जागतिक स्तरावरची उत्कृष्ट वाईन उत्पादक कंपनी : सुला विनयार्ड्स
A world-class wine producing company: Sula Vineyards
नाशिक येथील वाइन उत्पादक कंपनी सुला विनयार्ड्स यांनी आर्थिक वर्ष २०२४ आणि चौथ्या तिमाहीतील आजवरच्या सर्वोच्च महसुलाची घोषणा केली आहे. सुलाचे सीईओ राजीव सामंत यांनी यासंदर्भात माहिती दिली.
श्री. सामंत म्हणाले की सर्वोच्च त्रैमासिक आणि संपूर्ण वर्षाच्या महसुलाचा अहवाल देताना आनंद होत आहे. वाईन पर्यटनातील महसूल सलग पाचव्या तिमाहीत दुहेरी अंकात वाढला आहे.
सुला'तर्फे 'माइलस्टोन सेलार्स' टेस्टिंग रूम
ओझर येथील नाशिक विमानतळाजवळ 'माइलस्टोन सेलार्स' या टेस्टिंग रूमची उभारणी केली आहे.
यॉर्क वायनरीजवळ 'लेक व्ह्यू रिसॉर्ट'
यॉर्क वायनरी परिसरात लेक व्ह्यू रिसॉर्ट सुरू करण्याची घोषणादेखील त्यांनी केली. यामध्ये प्रथमच बँक्वेट हॉल सुविधा उपलब्ध करून देऊ. हा रिसॉर्ट २०२५ च्या मध्यास सुरू होईल. असा अंदाज त्यांनी वर्तविला. रिसॉर्ट खोल्यांची संख्या १०४ वरून १३५ वर पोचणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
वाईन टुरिझमला सर्वोच्च प्राधान्य
येत्या काळात वाईन टुरिझमला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल. म्हणूनच वाइन पर्यटनाचे फूटप्रिंट वाढविण्यासाठी नाशिक विमानतळापासून जवळच 'माइलस्टोन सेलार्स' हा वाइनरी कॅम्पसच्या बाहेरची पहिली टेस्टिंग रूम सुलाव्दारे नुकतीच उघडली आहे.
गुजरात सीमेजवळ टेस्टिंग रूम, रेस्टॉरंट
एन.डी.वाइनचे संपादन विक्रमी वेळेत पूर्ण झाले आहे. यामुळे वाइन पर्यटन व्यवसायाचा आणखी विस्तार होईल. यावर्षी डिसेंबरपर्यंत एनडी वाइनला टेस्टिंग रूम, रेस्टॉरंट आणि बॉटल शॉप उघडण्याचे ध्येय आहे. एनडी वाइन गुजरात सीमेपासून ५० किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर असून वाइन पर्यटनाची प्रचंड क्षमता अससेले ठिकाण आहे. या प्रकल्पासह इतर बरेच येऊ घातले आहे. हा प्रकल्प बघता सुला भारतातील वाईन पर्यटनात आघाडीवर राहील अशी ग्वाही सामंत यांनी दिली आहे.
जानेवारीत विक्रमी पर्यटक
या वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या मोठ्या वीक एंडला अभ्यागतांची संख्या, महसूल आणि टेस्टिंगचा नवीन विक्रम प्रस्थापित केला. यातून चौथ्या तिमाहीत वाइन पर्यटन व्यवसायाने १६.४ कोटी, अशी वार्षिक ३१.३ टक्क्यांची मजबूत महसूल वाढ नोंदविली तसेच डोमेन सुला बेगलुरू, यॉर्क आणि प्रमुख नाशिक वायनरी या तीन कॅम्पसमध्ये ४ लाख ३५ हजार ग्राहकांनी भेट दिली आहे, असे सामंत म्हणाले.
एलिट, प्रीमियम वाईनच्या मागणीत वाढ
सामंत म्हणाले, की प्रिमियमायझेशनच्या प्रयत्नांनी एलिट आणि प्रीमियम वाइनचा हिस्सा ७५.१ टक्क्यांच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला. एलिट, प्रीमियम वाइन्सने या व १५.५ टक्यांनी वाढ नोंदविली. 'सुला'चा आर्थिक वर्ष २०२४ चा निव्वळ महसूल ६१६.४ कोटी रुपये आहे. यात एलिट प्रीमियम वाइनच्या महसुलात १५.५ टक्के वाढ झाली.
लाभांशाची शिफारस
आर्थिक वर्ष २०२४ मध्ये करपश्चात नफा ९३.३ कोटी रुपये झाला आहे. संचालक मंडळाने साडेचार रुपये प्रतिशेअर लाभांशाची शिफारस केली असून आर्थिक वर्षात अंतिम लाभांश साडेआठ रुपये प्रतिशेअर मिळेल.
'रासा कॅबरनेट सॉव्हिग्नॉन' ला आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक
सुला विनयार्डसला "रासा कॅबरनेट सॉव्हिग्नॉन" या वाइनसाठी ग्लोबल कॅबरनेट सॉव्हिग्नॉन मास्टर्स २०२४ मध्ये सुवर्णपदक जाहीर झाले आहे. अतिशय प्रतिष्ठित अशा ग्लोबल मास्टर्स अवॉर्ड्समध्ये कोणत्याही प्रकारात भारतीय वाईनला सुवर्णपदक मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.
इंग्लंड येथील ड्रिंक्स बिझनेस मॅगझिनद्वारे आयोजित केली होती. निवड निष्पक्ष व गोपनीय प्रक्रियेद्वारे केली जात असते. त्यासाठी वाईन उद्योगातील प्रतिष्ठित परीक्षकांच्या पॅनेलद्वारे परीक्षण केले जाते. सुला विनयार्ड्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव सामंत यांनी या ऐतिहासिक कामगिरीबद्दल अभिमान व्यक्त केला.
जागतिक स्तरावरची उत्कृष्ट वाइन
श्री. सामंत म्हणाले, की सुलाच्या २५ व्या वर्धापनदिनादरम्यान फ्लॅगशिप वाइनसाठी हे सुवर्णपदक मिळणे अभिमानास्पद आहे. २०२४ ग्लोबल कॅबरनेट सॉव्हिग्नॉन मास्टर्समधील हा सन्मान पुष्टी करतो, की सुला जागतिक स्तरावर उत्कृष्ट वाइन तयार करत आहे. यातून आम्हाला नावीन्यपूर्ण आणि उत्कृष्ट कार्य सुरु ठेवण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे.
भारतातील रेड वाइन
"रासा" या शृंखलेत सुवर्णपदक विजेते रासा कॅबरनेट सॉव्हिग्नॉन २०२२, रासा सिराज आणि रासा झिंफंडेल यांचा समावेश आहे. ही भारतातील रेड वाइन शिखराचे प्रतिनिधित्व करते. या मालिकेतील प्रत्येक वाईन अत्यंत काळजीपूर्वक तयार केली गेली आहे. आणि ती भारतीय विटीकल्चर आणि वाइन मेकिंगच्या उत्कृष्टतेचा, अत्याधुनिकतेचा पुरावा देत आहे.
जागतिक दर्जाची वाइन उत्पादक कंपनी
सुला विनयार्ड्स ही जागतिक दर्जाची वाइन उत्पादक म्हणून भारताची क्षमता प्रदर्शित करण्यासाठी समर्पित आहे. ग्लोबल कॅबरनेट मास्टर्समधील ही मान्यता आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय वाइनच्या वाढत्या दर्जाला अधोरेखित करण्यासोबत जागतिक स्तरावर ख्याती मिळविणाऱ्या वाइनच्या निर्मितीसाठी मोलाची वचनबद्धता देखील अधोरेखित करते असे त्यांनी नमूद केले.
कृषि क्षेत्रासाठी भारतीय बाजारपेठेतील कृषी रसायने : कीटकनाशके, बुरशीनाशके व तणनाशके Agrochemicals in Indian Market for Agriculture Sector: Insecticides, Fungicides and Herbicides
कृषी क्षेत्रासाठी भारतीय बाजारपेठेतील कृषी रसायने : कीटकनाशके, बुरशीनाशके व तणनाशके या पुस्तकाची सुधारित आवृत्ती असून या पुस्तकाचे लेखक डॉ. बाळासाहेब भगवान भोसले, डॉ. पी.आर.झंवर, प्रा. बी. व्ही. भेदे, प्रा. डॉ. ए.जी. बडगुजर, डॉ ए.एस. जाधव डॉ. दिनेश पं. कुळधर हे आहेत. हे सर्व शास्त्रज्ञ मराठवाडा कृषी विद्यापीठात कार्यरत असून यांना मागील ३५ वर्षांपासून एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अनुभव आहे. आज कीटकनाशकांचा सुरक्षित वापर करणे गरजेचे आहे.
कीटकनाशकांचा वापर करून कीड व्यवस्थापन प्रभावीपणे करता येते. पण कीटकनाशके जेवढी फायदेशीर आहेत. तेवढीच धोकादायकसुद्धा आहेत. कीटकनाशकांचा दुष्परिणाम टाळण्यासाठी गरजेनुसार वापर, किडीनुसार कीटकनाशकांची फवारणी, योग्य कीटकनाशकांचे नावे, मात्रा, फवारणी वेळ आणि पद्धती जर योग्य असेल तर रासायनिक कीटकनाशकांचा वापर करून किडीचे चांगल्या प्रकारे व्यवस्थापन निश्चित करता येते हे या पुस्तकात दिले आहे.
कीडव्यवस्थापनासाठी आवश्यक माहिती, कीटकनाशकांचे वर्गीकरण, कीटकनाशकाचे लेबल क्लेम, कीटकनाशक वापरण्याच्या पद्धती, कीटकनाशकांचा सुरक्षित वापर, पीक सरंक्षण अवजारांची देखभाल, कृषी वापरासाठी रासायनिक कीटकनाशके दिली आहेत. कीटकनाशकाच्या डब्यावरील लेबलिंगमधील माहिती सचित्ररीत्या दिली आहे. कीटकनाशकाच्या विषारीपणानुसार वर्गवारीही यात दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्याला या बाबी सहजपणे कळायला मदत होते. कीटकनाशकाचे नाव, स्वरूप, गट, किडींवर कार्य करण्याची पद्धत, कीटकनाशकाच्या विषारीपणाची तीव्रता, तीव्रतेचा रंग, कीटकनाशकाचे व्यापारी नावे यात सविस्तरपणे नमूद करण्यात आली आहे.
कृषीक्षेत्रासाठी बुरशीनाशके, मिश्र बुरशीनाशके आठव्या प्रकरणात दिली असून बुरशीनाशकाचे नाव, बुरशीनाशकाचा गट, बुरशीनाशकाची कार्य करण्याची पद्धत, बुरशीनाशकाचा विषारीपणाचा तीव्रतेचा रंग, व्यापारी नावे, पिकामध्ये रोग व्यवस्थापनामध्ये वापर या गोष्टी दिल्या आहेत. नवव्या प्रकरणात कृषिक्षेत्रासाठी तणनाशके दिली आहेत. त्यात तणनाशकाचे नाव, तणनाशकाचा गट, तणनाशकाची कार्य करण्याची पध्दत, तणनाशकाचे विषारीपणाच्या तीव्रतेचा रंग, वापरण्याची वेळ, काही व्यापारी नावे यात मुद्देसुदरीत्या दिली आहेत.
शेतकऱ्यांना वातावरणातील बदल, पावसाचा खंड, कीड रोगाचा उद्रेक इ. समस्यांचा सामना करावा लागतो. यामध्ये शेतकरी गोंधळून जातो व कीड रोगांच्या नियंत्रणासाठी प्रामुख्याने कीटकनाशके, विक्रेते यांच्या सल्ल्यावर अवलंबून राहतो. त्यातच कीड- रोग योग्य वेळी न ओळखता येणे, कीटकनाशकाच्या शिफारशी, वापरावयाच्या मात्रा, याबद्दल अपुरी माहिती, शिफारस केलेल्या कीटकनाशकांची व्यापारी नावे इ. प्रश्न पडतात.
या सर्व प्रश्नाची उत्तरे या पुस्तकात आपल्याला मिळतात. यासाठी हे पुस्तक कृषी कीटकशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांनी हे पुस्तक कृषी विस्तार, कार्यकर्ते, विद्यार्थी, शेतकरी यांच्यासाठी तयार केले गेले आहे. हे पुस्तक जळगावच्या गायत्री ऍग्रीकल्चर पब्लिकेशनतर्फे प्रकाशित केले असून पुस्तकाच्या आजतागायत अकरा आवृत्या प्रकाशित झाल्या आहेत. हे पुस्तक प्रत्येक शेतकऱ्याकडे, कृषी सेवा केंद्रधारक, कृषी विद्यार्थी, विस्तार कार्यकर्ते यांच्याकडे असणे गरजेचे आहे.
कृषिक्षेत्रासाठी भारतीय बाजारपेठेतील कृषिरसायने :
कीटकनाशके, बुरशीनाशके व तणनाशके
लेखक :डॉ.बी.बी.भोसले,डॉ. झंवर, प्रा.भेदे, डॉ. बडगुजर, डॉ. जाधव,
सर्वात प्रभावी वाहतूक उपाय : रेलबस (RAILBUS)
Most effective transport solution : Railbus
RAILBUSरेलबस ही ऑटोमोटिव्ह इंजिन असलेली हलकी प्रवासी रेलगाडी आहे. या रेलबसची अनेक वैशिष्ट्य आहेत. रेलबसची डिझाइन १९३० साली बनविली गेली असून विशेषत: रेलबसची बॉडी आणि चार चाके (२ एक्सल) बोगीच्या ऐवजी स्थिर पायावर असतात. रेलबसेस ह्या मोठ्या आकारमानात विकसित झाल्या आहेत.
रेलबसला रेलकारही म्हटले जाते. रेल्वेबस सामान्यतः जर्मनी, इटली, फ्रान्स, युनायटेड किंगडम आणि स्वीडन सारख्या देशांमध्ये वापरल्या जातात. आजच्या रेलबसची डिझाईन आधुनिक, हलकी आणि वैशिष्ट्यपूर्ण डिझाईन्सने घेतली आहे. आधुनिक डिझेल व इलेक्ट्रिक रेलकार या अनेक युनिट्सच्या रूपात चालवल्या जातात.
रेलबस वाहनांची प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत रेलबस ही सौरऊर्जेवर चालणारी आहेत. रेलबसचे सर्व ट्रॅक अत्याधुनिक सोलर पॅनेलने कव्हर केले आहेत. हे केवळ कार्बन उत्सर्जन कमी करत नाही तर एक सातत्यपूर्ण, किफायतशीर ऊर्जा पुरवठा सुनिश्चित करते.
रेलबसचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे प्रगत डिझाईन होय. शहरी लँडस्केपसाठी अनुकूल केलेली आकर्षक अशी आधुनिक डिझाइन आहे. वायुगतिकीय रचनेमुळे प्रवाशांना जास्तीत जास्त आराम मिळतो. बाहेर लक्ष दिल्याने शहराचे सौंदर्य बघता येते. प्रशस्त आणि प्रवेशयोग्यता हे रेलबसचे अजून एक वैशिष्टय आहे. रेलबसमध्ये बसण्यासाठी आणि उभे राहण्यासाठी प्रवाशांना आरामदायी सुविधा आहे. अपंग व्यक्तीना सुद्धा यात सुविधा दिल्या आहेत.
रेलबसमध्ये पर्यावरणाशी बांधिलकीनुसार पुनर्वापर करण्यायोग्य आणि पर्यावरणास अनुकूल सामग्री वापरली जात असल्यामुळे टिकाऊपणा जोपासला जातो. रेलबस वाहने कमीत कमी आवाजात चालण्यासाठी डिझाइन केलेली आहेत यामुळे शहरी भागात कमी आवाजाचे प्रदूषण होते. हे वैशिष्ट्य दाट लोकवस्ती असलेल्या शहरांमध्ये विशेषतः फायदेशीर आहे जेथे ध्वनी प्रदूषण ही एक महत्त्वाची चिंता आहे.
उच्च कार्यक्षमता आणि विश्वासार्हता रेलबसची वैशिष्ट्य आहे. ते अद्ययावत तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत म्हणून रेलबस शहरी सार्वजनिक परिवहनाच्या सर्व मागण्या पूर्ण करतात. रेलबसमध्ये सर्वांगीण सुरक्षितता आहे. रेलबसमध्ये प्रवाशांसाठी सुरक्षित आणि आश्वासक वातावरण प्रदान करतात. रेलबसमध्ये २४ प्रवाशी बसून तर १६ प्रवाशी उभे राहून प्रवास करू शकतात.
रेलबसचा प्रवाशांना खूप फायदा होतो. भारतीय रेल्वे शाखा मार्गांवर अनेक रेल्वेबस चालवते. प्रवासी वाढल्यामुळे या रेल्वेबसची जागा ईएमयूने घेतली आहे. कालका-शिमला मार्गावर (ट्रेन क्रमांक ७२४५१), मथुरा ते वृंदावन (ट्रेन क्रमांक ७२१७५) आणि मेट्रो जंक्शन ते मेट्रो सिटी (ट्रेन क्रमांक ७४८०४) तसेच इतर मार्गांवर रेलबस आहे.(Source: www.railbus.com)
कराल कृषीपर्यटन,तर आनंदी होईल तन आणि मन... If you do agritourism, your body and mind will be happy...
शेती आणि पर्यटन यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणजे कृषीपर्यटन होय. कृषिपर्यटनाची जागतिक स्तरावर ओळख होऊन कृषिपर्यटनाला चालना मिळावी म्हणून १६ मे हा दिवस जागतिक कृषिपर्यटन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यानिमित्त काही लोकप्रिय कृषिपर्यटन केंद्राची ओळख...
गेली अनेक शतके भारताची संस्कृती ही जगामध्ये कृषी संस्कृती या रूपानेच ओळखली जाते. भारत हा कृषिप्रधान देश असून देशाच्या विकासामध्ये शेतीचा प्रमुख वाटा आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा विकास होण्यासाठी शेतीकडे व्यवसाय म्हणून बघणे गरजेचे झाले आहे. आणि त्यासाठी पूरक व्यवसायाची जोड देणे आवश्यक ठरते. शेतीच्या पारंपारिक व्यवसायाबरोबर शाश्वत उपाय म्हणून कृषीपर्यटन हा पर्याय पुढे आला आहे. शहरी भागातील नव्या पिढीला जुन्या ग्रामीण संस्कृतीची ओळख करून देण्याबरोबरच खेड्यातील शेतकरी वर्गाला उत्पादन रोजगार व अर्थसहाय्य मिळून देण्याचा व्यापक दृष्टिकोन कृषीपर्यटन या संकल्पनेमध्ये आहे. शेती आणि पर्यटन यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणजे कृषीपर्यटन होय.
आजच्या धावपळीच्या जीवनात विज्ञानयुगात पर्यटनाला विशेष महत्व प्राप्त झालेले आहे. कित्येक देशात तसेच देशांतर्गत अनेक भागामध्ये ऐतिहासिक किल्ले, धरणे, पुरातन वास्तू यांचा उपयोग सध्या पर्यटनासाठी करण्यात येत आहे. परंतू आता ग्रामीण भागातील संस्कृती, निसर्ग, पशुपक्षी, ग्रामीण भागातील जीवनशैली ही शहरी भागामध्ये पहावयास मिळत नाही. त्यामुळे धावपळीच्या जीवनात विरंगुळा म्हणून शहरी भागातील जनता आता ग्रामीण भागातील या जीवनशैलीकडे पर्यटन म्हणून पाहू लागली आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी कृषि पर्यटन हा एक पुरक व्यवसाय म्हणून नावारुपाला आलेला आहे.
शहरी जीवनात दैनंदिन ताणतणाव कमी करण्यासाठी शहरातील नागरीक राज्याच्या विविध भागात शेतक-यांनी सुरु केलेल्या कृषिपर्यटनाला प्राधान्य देताना दिसत आहेत.आणि त्यांची पावले आपोआपच ग्रामीण भागातील कृषि पर्यटनाकडे वळू लागली आहेत. ग्रामीण जीवनशैलीचे शिक्षण आणि करमणूक हे दोन्ही हेतू मनात ठेऊन कृषिपर्यटन साधणे शक्य आहे.
कृषी व्यवसाय हा भारतीय संस्कृतीचे अविभाज्य अंग असून महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांची तर शेती ही केवळ उपजीवीका नसून जीवनशैली आहे. राज्यातील सुमारे ५५ ते ६० टक्के लोक प्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून आहेत. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा विकास फलोत्पादन, दुग्धव्यवसाय, शेळी व मेंढी पालन, कुक्कुटपालन, रेशीमउद्योग, मधुमक्षिकापालन, मत्स्यव्यवसाय इ. कृषि संलग्न विषयाचा एकत्रित विचार करुन विकास घडवून आणल्यास ग्रामीण भागामध्ये कृषिपर्यटनाला निश्चितपणे चालना मिळू शकते.
आजमितीस कृषिपर्यटन संदर्भात शासनाची कोणतीही स्वतंत्र योजना अस्तित्वात नाही. त्याकरिता फलोत्पादन तसेच इतर संलग्न विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना एकत्रित करून शेतकऱ्यांना त्याचा लाभ दिल्यास ग्रामीण भागामध्ये कृषि पर्यटन केंद्र विकसित होणे सहज शक्य आहे. कृषिपर्यटन हा जगातील अतिशय वेगाने वृध्दींगत होणारा व्यवसाय ठरत आहे. महाराष्ट्रात अशी उल्लेखनीय कृषीपर्यटन केंद्र आहेत. त्या ठिकाणी भेट देणे गरजेचे आहे.
महाराष्ट्रात अशी लोकप्रिय कृषिपर्यटन आहेत.सह्याद्री पर्वतरांगांच्या पायथ्याशी आणि उल्हास नदीच्या कुशीत, सगुणा बाग हे ५५ एकरचे सुंदर शेत नेरळ, कर्जत, मालेगावला वसलेलं आहे. सगुणा डेअरी या नावाने स्वातंत्र्यापूर्वी ओळखले जाणारे हे शेत साधारणपणे १९६० नंतर "सगुणा बाग" या नावाने ओळखायला सुरुवात झाली आणि तेव्हापासूनच शेती आणि शेतीसंबंधी कार्यामध्ये सगुणाबाग काम करत आहे. कृषीपर्यटन या संकल्पनेचा जन्म सगुणा बागेमध्ये १९८५ साली झाला. आणि आत्तापर्यंत त्यात अनेक बद्दल सुद्धा झाले. सध्या "सगुणाबाग" हे सर्वात लोकप्रिय असे कृषी पर्यटन केंद्र शहरी बांधवांसाठी झाले आहे. सध्या हजारोच्या संख्येने पर्यटक विद्यार्थी आणि शेतकरी सगुणा बागेला भेट देतात आणि ग्रामीण जीवनाचा आनंद घेतात.
योरामा- मायारा कृषी पर्यटन केंद्र हे नागपूर विभागातील गडचिरोली जिल्ह्यातील नवरगाव येथे विकसित केले आहे. या कृषी पर्यटन केंद्राच्या संचालिका सौ.मंजुषा योगेंद्र मोडक या आहेत.
या कृषी पर्यटनात त्यांनी विदेशी पर्यटकांना आकर्षणाचे केंद्र असणाऱ्या पोर्ला इस्टेट राजा नवाब मिर युसुफ अली यांचे म्युझियम नवरगाव येथे उभारणी केली आहे. येथे त्यांनी शेकडो दुर्मिळ विविध प्रकारच्या देशी वाणाच्या झाडांची लागवड केली आहे. यामुळे पूर्वी विरळ दिसणाऱ्या पक्षी, फुलपाखरे, मधमाशांचे पोळे यात मोठ्या संख्येने वाढ होऊन पर्यटकांचे नंदनवन उभे केले आहे. येथे शेळीपालन, ससेपालन, मत्स्यपालन, फळबाग, सेंद्रिय पीक शेती इ. विविध प्रकल्प आहेत.
मोठ्या शहरातील वाढती वर्दळ, प्रदूषण यामुळे प्रत्येक कुटुंब हे मानसिक तणावाखाली राहत आहे. मानसिक ताण कमी करण्यासाठी अनेकांची पावले गावातील निसर्ग आणि शेतीतील शांत ठिकाणाकडे वळत आहे. असेच शांत आणि निसर्गरम्य ठिकाण मुंडवडा कृषीपर्यटन केंद्र आहे. अमरावती जिल्ह्याच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यात मुंडवाडा या गावात हे केंद्र आहे. या केंद्राची स्थापना श्री. निलेश खेडकर यांनी केली.
मॉन्टेरिया व्हिलेज हा एकूण ३६ एकरचे कृषी पर्यटन आहे. ह्या कृषि पर्यटनाची सफर तुम्हाला तुमच्या गावापर्यंत घेऊन जाईल असा अनुभव येतो. मुंबई आणि पुणे या दोन्ही ठिकाणांहून दोन तासांच्या अंतरावर कर्जत, कलोते येथे वसलेले हे ठिकाण आहे. सर्व वयोगटातील लोकांसाठी गावातील जीवनाचा संपूर्ण अनुभव या ठिकाणी घेता येतो. शांत वातावरण निसर्गाची पार्श्वभूमी लाभलेले हे सुंदर ठिकाण आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी जवळील घारपी हे गाव आहे. त्या ठिकाणी कन्नई कृषी पर्यटन केंद्र आहे. कन्नई ऍग्रो टुरिझम सेंटरमधील हिरवेगार आणि समृद्ध शेतीचे निरीक्षण हा एक सुंदर आणि मनोहारी क्षण आहे. या ठिकाणी काजू, नारळ, संत्रा, भुईमूग, सुपारी, जॅकफ्रूट, सिल्व्हर ओक, एवोकॅडो आणि रॅम्बुटन ही झाडे येथे विपुल प्रमाणात आहेत. कन्नई ऍग्रो टुरिझमच्या सत्तर एकर परिसरात लेमनग्रास, अननस, स्ट्रॉबेरी, संत्रा, केळी, कॉफी, कांदा, बटाटा, टोमॅटो, लसूण, आले आणि आंबा यांची मोठी लागवड आहे. याशिवाय अद्वितीय औषधी गुणधर्म असलेल्या जगातील काही दुर्मिळ वनस्पती आणि झाडे देखील येथे तुम्हाला पाहावयाला मिळतील.
निसर्गाच्या सानिध्यात , ग्रीशास कृषी पर्यटन केंद्राची स्थापना नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील घोगली गावात केली आहे. या केंद्राचे संचालक सतीश नानाजी मोहोड हे आहेत. सदर पर्यटनाच्या ठिकाणी सेंद्रिय तसेच जैविक खताचा वापर करून ग्रीननेट व शेडनेटमध्ये घरगुती भाजीपाला, गुलाब इ. प्रकारचे उत्पादन घेण्यात येतात. पर्यटकांच्या मनोरंजनाकरीता स्विमिंग पूल, रेन डान्स, कॅनल व सिंगिंग प्लॅटफॉर्म, खेळण्याकरिता प्रशस्त जागा, उद्यानासह तसेच लहान मुलांना खेळण्याकरिता विविध प्रकारची खेळणी व मनोरंजनाकरिता विविध साधन सामुग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. या कृषीपर्यटन केंद्रात रात्रीच्या मुक्कामासाठी राहण्याकरिता उत्तम व्यवस्था आहे.
चैतन्य कृषी-पर्यटन आणि साहसी उद्यान हे निसर्गाच्या सान्निध्यात छत्रपती संभाजीनगर जवळील गंगापूर गावात वसलेले आहे. सुटीचा आनंद मिळवण्यासाठी,तुमचा शनिवार व रविवार घालवण्यासाठी हे एक इको-फ्रेंडली ठिकाण आहे. हिरव्यागार वातावरणाने वेढलेला परिसर जिथे तुम्हाला शुद्ध हवा अनुभवता येईल. येथे गायपालनाचा प्रकल्प आहे. या कृषिपर्यटन केंद्रात तुम्ही मातीच्या चुलीवर बनवलेल्या स्वादिष्ट ग्रामीण जेवणाचा आस्वाद घेऊ शकता. या ठिकाणी जैवविविधता असून निसर्ग आणि प्राणी प्रेमींसाठी एक शांत निसर्गानुकूल जागा आहे. गेल्या नऊ वर्षांपासून येथे सेंद्रिय शेती केली जाते. चैतन्य कृषीपर्यटनात मातीच्या घरात राहण्याचा अनुभव घेता येतो.
श्री रामबाग कृषी पर्यटन केंद्र हे परभणी जिंतूर रोडवरील धर्मपुरी येथे आहे. या केंद्राचे संचालक डॉ. संजय टाकळकर हे आहेत. २६ एकरमध्ये हे कृषी पर्यटन असून येथे शिवारफेरी, आयुवेर्दिक गार्डन, तारांगण, फळ लागवड, पशुपालन केले आहे. अनंत हेरिटेज कृषी पर्यटन केंद्र हे यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यात मौजे झुंजारपूर येथे आहे. वडिलोपार्जित ५० एकर शेतीत कृषिपर्यटन असून येथे वर्हाडी पद्धतीचे जेवण मिळते. तूर, कापूस, सोयाबीन, हळद यांची पिके, सेवा सुविधा लक्झरीयस आहेत. येथे जवळच टिपेश्वर अभयारण्य असल्यामुळे वन्यजीव पर्यटक येतात. त्यामुळे येथे कृषी पर्यटकाबरोबर वन्यजीव पर्यटक नेहमी मोठ्या संख्यने येत असतात.
सोलापूर जिल्ह्यातील पाकणी येथे अभिषेक मळा कृषीपर्यटन केंद्र आहे. निसर्गरम्य परिसरात आपलं घर असावं अशी प्रत्येकाची सुप्त इच्छा असते. नेत्रसुखद असा परिसर नजरेत भरून घेत छान हुरड्याचा अन् भोजनाचा आस्वाद घेत आयुष्यातील काही क्षण घालवावेत असे प्रत्येकाला वाटते. त्या प्रश्नांचे उत्तर अभिषेक मळा कृषी पर्यटन केंद्राकडे असावे असे मला वाटते
नेचरब्लिस कृषी पर्यटन केंद्र हे वाशीम जिल्हा, कारंजा लाड तालुक्यातील मानाभा या गावी वसलेले आहे. या ठिकाणी सेंद्रिय शेती केली जाते. नेचरब्लिस ऑरगॅनिक फार्म या अंतर्गत कृषी पर्यटन, सेंद्रिय शेती, सेंद्रिय बियाणे बँक, अन्न प्रक्रिया युनिट्स, शेतकऱ्यांसाठी इडीपी केंद्र इ.शेती व्यवसायाचे सर्व पैलू आहेत. हा प्रकल्प भारतातील ‘नेक्स्ट जनरेशन फार्मर’चे उत्कृष्ट प्रदर्शन असल्याचे लक्षात येते. हा एक आदर्श कृषिपर्यटन प्रकल्प असून जो तरुण आणि महिलांसाठी अधिक व्यवसाय संधी निर्माण करून ग्रामीण भारतातील दारिद्र्य निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवत असल्याचे प्रकल्प प्रमुख श्री.राहुल देशमुख यांनी सांगितले.
आनंद कृषी पर्यटन केंद्र हे सातारा येथून १८ कि.मी.अंतरावर बोरगाव येथे आनंद कृषी पर्यटन वसले आहे. या कृषी पर्यटनात उन्हाळ्यात आरामदायी खेळ खेळले जातात. या कृषी पर्यटनात स्विमिंग पूल असून यावेळी विनामूल्य स्विम सूट येथे दिला जातो. रेन डान्स, रोलर बॉल डान्सिंग, बोटिंग, धबधबा, फोटोसेशन, गार्डन सेल्फी पॉइंट्स, चिल्ड्रन पार्क स्विंग्स, फनी राईड्स, रोपवे, स्लाइडिंग पूल, ट्री हाऊस, फनी मिरर, (भुलभुलैय्या), संतदर्शन, लॉन, जेवणाची उत्तम सोय आहे. या वेळी नाश्त्यासह चहा, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण मिळते. आनंद कृषी पर्यटनात शेकडो वृक्ष आहेत. निसर्गाच्या सहवासात दिवस कसा निघून जातो ते कळत नाही. आनंद कृषी पर्यटनाला भेट देणे हे आनंददायक अनुभव असल्याच्या अनेक पर्यटकांच्या प्रतिक्रिया आहेत.
स्वग्राम हे आयुर्वेद,योग,निसर्ग,कृषीपर्यटन आणि जैवविविधता केंद्र आहे. आयुर्वेद, योग आणि नैसर्गिक शेती हे जगातील पहिली नैसर्गिक जीवनशैली आहे. या कृषिपर्यटन केंद्रात रोगग्रस्त व्यक्तीसाठी नैसर्गिक वैद्यकीय प्रणाली समाविष्ट आहे. मुख्यत्वे आयुर्वेद, योग आणि नैसर्गिक शेती ही ज्ञान, शास्त्र, तंत्र, कर्मक्रिया-कार्य, खेळ, कला, उत्सव समारंभ या विविध उपक्रमाद्वारे हे कृषिपर्यटन राबवले जाते. पूर्वीची १२ बलुतेदारांची वस्तुविनिमय प्रणाली येथे पाहावयास मिळते. हे कृषिपर्यटन पुणे जिल्ह्यातील लवळे, मुळशी येथे वसलेले आहे.
शिवपर्व कृषिपर्यटन केंद्र नाशिक जिल्हा, देवळा येथील वाजगाव येथे आहे. हे केंद्र ७० एकरावर पसरलेले आहे. या कृषिपर्यटन केंद्रात स्विमिंग, बोटींग, रेनडान्स, आर्टीफिसियल फॉल्स आहेत. शिवारफेरी, घरगुती चुलीवरचे जेवण, मनोरे, देशी गायीची गोशाळा, फळबागा या सुविधा या कृषिपर्यटन केंद्रात आहेत. शिवपर्व कृषिपर्यटन केंद्रात नारळ, आंबा, सिताफळ, पेरू, चिक्कू, द्राक्ष, डाळिंब, सफरचंद,आवळा, अंजिर, लिंबू, जांभूळ इ. फळपिके बागा आहेत. या ठिकाणी सर्व प्रकारचे अन्नधान्य, ऊस, कांदे, भाजीपाला या कृषी पर्यटन केंद्रात पाहावयास मिळतो.
नाशिक जिल्हा, सुरगाणा तालुक्यातील गारमाळ येथील श्री.हर्षल देवराम थविल यांनी रानझोपडी कृषीपर्यटन केंद्राची स्थापना केली. या कृषिपर्यटन केंद्रात कॉफ़ी, कोको,अमेरिकन सुपरफूड अवाकाडो, लिची, ड्रॅगन फ्रूट, चिकू, पपई, फणस, सीडलेस लिंबू, थायलंड चेरी, गुलाबी फणस, सफेद जांभूळ, स्टार फ्रुट, इलिफंट अँपल, पेरु, हापूस आंबे, मँगो स्टीन, सीताफळ, केळी इ. झाडांसह कमळाचे व कुमुदिनीचे वेगवेगळ्या १३ प्रकारांची लागवड केली. माळरानावर नामशेष होणाऱ्या रानभाज्याची लागवड केली त्यानंतर हळूहळू पाण्याचे छोटे छोटे तलाव, विविध झाडे, गवतफुले, छोटीशी झोपडी, वारली चित्रकला इ. गोष्टी उभारुन कृषीपर्यटन केंद्र उभे केले.
एक दिवसीय सहल, कौटुंबिक सहली आणि कॉर्पोरेट सहलीसाठी सुप्रसिद्ध ठिकाण असलेले मामाचा मळा कृषी पर्यटन केंद्र आहे. हे केंद्र नगर-सोलापूर महामार्गावरील रुईछत्तीशी येथे अहमदनगरपासून फक्त २५ कि.मी. अंतरावर आहे. मामाचा मळा पर्यटकांना वास्तववादी ग्रामीण संस्कृतीचा अनुभव देतो. सात एकरांपेक्षा जास्त असलेला हिरवागार निसर्गरम्य मामाचा मळा खरोखरच विलक्षण आहे. हा मळा लहान मुलांसाठी आणि प्रौढांसाठी खूप मनोरंजक ठरत असल्याचा अनुभव आहे.
सांगली जिल्ह्यातील मिरज येथील मधुबन कृषी पर्यटन केंद्र हे महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट कृषी पर्यटन केंद्र आणि सर्वोत्तम एक दिवसीय पिकनिक स्पॉट आहे. लोक इथे येऊन समाधानाने आपला वेळ घालवू शकतात. दैनंदिन जीवनातील डोकेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी मधुबन कृषी पर्यटन केंद्र हा सर्वोत्तम पर्याय आहे. त्यामुळे कोणीही कुटुंबासह येथे राहू शकतो, खेळ खेळू शकतो, गावातील जीवन विलक्षण आनंदाने जगू शकतो. स्वादिष्ट भोजन आणि प्रीमियम सेवा ही या पर्यटन केंद्राची खासियत आहे. या सर्व कृषिपर्यटन केंद्रांना नाशिक येथे कृषीथॉन प्रदर्शनात आदर्श कृषिपर्यटन केंद्र म्हणून गौरविण्यात आले आहे.