ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण करणे. नैसर्गिक शेती उत्पादनांना राष्ट्रीय ब्रँड व प्रमाणपत्र देऊन बाजारपेठेत चांगला दर मिळवून देणे. ही प्रमुख उद्दिष्ट्ये राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान योजनेची आहेत 

*योजना कशी राबवली जाणार?*

   राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान क्लस्टर पद्धतीने राबवली जाणार असून या योजनेत शेती गटाधारित पद्धतीने राबवली जाणार आहे. एका क्लस्टरमध्ये १२५ शेतकरी आणि किमान ५० हेक्टर क्षेत्र समाविष्ट होणार आहे. गट तयार झाल्यानंतर त्या गटात सामील झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला नैसर्गिक शेती पद्धत स्वीकारावी लागेल.

*जैव-इनपुट केंद्र (बीआरसी) उभारणी* 

   राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान योजनेत प्रत्येक गटासाठी जैव-इनपुट केंद्र (बायो इनपुट रिसोर्स सेंटर) उभारलं जाणार आहे.या ठिकाणी  जीवामृत, बीजामृत, घनजीवामृत, वर्मी कंपोस्ट, दशपर्णी अर्क यांसारख्या नैसर्गिक निविष्ठा तयार केल्या जातील आणि या शेतकऱ्यांना लागणाऱ्या निविष्ठा कमी दरात व स्थानिक पातळीवर उपलब्ध होतील.

*कृषी सख्या (सीआरपी)*

  राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान योजनेत कृषी सख्या (सीआरपी : कम्युनिटी रिसोर्स पर्सन) म्हणजेच समुदाय संसाधन व्यक्ती हा महत्त्वाचा घटक आहे. शेतकरी गटामधीलच एक प्रशिक्षित व्यक्ती असणार आहे. ही व्यक्ती इतर शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीची माहिती, मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक देणार असून सीआरपी हा शेतकरी आणि कृषी विभाग/संस्था यांच्यामध्ये दुवा म्हणून काम करणार आहे. यात त्याची महत्वाची भूमिका असणार असून शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रशिक्षण देणे. 

 जैव-इनपुट केंद्रामधून तयार होणाऱ्या निविष्ठांचा वापर कसा करायचा ते शिकवणे. गटातील शेतकऱ्यांना एकत्र बांधून ठेवणे व नियमित बैठक घेणे. शेतात जाऊन जैव-खते, कीटकनाशके, बीजप्रक्रिया यांचे प्रात्यक्षिक दाखवणे.शेतकऱ्यांच्या शंका त्वरित सोडवणे. गटातून उत्पादन बाजारात विक्रीसाठी मदत करणे असे सीआरपीचे काम असणार आहे. प्रत्येक गटासाठी साधारण २ ते ३ कृषी सख्या निवडले जातात.त्यांना योजनेअंतर्गत प्रशिक्षण आणि मानधन दिलं जातं. यामुळे शेतकरी गट स्वयंपूर्ण होतो आणि शेतकऱ्यांना तत्काळ मार्गदर्शन मिळतं.

*प्रशिक्षण (ट्रैनिंग)*

  कृषी विद्यापीठ आणि मान्यताप्राप्त संस्था शेतकऱ्यांना प्रशिक्षण देतील. शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीची पद्धत प्रत्यक्ष शिकवण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षण कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे आणि इतर संशोधन संस्था यांच्या माध्यमातून घेतले जाते. प्रशिक्षणामध्ये जैव-खते तयार करणे, बीजप्रक्रिया, नैसर्गिक कीटकनाशक बनवणे, पीक व्यवस्थापन यांचा समावेश असतो.

Shetkari gatandathi navi sandhi: Rashtriya nsisargik sheti abhiyan (NMNF)

*प्रात्यक्षिक शेत (मॉडेल फार्म्स)* 

    विविध जिल्ह्यांमध्ये मॉडेल फार्म्स उभारले जातील, जिथे नैसर्गिक शेती प्रत्यक्ष दाखवली जाईल.प्रत्येक गटामध्ये काही शेतं मॉडेल फार्म्स म्हणून निवडली जातात.या शेतांवर नैसर्गिक शेती प्रत्यक्ष दाखवली जाते.इतर शेतकरी ते पाहून शिकतात आणि आपल्या शेतावर अंमलात आणतात.यामुळे "पाहिलं ते केलं" या पद्धतीने शेतकऱ्यांना विश्वास निर्माण होतो.

*आर्थिक सहाय्य*

 शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रति एकर ४,००० रुपये दरवर्षी, सलग दोन वर्षांसाठी प्रोत्साहन मिळेल.हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील.याशिवाय गट तयार करणे, बीआरसीची उभारणी, प्रशिक्षण संस्था यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून स्वतंत्र निधी दिला जाईल.

*शेतकरी योजनेत कसा सहभागी होईल?*

  इच्छुक शेतकऱ्याला आपल्या तालुका किंवा जिल्हा कृषी विभागाकडे अर्ज करून नोंदणी करावी लागेल. गट तयार झाल्यावर शेतकऱ्याचा समावेश त्यात केला जाईल.गटामार्फत त्याला प्रशिक्षण, निविष्ठा आणि आर्थिक मदत मिळेल. शेतकरी आपल्या शेतात नैसर्गिक शेती सुरू करून उत्पादन विक्रीसाठी बाजारपेठेशी जोडला जाईल.

*महाराष्ट्रातील आकडेवारी*

 महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात या योजनेची अंमलबजावणी जलद गतीने सुरू झाली आहे. राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार १७०९ गट तयार होणार आहेत.एकूण ८५,४५० हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणलं जाणार आहे. यामध्ये सुमारे २,१३,६२५ शेतकरी लाभार्थी असतील. राज्यात एकूण ११३९ जैव-इनपुट केंद्र (बीआरसी) उभारले जाणार आहेत. या योजनेसाठी महाराष्ट्राला अंदाजे ₹२५५.४५ कोटी निधी मंजूर झाला आहे. ही आकडेवारी पाहता महाराष्ट्र देशातील आघाडीचं राज्य ठरू शकेल अशी शक्यता आहे.

*देशपातळीवरील उद्दिष्ट्ये*

   एक कोटी शेतकरी या योजनेत सहभागी होणार असून एकूण ७.५ लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली येणार आहे. त्यासाठी १५,००० क्लस्टर गट तयार करून १०,०००  जैव-इनपुट केंद्राची (बीआरसी) उभारणी हॊणार आहे. यासाठी ३०,००० कृषी सख्या नेमले जाणार आहे. १००० हुन अधिक मॉडेल फार्म्स तयार होतील. ८०० हुन अधिक प्रशिक्षण संस्था कार्यरत राहतील ही राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान योजनेची देशपातळीवरील उद्दिष्ट्ये आहेत. 

*बाजारपेठ व ब्रँडिंग*

   नैसर्गिक शेती उत्पादनांना केंद्र सरकारकडून विशेष ब्रँड व प्रमाणपत्र (सर्टिफिकेशन) दिले जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये उत्पादनावर विश्वास निर्माण होईल.यामुळे शेतकऱ्यांना थेट बाजारपेठेत प्रवेश मिळेल आणि त्यांच्या उत्पादनाला चांगला दर मिळण्याची शक्यता वाढेल. निर्यातीसाठीही नैसर्गिक उत्पादनांना मोठी मागणी असल्याने ही योजना शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरेल.

Shetkari gatansathi navi sandhi: rashtriya naisargik sheti abhiyan

*योजनेचे फायदे*

  राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान योजनेमुळे  मातीचे आरोग्य सुधारेल, रासायनिक खतांचा वापर कमी होईल आणि मातीतील सजीवपणा वाढेल.खर्च कमी होईल कारण निविष्ठा स्वतः तयार केल्याने उत्पादन खर्च घटेल. ग्राहकांना सुरक्षित अन्नधान्य, कीटकनाशकमुक्त व आरोग्यदायी उत्पादन उपलब्ध होईल. पर्यावरणपूरक पद्धत विकसित होणार असून पाण्याची बचत, कार्बन उत्सर्जनात घट होईल. महत्वाचे म्हणजे सामूहिक ताकद वाढून गट पद्धतीमुळे शेतकरी एकत्र येतील आणि बाजारपेठेत बळकट होतील.

*तज्ज्ञांचे मत*

   कृषीतज्ज्ञांच्या मते, राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान ही योजना दीर्घकालीन दृष्टीने शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. सुरुवातीला शेतकऱ्यांना थोड्या अडचणी येऊ शकतात पण प्रशिक्षण आणि बीआरसीमुळे त्या सहज दूर होतील. खर्चात बचत आणि चांगला बाजारभाव मिळाल्यास शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढेल.

*निष्कर्ष*

   राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान (NMNF) हे शेतकऱ्यांसाठी केवळ अनुदानाची योजना नाही, तर भविष्यातील शाश्वत शेतीसाठी एक मोठं पाऊल आहे. गट पद्धतीमुळे शेतकरी एकत्र येऊन नैसर्गिक शेती करू शकतात, खर्च कमी करू शकतात आणि बाजारपेठेत चांगला दर मिळवू शकतात. माती, पाणी आणि पर्यावरण यांचं रक्षण करतानाच शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याची ताकद या योजनेत आहे. त्यामुळे राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान ही योजना खऱ्या अर्थाने शेतकरी गटांसाठी नवी संधी ठरणार आहे.

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
https://mr.quora.com/profile/Deepak-Ahire-5?ch=10&oid=1651193170&share=74b6a2ed&srid=hZHxKh&target_type=user
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

प्रगतशील शेतकरी : महेंद्रसिंग छगनसिंग परदेशी यांची यशोगाथा | Progressive Farmer Mahendra Singh Pardeshi Success Story

प्रगतशील शेतकरी : महेंद्रसिंग छगनसिंग परदेशी यांची यशोगाथा | Progressive Farmer Mahendra Singh Pardeshi Success Story

Pragatshil shetkari mahendrasingh pardeshi yanchi yashogatha
पिंपळनारे(वडनेरभैरव) येथील प्रगतशील शेतकरी महेंद्रसिंग परदेशी यांची पपई फळबाग 

 चांदवड तालुक्यातील पिंपळनारे येथील प्रगतशील शेतकरी महेंद्रसिंग छगनसिंग परदेशी या शेतकऱ्याने एक एकर पपईची लागवड केली आहे. पिंपळनारे येथील हे शेतकरी अत्यंत कष्टाळू व आधुनिकतेची कास बाळगलेले शेतकरी म्हणून अवघ्या नाशिक जिल्ह्यात विशेषत: चांदवड, निफाड, दिंडोरी या तीन तालुक्यात तर नक्कीच परिचित आहेत. 


        पूर्वी पिंपळनारे हे नागवेलीच्या पानासाठी अतिशय प्रसिद्ध गाव म्हणून ओळखले जाते. हे गाव म्हणजे चांदवड तालुक्यातले काश्मीर म्हणूनही या भागाची पूर्वपार ओळख आहे. याच पिंपळणारे गावातील श्री महेंद्रसिंग परदेशी यांनी द्राक्ष, टोमॅटो शेतीबरोबरच नगदी पीक म्हणून पपई या पिकाची लागवड केली.

       

     पपई या पिकाबाबत फारशी माहिती नव्हती. परंतु लागवडीचा त्यांनी निर्धार केला. नर्सरीतून साधारणत: १० रुपये नगाने "नंबर १५" या पपई पिकाचे हजार रोपे  विकत आणून शेतात लागवड केली. ही लागवड करताना आठ बाय सहा फूट हे अंतर त्यांनी ठेवले ठिबक सिंचनाच्या दोन लॅटरल नळी टाकून ठिबक सिंचनावरच ही पपईची शेती सुरू केली. पपई रोपे लावल्यानंतर आठ महिन्यांनी त्यांच्याकडे पपई उत्पादन सुरू झाले.

        

     पपईचा माल तयार झाल्यानंतर अनेक व्यापारी शेतात येऊन गेले. श्री.परदेशी यांनी स्थानिक मार्केटला   १० रुपयांपासून ते ३५ रुपये किलोपर्यंत पपई विक्री केली आहे. नाशिक मार्केटमध्ये सुद्धा त्यांनी पपईची विक्री केली. साधारणत: एक एकर क्षेत्रात १००० झाडे त्यांनी लावली. संपूर्ण खर्च त्यांचा हा लागवडीपासून मशागत, पावडर यावर सुमारे पन्नास हजार रुपयांच्या आत आलेला आहे तर श्री. परदेशी यांना सरासरी २५ रु. किलो बाजारभावाने एक झाड १०० किलोच्या आसपास बसते यानुसार त्यांना सुमारे साडेतीन लाख रुपयांपर्यंत उत्पादन एक एकरातून मिळालेले आहे.  एक वर्षाची बाग झालेली आहे अजून सहा महिने ही बाग चालेल असे श्री.परदेशी म्हणणं आहे. 

       

   पहिल्यापासूनच परदेशी परिवार हा चिकाटीने शेती करणार असल्याकारणाने या पपई फळबाग शेतीत सुद्धा त्यांना चांगले आर्थिक उत्पादन मिळालेले आहे त्यांच्या म्हणण्यानुसार द्राक्षबागा आणि टोमॅटो या शेतीमध्ये जितके पैसे होतात. तितकेच पैसे कमी श्रमामध्ये त्या मानाने पपई  शेतीत होत आहे.


     पपईचा किलोचा भाव हा १० रुपयांच्या वरती असला तर आपल्याला काढणी, पॅकिंग आणि मार्केट वाहतूक  परवडते. जेव्हा १० रुपयांच्या आत बाजारभाव आला तेव्हा मी मार्केटमध्ये माल न नेता तो खुडून टाकला. जेव्हा चांगला भाव आला तेव्हा मी मार्केटमध्ये माल घेऊन जायला लागलो असल्याचे श्री.परदेशी म्हणतात. आता मात्र भाव चांगले आहे. सरासरी १० रु. ते जास्तीत जास्त ३५ रुपये किलोपर्यंत मला बाजारभाव मिळाला असल्याचे श्री. परदेशी यांनी स्पष्ट केले. मशागतीच्या बाबतीत द्राक्षबाग आणि टोमॅटोची शेती पेक्षा पपई शेतीला कमी श्रम लागतात.तुलनेने कमी श्रमात तितकेच पैसे या प्लॉटने मला दिलेले असल्याचे श्री. परदेशी यांनी सांगितले. 


     वडनेरभैरव  परिसरात आता द्राक्ष व टोमॅटो या पिकाबरोबरच अनेक तरुण शेतकरी हे डाळिंब, पेरू आणि पपई पिकाकडे वळलेले आहे ही स्थित्यंतराची पहिली पायरी मानली जाते. कारण वडनेरभैरव सह परिसरातील गावे ही द्राक्ष बागांसाठी व टोमॅटो उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. जगाच्या अनेक देशात इथली द्राक्ष व टोमॅटो त्याचबरोबर कांदा निर्यात केला जातो. सध्या तरी पपई या पिकाला देशांतर्गतच मार्केट बाजारभाव मिळाल्याने निर्यातीबाबत तसा विचार केला नसल्याचे श्री. परदेशी यांनी सांगितले. 

Pragatshil shetkari mahendrasingh pardeshi yanchi yashogatha
पिंपळनारे (वडनेर भैरव) येथील प्रगतशील शेतकरी महेंद्रसिंग छगनसिंग परदेशी यांच्या पपई फळबाग भेटी प्रसंगी श्री. नितीन माळी, श्री.संतोष पवार, श्री.सुरेश सलादे व श्री. मिस्तरी

श्री. नितीन दौलतबाबा माळी यांचे मनोगत

  मी फळे व भाजीपाला वाहतूक करणारा शेतकरी असून श्री. परदेशी परिवार हा शेतीनिष्ठ परिवार असून नवीन प्रयोग शेतीमध्ये करणाऱ्यांपैकी ते एक आहेत 

    श्री. महेंद्रसिंग परदेशी यांनी पपई फळबाग उभी केली त्याचा त्यांना नक्कीच चांगला आर्थिक लाभ देखील झालेला आहे. द्राक्षशेती ही आता भूषणावह शेती म्हणून प्रसिद्ध आहे. 

श्री. संतोष आबा पवार यांचे मनोगत

   आज महेंद्रसिंग परदेशी यांच्या पपई फळबागेला भेट दिली. झाडांची उत्पादनक्षमता आणि मिळालेला भाव यामुळे त्यांना त्याचा नक्कीच फायदा झालेला आहे. तरुण शेतकरी हे आता विविध व्यापारी तत्त्वावर फळबागांकडे वळत आहे. नक्कीच हा बदल शेती मधला सकारात्मक बदल म्हणता येईल. त्यांनी दिलेल्या माहितीवरून दोन पैसे शेतकऱ्याच्या हातात मिळण्यास नक्कीच पपई फळबाग उपयोगी पडेल असे जाणवले. 


     पपई फळबाग उत्पादक श्री. महेंद्रसिंग परदेशी पिंपळनारे, वडनेरभैरव परिसरात आमच्याकडे द्राक्षबाग व टोमॅटो आणि कांदे यासारखे नगदी पिकं आम्ही घेत असतो एक प्रयोग म्हणून एक एकर शेतात पपई या फळबागेची लागवड केली. फारसा अनुभव त्यात नव्हता परंतु असे जाणवत आहे की द्राक्ष, टोमॅटो या बागेपेक्षा कमी मेहनतीत योग्य बाजारभाव मिळाला तर नक्कीच या पिकाला चांगले दिवस आहे.

© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
https://mr.quora.com/profile/Deepak-Ahire-5?ch=10&oid=1651193170&share=74b6a2ed&srid=hZHxKh&target_type=user
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

मायक्रोग्रीन शेती व्यवसाय | Microgreen Farming Business : कमी गुंतवणुकीत घरातून जास्त नफा

  🌱 मायक्रोग्रीन शेती व्यवसाय: कमी जागेत जास्त नफा देणारा आधुनिक उद्योग Microgreens Business in Marathi | कमी गुंतवणुकीत जास्त कमाई      ...