name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): October 2022

भोवाडा (Village Program : Bhovada)

भोवाडा (Village Program : Bhovada)

       आपला भारत देश हा खेड्यापाड्यात वसलेला आहे. ग्रामीण परिसर हा भारताचा आत्मा आहे. या ग्रामीण परिसरात राहणाऱ्या लोकांच्या काही रुढी आहेत, काही परंपरा आहेत. हे ग्रामीण लोक या रूढीपरंपरांना अभिमानास्पदरीत्या चिकटून बसलेले आहेत. सालाबादप्रमाणे गावात वर्षातून एकदा यात्रा भरणे हा रूढी परंपरेचाच एक भाग आहे आणि एकदा गावाची यात्रा म्हटली की, लोकांच्या उत्साहाला उधाण येत असते. गावची यात्रा दहा-बारा दिवस पुढे असते तेवढ्यात गावात काय कार्यक्रम करायचे ते गावातील प्रतिष्ठित लोक ठरवीत असतात अशा रीतीने कार्यक्रमाची रूपरेषा आखल्यानंतर हे लोक संपूर्ण गावातून वर्गणी (देणगी) जमा करतात. त्या वर्गणीतून काही करमणुकीचे कार्यक्रम ठेवत असतात. या कार्यक्रमांमध्ये भोवाडा किंवा तमाशा असे मनोरंजनाचे कार्यक्रम असतात.

Bhovada


भोवाड्याचा कार्यक्रम

       होळीच्या अगोदर ज्या गावात यात्रा भरते तेथे शक्यतो तमाशाचा कार्यक्रम असतो. मात्र होळीनंतर म्हणजे अक्षय्यतृतीयेच्या वेळेला जर यात्रा येत असेल तर तिथे भोवाड्याचा कार्यक्रम होतो. कारण भोवाडा तयार करायला बरेच कष्ट घ्यावे लागतात. व उन्हाळ्यात लोकांना शेतीची कामे फारशी नसतात त्यामुळे ते मनोरंजनासाठी भोवड्याचा कार्यक्रम करीत असतात. भोवाड्याचा कार्यक्रम हा मुख्यतः तीन दिवसात विभागलेला असतो. भोवाड्यात रावणाचे पात्र बरेच मोठे असल्याने रावणाचे पहिला रावण, दुसरा रावण व तिसरा रावण असे विभाजन केलेले असते. हा भोवाडा आदिवासी भागात मात्र वेगळ्या पद्धतीने होतो. तेथे पाच दिवसांचा भोवाडा असतो. आणि तो भोवाडा हा देवीचा असतो. मात्र आपल्या ग्रामीण भागात जो भोवाडा होतो त्यातून मुख्यतः रामायणच दाखवीले जाते.  या भोवाड्यातून मुख्यतः दोन हेतू साध्य केले जातात. त्यातला पहिला म्हणजे यात्रेच्या निमित्ताने लोकांची करमणूक करणे आणि दुसरा म्हणजे या भोवाड्यातून लोकांना रामायणाची कल्पना करून देणे. कारण पूर्वी सुशिक्षितांचे प्रमाण कमी होते त्यामुळे ग्रंथ वाचणे आणि लिहिणे अत्यंत कठीण होते. आणि त्याचबरोबर या लोकांच्या मागे शेतीची कामे असल्यामुळे त्यांना वाचण्यास वेळ नसे. त्यामुळे भोवाड्याच्या ह्या तीन दिवसात लोकांची करमणूकही केली जात असे आणि यातून लोकांना रामायण कसे घडले? राम कोण होता? कसा होता? रावण कोण, कसा होता? इत्यादी गोष्टींचे आकलन होत असे.

भोवाड्याचे विभाजन  

    आपल्या ग्रामीण भागातल्या ह्या भोवाड्याचे विभाजन तीन दिवसात केलेले असल्यामुळे ह्या भोवाड्याची सुरुवात पहिल्या दिवशी गणपतीची पूजा वगैरे करून, नारळ फोडून केली जाते. सुरुवात झाल्यानंतर त्या दिवशी विविध प्राण्यांची सोंगे बाहेर येत असतात. या सोंग्यांमध्ये अस्वल, हरीण, माकड इत्यादी प्राण्यांचे मुखवटे तयार करून तशा प्रकारची वेशभूषा केलेली असते. मुखवटे कागदाचा लगदा करून त्यात डिंक टाकून तयार केलेली असतात. ज्या व्यक्तीने हे सोंग घेतलेले असते त्या व्यक्तीला ते वैयक्तिक खर्चाने करावे लागते किंवा भाड्याने आणावे लागते. पहिला दिवस हा सुरुवातीचा असल्यामुळे त्या दिवशी थोडीच सोंगे बाहेर येतात. पहिल्या दिवसाचा कार्यक्रम हा रात्री १२ ते १२.३०पर्यंत चालत असतो.

रात्रभर चालणारा सीतास्वयंवर 

        दुसऱ्या दिवसाचा कार्यक्रम हा करमणुकीच्या दृष्टीने मजेदार व आकलनाच्या दृष्टीने अतिशय उत्कृष्ट असतो. ह्या कार्यक्रमाला एक विशिष्ट असा ग्रामीण शब्द आहे. तो म्हणजे ' सीता सैवर' (सीतास्वयंवर) या दिवशी संपूर्ण रात्रभर कार्यक्रम चालतो. सुरुवातीला राम,लक्ष्मण व सीता ही पात्रे येतात.  पात्राच्या संभाषणासाठी विशिष्ट अशी जागा ठेवलेली असते. या विशिष्ट जागेतच ही पात्रे फिरत असतात. व संभाषण चालू असते. राम-लक्ष्मण व सीता हे एकमेकांच्या हातात हात घालून फिरत असतानाच चित्रविचित्र रूप घेतलेले आग्यावेताळाचे पात्र येते. ते बेसुमार किंचाळात नाचत असते. त्याच्या हातात पेटती मशाल असते. त्यानंतर शबरीचे पात्र येते. 

       शबरीचे व रामाचे संभाषण चालत असतानाच मारीच राक्षस सुंदर अशा हरणाच्या वेषात येतो. व त्याला मारण्यास राम- लक्ष्मण बाजूला जाताच बैराग्याच्या  वेषातील पहिला रावण हा सीतेला पळवून नेतो. त्यावेळेला सीतेचे किंचाळणे अतिशय हृदयभेदक असते. सीता व बैराग्याच्या वेषातील रावण ही पात्रे निघून गेल्यानंतर राम-लक्ष्मणाचे अतिशय शोकपूर्ण संभाषण होते. त्याचवेळेला त्यांना गरुड पक्षाचे सोंग भेटते. त्यानंतर मारुतीचे सोंग येते. मारुतीची राम-लक्ष्मणाशी भेट होते. मारुती सीता शोधासाठी निघून जातो. त्यानंतर वाली, सुग्रीव ही पात्रे येतात. त्यानंतर वेगवेगळी राक्षसपात्रे बाहेर येतात आणि त्यानंतर पहिला रावण बाहेर येतो. त्याचे संभाषण होते व शेवटी त्याच दिवशी सीतेचा शोध लागतो. अशारीतीने संपूर्ण रात्रभर अतिशय मनोरंजनात्मक असा कार्यक्रम होतो.

भोवाड्याचा शेवट

       त्यानंतरचा तिसरा दिवस हा भोवाड्याचा शेवटचा दिवस असतो. हा दिवस सर्वात रोमांचकारी दिवस असतो. ह्या दिवशी दुसरा रावण व तिसरा रावण हे एकत्र पात्र एका ताटीला दहा मुखवटे लावून ते हातात घेऊन नाचत असतात. रावणाच्या संभाषणाची एक विशिष्ट जागा असते. तिला ग्रामीण शब्द कचेरी असा आहे. रावण या कचेरीवर चढल्यावर त्याच्या पायांचा होणारा आवाज व तोंडातून निघणारा आवाज यामुळे एक भारदस्तपणा येतो. जो राक्षस म्हणून शोभू शकेल त्याच्याबरोबर सुरुवातीला विभीषणाचे संभाषण होते. याला थोडक्यात 'विभीषण शिष्टाई' असे म्हणतात. विभीषणाच्या संभाषणातून रावणाने आत्तापर्यंत काय केले व त्याचे फळ त्याला काय मिळाले याचे रसपूर्ण वर्णन यात व्यक्त होते. त्यासाठी श्लोककाराने घातलेले संभाषण असे..
रावणा रावणा तू राज्य गंभीर केले l
सीतेसारखे रत्न तू चोरून नेले ll
सीतेसारखे रत्न तुला पचेना 
चौदा चौकडी राज्य तुला मिळेना ll
यातून रावणाचे चारित्र्य लोकांना कळते. हे संभाषण झाल्यानंतर रावणाबरोबर अंगतचे संभाषण चालते. याला 'अंगत शिष्टाई' असा शब्द आहे.

रावणाचा वध

        अशा पद्धतीने 'अंगत शिष्टाई' पर्यंत सर्व इतर राक्षसांचा संहार झालेला असतो. आणि शेवटी फक्त रावण शिल्लक राहतो. तो कचेरीवरून खाली उतरतो. सुरुवातीला ताटी घेऊन तुफान नाचतो. त्याच्याबरोबर इतर सोंगे नाचतात. त्यात वानरसेना भरपूर असते आणि पहिल्या व दुसऱ्या दिवशी जी पात्रे बाहेर आलेली असतात त्यातून जी मेलेली असतात ती पात्रे सोडून सर्वच पात्रे बाहेर येतात. त्यावेळेला ही पात्रे भरपूर नाचतात. नाचता - नाचता ते भांडण खऱ्या अर्थाने रावणाविरुद्ध इतर सर्वच पात्रांचे असते. सुरुवातीला रावण सर्वच पात्रांना पुरून उरतो. हा संघर्ष बराच वेळ चालतो आणि नंतर रामाकडून रावणाचा वध होतो आणि ह्या भोवाड्याची सांगता होते.

       अशा पद्धतीने पहिल्या दिवशी गणपतीची पूजा वगैरे करून सुरू झालेला हा भोवाडा तीन दिवस लोकांचे मनोरंजन करून तिसऱ्या दिवशी पहाटे रावणाचा वध झाल्यानंतर संपतो. ह्या भोवाड्यामुळे गावातील सर्व लोक एकत्र येतात. मोठ्या आनंदोत्सवात हा भोवाड्याचा कार्यक्रम होतो. भोवाडा संपल्यानंतर त्याच दिवशी कुस्त्यांचा कार्यक्रम होतो व गावातील लोकांची यात्रा संपते.

भोवाडा
खेड्यापाड्यात वसलेला देश माझा
करमणुकीसाठी होतो भोवाडा,
तीन दिवसात विभागलेला कार्यक्रम
पाहण्यासाठी जमतो अख्खा गावगाडा....

पूर्वी करमणुकीसाठी नव्हते काही साधन
भोवड्यातून सादर व्हायचे रामायणाला,
शेतकरी समाज शेतीत रममाण
भोवाड्याच्या निमित्ताने यायचा जागरणाला....

विविध प्राण्याची सोंगे भोवड्यात असतात
दुसऱ्या दिवशी असते सीता स्वयंवर,
हुबेहूब चितारले जाते रामायणातील पात्र
राक्षस संहाराने उठते येथे आनंदी लहर....

सुरुवातीला रावण उरतो पात्रांना उरून
संघर्ष हा बराच वेळ चालतो,
रामाकडून होतो रामाचा वध
तेव्हा भोवाड्याचा आनंदोत्सव संपतो...

© दीपक केदू अहिरे, नाशिक


© दीपक केदू अहिरे, नाशिक



मना गावनी जत्रा (अहिराणी कविता)My Village Fair (Ahirani poem)

मना गावनी जत्रा  
(अहिराणी कविता)

My Village Fair (Ahirani poem)

My Village Fair


मना गावनी जत्रा
घुमाडतस काठी,
देवमाऊलीसले निवतनं
म्हसोबा ह्रास सदा पाठी...


मना गावनी जत्रा
तमाशा रंगस रातले,
चावदस व्हस् साजरा
मांसाहार ह्रास दुपारले...


मना गावनी जत्रा
कधी दुकान जिलेबीनं,
सर्वा गावना गोतावळा
कसे व्हस एकमेकले भेटणं...


मना गावनी जत्रा
अखंड परंपरा से इथली,
आख्खं गाव फोडस नारळ
मज्जा ह्रास आठे कितली...


© दीपक केदू अहिरे, 

आनंदपुर

#Kavita 

#Marathi Kavitra

#Marathi Poem

#marathikavita

#marathi kavita

#Kavi

#marathi kavi




श्वास पुन्हा थांबला (Breathing stopped again)

पुन्हा श्वास थांबला
Breathing stopped again



हाता तोंडाशी येणारे पीक
ढगफुटी झाली गावाला,
ऐकून शेतमजुराचा निरोप
पुन्हा माझा श्वास थांबला....

पोटच्या पोरावानी जपतो
शेतकरीदादा आपल्या पिकाला,
ओल्या दुष्काळाने भरला नाला
ऐकून माझा श्वास थांबला....

पीक कापून करणार होतो दिवाळी
पावसात सारे पीक वाहिले,
स्वप्नांची झाली राख रांगोळी
कवितेतून दुःख आता मांडले....

मायबाप सरकारबरोबर मेघराजा रुसला
काढणीला आलेल्या पिकात कोसळला,
नुकताच लागवड केलेला कांदा बघून
श्वास माझा मधल्या मध्ये अडकला...

© दीपक केदू अहिरे, नाशिक




शेळीपालन (Goat farming)


शेळीपालन 
Goat farming


Goat farming


शेळी आहे 
गरीबाची गाय,
हा धंदा आहे 
दुधावरची साय

वेत तिचे 
दोन, तीन जन्मतात,
तेही नुसते हातोहात 
विक्री होतात

अल्पभूधारकांनी 
करावे शेळीपालन,
या धंद्यामुळे मिळते 
एकदम चलन

बंदिस्त पद्धतीने 
करा शेळीपालन,
यासाठी हवे आहे 
जाळीदार कुंपण

जात चांगली 
जमनापरी, उस्मानाबादी,
अंथराल तुम्ही 
पैशांची लादी

शेळीला हवा 
स्वच्छ भरपूर चारा,
तो मिळवण्यावरच लक्ष केंद्रित करा

आता कमी झाले 
आहे चराऊ कुर,
हा धंदा म्हणजे आहे 
एक चलनी नाणं 

शेळीपालनात गव्हाणी 
ठेवा साफ,
उगीच दवडू नका 
तोंडाची वाफ

गाभण शेळ्या, 
पिल्लांची घ्या काळजी,
पशुवैद्यक सल्ल्याची 
बातमी घ्या ताजी

आरोग्य प्रजननाच्या
समस्येवर करा मात,
नका करू या भरवशाच्या
धंद्याचा घात

दिपू सांगतो लोकहो 
करा शेळीपालन,
प्रसंगी द्या कर्जासाठी 
जमीन तारण

नियोजनाने करा 
व्यवसायात प्रगती,
कामाप्रसंगी विसरा 
आता तुम्ही नातीगोती

'हाजीर तो वजीर' 
असा आहे हा धंदा,
नाहितर तुमचा 
अर्ध्यातच करेल वांदा


© दीपक केदू अहिरे, नाशिक

कोंबडीपालन (poultry farming)

कोंबडीपालन (poultry farming)


शेतकरी दादा तुम्ही करा कोंबडीपालन,

चालू राहिल तुमचे सदोदित चलन

बेरोजगारांसाठी ही नामी संधी,

सोडू नका अनुदानाची सुवर्णसंधी

करा तुम्ही कराराने ब्रॉयलर कुक्कुटपालन,

याने होईल सर्व घराचे पालन-पोषण

जात लक्षात असू द्या सातपुडा देशी,

लावाल नुसत्या पैशांच्या राशी

परसातील लक्ष्मी म्हणजे राधाराणी,

खिशात तुमच्या खुळखुळतील नाणी

असू द्यावी लक्षात गिरीराज वनराज,

त्याने चढेल तुमच्या कुक्कुटपालनाला साज

परसातील कोंबडीपालन आहे सहज आणि स्वस्त,

याने होतील विनाशकारी अळ्या फस्त

देशी,ब्रॉयलर कोंबडीपालन आहे फायदेशीर,

या जोडधंद्याद्वारे मारा संसाराचा तीर

कुक्कुटपालनात आहे विविध कंपन्याचे योगदान,

त्यांच्यामुळे आहे या उद्योगाची जान आणि शान

अंड्यांसाठी करा तुम्ही कुक्कुटपालन,

यामुळे मिळेल जगा प्रथिनयुक्त अन्नसधन

मांसासाठीही करा तुम्ही हा उद्योग,

याने चढेल तुमच्या प्रगतीचा वेग

उष्माघातापासून करा कोंबड्यांचे संरक्षण,

त्यांच्या पाण्यात टाका बर्फ विरघळून

कुक्कुटपालनासाठी घ्या शास्त्रोक्त प्रशिक्षण,

प्रत्येक जिल्हा जिल्ह्यात आहे हे शिक्षण

कुक्कुटखाद्यासाठी वापरा सोयाबीन, मका,

स्वच्छ पाणी देण्यासाठी अंग चोरू नका

कोंबडीखतात आहे दर्जेदार गुण,

याने वाजेल दर्जेदार शेतीउत्पन्नाची धून

कुक्कुटपालनातून अनेक झाले लखपती,

लावा गावागावात ह्या धंद्याच्या वाती

होतो आहे आता पोल्ट्री कंपन्याचा विस्तार,

तुम्हीही करा आता या धंद्याचा विचार

या दशकात वाढेल कुक्कुटउद्योगाने विकासदर,

म्हणून दिपू सांगतो कुक्कुटपालनाचा रस्ता धर

© दीपक केदू अहिरे, नाशिक

#कोंबडीपालन 
#poultryarming 




सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात (Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran)

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran भुसारी ॲग्रो...