दोन महिलांचा ध्यास, शेती आणि द्राक्ष निर्यातीचा यशस्वी प्रवास!Two women's passion, a successful journey of farming and grape export
आजच्या काळात शहरात सरकारी नोकरी करणाऱ्या पतींसोबत सुखाचं आयुष्य सहज मिळू शकतं. पण मनीषा दीपक जाधव आणि सविता बबन जाधव या दोन महिलांनी वेगळा मार्ग निवडला. शेतीची माती आणि परिश्रमावर विश्वास ठेवत त्यांनी द्राक्ष शेतीसह द्राक्ष निर्यातीचं स्वप्न साकार केलं.
मनीषा आणि सविता – दोघींना प्रत्येकी दोन मुले आहेत. मनीषांचे पती एस.टी. महामंडळात तर सवितांचे पती एम.एस.इ.बी.मध्ये कार्यरत आहेत. कुटुंबातील तिसरे दीर प्राध्यापक असून त्यांची पत्नी शिक्षिका आहे. म्हणजे घरातील सर्व पुरुष सरकारी नोकरीत होते. तरीही शेतीची जबाबदारी या दोन महिलांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली.
२०१८ साली त्यांनी द्राक्षबाग लावण्याचा निर्णय घेतला. मात्र, २०२२ मध्ये मनीषांच्या पतींना मुंबई येथे अनुकंपा तत्वावर नोकरी मिळाली, तेव्हा परिस्थिती कठीण होती. द्राक्षबाग नव्यानेच उभी राहत होती आणि अनुभवही कमी होता. अशा वेळी मनीषांनी ठाम शब्दांत सांगितले – "तुम्ही निर्धास्त नोकरीला जा, शेती कोणीच खोदून नेणार नाही, जबाबदारी आम्ही सांभाळू."
यानंतर दोघींनी खऱ्या अर्थाने संघर्ष सुरू केला. मजूर न मिळाल्यास स्वतः शेतात काम केलं. तज्ञांचे मार्गदर्शन घेतलं, चुका करून शिकल्या आणि दिवसेंदिवस पारंगत होत गेल्या. मेहनतीच्या जोरावर बाग फुलत गेली. २०२० पासून त्यांनी सह्याद्री फार्म्सच्या माध्यमातून द्राक्ष निर्यात सुरू केली आणि सभासदत्वही घेतलं.
त्यांच्या परिश्रमाचे फळ लवकरच दिसू लागले.
२०२२ मध्ये २५.२३ टनातून १८.१६ लाख रुपये उत्पन्न.
२०२३ मध्ये २९.४४ टनातून २२.९६ लाख रुपये.
२०२४ मध्ये १५.५० टनातून १३.४८ लाख रुपये.
२०२५ मध्ये २०.३८ टनातून १६.७० लाख रुपये.
विशेष म्हणजे २०२२-२३ साली विक्रमी एकरी १२ टन उत्पादन घेऊन १०० टक्के द्राक्ष निर्यात करण्याचा मानही मिळवला. सध्या त्यांच्या ७ एकर शेतीत २.५ एकर थॉम्पसन, १.५ एकर क्रिमसन आणि उर्वरित क्षेत्रात फ्लॉवर आहे.
आज त्यांची द्राक्षबाग पाहण्यासाठी तालुक्यातील लोक येतात आणि मार्गदर्शन घेतात. लोक विचारतात – "सर्व पुरुष नोकरीला आहेत, मग एवढी मेहनत कशाला?" तेव्हा या ‘लेडी जय-वीरू’ हसून उत्तर देतात – "कष्टाला पर्याय नाही."
जाधव कुटुंबाची खरी ताकद म्हणजे त्यांचं एकत्र राहणं. पतींनी महिलांवर विश्वास दाखवला, त्यांना मुभा दिली, आणि महिलांनी कष्ट, जिद्द व कल्पकतेने शेतीतून आर्थिक बळकटी निर्माण केली.
आज मनीषा आणि सविता या फक्त शेतकरी नाहीत, तर निर्यातदार महिलांचा प्रेरणादायी चेहरा आहेत. त्यांनी सिद्ध केलं की, शहरातील आरामशीर आयुष्य सोडून संघर्षाचा मार्ग निवडला तर शेतीही लाखोंचं उत्पन्न देऊ शकते.
© दीपक केदू अहिरे
नाशिक
www.ahiredeepak.blogspot.com


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा