बहुआयामी उद्योग : मधमाशीपालन Beekeeping
मधमाशी हे मानव आणि संपूर्ण सजीवसृष्टीला एक सर्वोत्तम वरदान आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. अन्य कीटक किंवा प्राण्यांमध्ये मधमाश्या एकट्या दुकट्या राहत नाहीत तर त्या समूहात राहतात म्हणूनच मधमाश्यांच्या वसाहती असतात. मधमाश्या त्यांच्या अन्नाच्या पूर्ततेसाठी फुलातील मकरंद व पराग गोळा करतात तेही इतक्या पद्धतशीरपणे की त्या फुलांना कुठल्याही प्रकारची इजा होत नाही. मधमाशा एका फुलावरून दुसऱ्या फुलावर परागकणांचे स्थलांतरण करतात त्यामुळे फुलांची फलधारणा व बीजधारणा होत असते. यालाच परागीभवन असे म्हणतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्या झाडांची वा वनस्पतींची वाढ होते व प्रसार होतो. अशा रीतीने फुलांचे काहीही नुकसान तर होत नाहीच. उलट चांगला उपयोग होतो. अजूनही शेतकऱ्यांच्या व बऱ्याच लोकांच्या गैरसमजामुळे मधमाशीपालन करण्यास शेतकरी उत्सुक नसतात.
लाकडी पेट्यात मधमाशीपालन
मधमाशापालन म्हटलं, की आपल्या डोळ्यासमोर उंच झाडाला लटकणारी आग्या मोहोळ येतात. त्याचबरोबरच शेत बांधावरच्या झाडाझुडपात फांद्यावर बांधली जाणारी फुलोरी या छोट्या मधमाशांची मोहोळ दिसतात
पण खरी पाळता येणारी सातेरी जातीची भारतीय मधमाशांची सहा सात समांतर पोळी बांधणारी झाडांच्या वा खडकांच्या अंधाऱ्या जागी वस्ती करून राहतात.
वनवासी लोक ती शोधून त्या अंधाऱ्या पोकळीतून मोहोळ बाहेर काढतात आणि मधाची पोळी पिळून मध मिळवतात.
आग्या आणि फुलोरीचाही मध असाच अशास्त्रीय व विघातक पद्धतीने मिळवला जातो.
पण शुद्ध मध मोठ्या प्रमाणात मोहळाचा नाश न करता मिळविण्यासाठी ही मोहळ विशिष्ट रचनेच्या लाकडी पेट्यात पाळावी लागतात. त्याचाच शेतात ठेवून परागीकरणाद्वारे पीकवाढीसाठीही उपयोग होतो. असं मधमाशापालन करायचं आधुनिक तंत्र ग्रामीण भागातील लोकांनी शिकले पाहिजे.
लहानांपासून वृद्धांपर्यंत करता येण्यासारखा व्यवसाय
शेतात फुलोरा असताना तिथे व फुलोऱ्याचा हंगाम संपल्यानंतर जवळपासच्या जंगलक्षेत्रात अथवा जेथे फळबागांचा फुलोरा असेल अशा ठिकाणी पाळीव मोहोळाचे स्थलांतर करून सतत उत्पन्न मिळवता येते.
हा एक कमी वेळाचा व कुटुंबातल्या लहानांपासून वृद्धांपर्यंतच्या सर्व घटकांना करण्यासारखा व्यवसाय आहे. तो सुरू करण्यासाठी मधमाशापालन तंत्रज्ञानाची ओळख करून घेणे जरुरीच असतं.
त्याचा सराव वर्षभर सर्व हंगामात केला तर मोठे यश मिळू शकते. या उद्योगाला लागणाऱ्या विशिष्ट रचनेच्या लाकडीपेटींची आणि धूम्रयंत्र, मध काढण्याचं मध निष्कासन यंत्र, षटकोनी ठसे असलेल्या पोळी बांधण्यासाठी आवश्यक त्या मेणपत्र्यांची निर्मिती करणारी उसाच्या चरकासारखी यंत्र तयार करण्याचे दुय्यम उद्योगही हाती घेता येतात.
आपली मोहोळ मेंढ्या बसवण्याच्या उद्योगासारखी शेतकऱ्यांच्या शेतात भाड्याने ठेवण्याचाही उद्योग करता येतो. असा हा बहुगुणी मधमाशापालन व्यवसाय आपल्याला राहत्या घरी सुरू करता येईल.
मोहळाची विक्री
मोहोळ इतर मधमाश्यापालकांकडून किंवा स्वतःच झाडांच्या ढोलीतून मिळवता येतात.
त्यांचं काही वर्षांनी विभाजन करून मोहळाची संख्या वाढविता येते. वा अतिरिक्त मोहळाची विक्रीही करता येते.
मोहळ शासकीय योजनेतूनही खरेदी करता येतात. एका मोहळात मेणाची ५ ते ७ पोळी, त्यामध्ये षटकोनी मेणघरात असलेली अंडी, आळ्या, कोषस्थ माशा (पुप्या) म्हणजेच पिलावा आणि ८ ते १० हजार प्रौढ माशा असाव्या लागतात.
प्रामुख्याने मोहळाची तरुण आई म्हणजे राणीमाशी तर असलीच पाहिजे. असेच मोहोळ टिकते.
पुढे येणाऱ्या फुलांच्या हंगामात नरमाशांची पैदास होते. हंगाम चांगला असेल तर नव्या राण्या जन्माला घालण्याचं काम सुरू होतं.
खास रचनेच्या खारकेसारख्या आकाराच्या पोळ्यांच्या खालच्या कडेला असणाऱ्या राणीघरात नव्या राण्याचं पालनपोषण होतं.
प्रौढ राण्या जन्मून कुंदार राण्यांशी नर माशांचं मिलन होऊन नव्या मोहळाची पैदास होते. वंश पुढे चालू राहतो.
आपलं मधुबन
तेव्हा हा निसर्गक्रम लक्षात घेऊन मोहोळ केव्हा खरेदी करायची आणि आपलं मधुबन किती पेट्या ठेवून सुरू करायचं. हे तज्ञांचा सल्ला घेऊन ठरवावं लागतं.
मधुबनासाठी फुलोरा देणारी झाड व पीक एक किलोमीटर परिसरात पुरेशा संख्येत असावी लागतात. त्याची माहिती घेऊन ठेवावी लागते.
याशिवाय मोहोळ ठेवण्यासाठी सुरक्षित जागा, पाण्याचा स्रोत व छाया असणं गरजेचं असतं.
मोहळांची हाताळणी व पाहणी करण्यासाठी लागणारी पटाशी, सुरी, डंख बसू नये म्हणून चेहरा झाकणारी संरक्षक जाळी, धुम्र यंत्र अशा साहित्याची गरज असते.
त्याचबरोबरच जमावाच्या काळात मोहळाना साखरेचा पाक द्यावा लागतो. मधाच्या हंगामात मध काढणी (मध निष्काषन) यंत्र असावं लागतं.
हंगामात नवी पोळी बांधून घेण्यासाठी षटकोनी ठसे असलेल्या मेणपत्र्यांची गरज असते. ते विकत मिळतात. या पूर्वतयारीने मधुबन सुरू करता येते.
उपलब्ध पिके व मधु वनस्पतीच्या संख्येनुसार मोहोळ यांची संख्या ठरवता येते. एकरी ५ ते ७ पाळीव मोहोळ पीक वाढीसाठी पुरेशी ठरतात.
मधोत्पादनासाठी स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन त्यांची संख्या ठरवता येते. तज्ञांचा सल्ला आणि आपला अनुभव यासाठी उपयोगी ठरतो
महाराष्ट्रात मधमाशापालनासाठी जंगलभाग आणि शेतीबागायाती क्षेत्र अनुकूल आहेत. सह्याद्रीच्या डोंगररांगा मधु वनस्पतीनी समृद्ध आहे.
विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, कोकण भाग अशा ठिकाणीही मधमाशापालन तेथील हंगामानुसार यशस्वी होऊ शकतं.
मधमाशांना उपयुक्त वनस्पती, पिकं, फळझाडं, फुलबागा,चारा पिकं यांची विचारपूर्वक योजना केली तर मधमाशापालन फायदेशीर होऊ शकते.
मधमाशापालनाला अनुकूल परिस्थिती
आवश्यकतेनुसार एकट्याने अथवा इतर मधमाशापालकाच्या सहकार्याने योग्य हंगामात, योग्य ठिकाणी देशभरही स्थलांतर करता येतं. आणि फायदा वाढवता येतो.
महाराष्ट्र व्यतिरिक्त पंजाब, काश्मीर, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, हिमाचलप्रदेश, आसाम, अरुणाचल, मेघालय, पश्चिम बंगाल, ओरिसा, कर्नाटक, आंध्र, केरळ म्हणजे सर्वच प्रांतामध्ये मधमाशापालनाला अनुकूल परिस्थिती आहे.
अनेक ठिकाणी मधमाशापालक संघ आहेत. मात्र त्यांना मार्गदर्शन खादी ग्रामोद्योग आयोग व राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ करतात. याशिवाय केंद्रीय मधमाशा मंडळ (सेंट्रल बी बोर्ड), कृषी विद्यापीठे वनविभाग व काही खाजगी संस्थाही संशोधन व मधोत्पादन करतात.
मधमाशीपालन : एकमेव अद्भुत उद्योग
प्रख्यात शास्त्रज्ञ सर अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी म्हटले आहे की, जर काही कारणांमुळे मधमाशा नाश पावल्या तर संबंध मानवजात फार तर चार वर्षेच जगू शकेल. कारण पुष्पधारी झाडे, वेली, वनस्पतीचे परागीभवन होणार नाही त्यामुळे अन्न मिळणार नाही. त्यामुळे मधमाश्या मानवजातीच्या अस्तित्वाच्या दृष्टीने किती निकडीच्या आहेत हे लक्षात येऊ शकेल.
मधमाशीपालन हा एकमेव अद्भुत उद्योग असा आहे की जो पूर्णपणे मकरंद व पराग फुलांवर अवलंबून आहे.
भारत हा आजही शेतीप्रधान देश आहे. जंगल भागातील आदिवासी लोक वनसंपत्ती, वनौषधी आदींवर अवलंबून आहेत. मधमाश्यांच्या वसाहतीपासून मध गोळा करण्याचे काम तर आपल्या पूर्वजांपासून अजूनही जंगल भागात चालू आहे.
मधाचे महत्त्व आपल्या वेद पुराणात सापडते तसेच पारंपारिक आयुर्वेदाप्रमाणे मधाचा आपण बहुगुणी औषधी म्हणून उपयोग करतो.
मधमाशीपालन एक सर्वोत्तम व्यवसाय
मध उत्पादनाशिवाय मधमाशीपासून मेण,पराग, राजान्न, प्रोपोलीस व दंश विष अशी अत्यंत औषधी उपयोगी उत्पादने मिळतात. या सर्व घटकांना जागतिक बाजारपेठेत अत्यंत चांगली मागणी आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे मधमाशांमुळे परागीभवनाद्वारे पीक उत्पादन व त्याचा दर्जा अनेक पटींनी वाढतो.
अशा रीतीने वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्य पुरवठा व सुरक्षा देण्यासाठी मधमाशीपालन एक सर्वोत्तम व्यवसाय आहे.
मधमाशीपालन म्हटले की सर्वसामान्य लोक आधी भुवया वर करून आ वासून प्रश्नार्थक मुद्रेने बघतात. कारण मधमाशांच्या मधापेक्षा लोकांना मधमाशांच्या डंखाची, त्यांच्या चावण्याची खूप भीती मनात बसलेली आहे. मुळात हाच सगळ्यात मोठा गुण म्हणा किंवा वरदान म्हणा. की मधमाशांना चांगली समज असते.
आपले मित्र कोण आणि शत्रू कोण हे मधमाशा चांगले ओळखू शकतात.
मधमाशांचे मित्र म्हणजे मधपाळ.अगदी सहजपणे ते मधमाशांच्या पोळ्यात हात घालतात. तरीही त्यांना मधमाशा चावत नाहीत. त्यांच्या अंगावर अंगाखांद्यावर मधमाशा वावरतात आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे भरपूर मध देतात.
मधमाशांच्या पोळ्याला त्रास
याउलट एखाद्याने मधमाशांच्या पोळ्याला त्रास देण्याचा विचार जरी मनात आणला तरी मधमाशांना ते अचूक समजते. कारण विशिष्ट फेरोमोनद्वारे संदेश किंवा संवेदना मधमाशांना लगेच कळतात.
अशा व्यक्तीला, प्राण्याला किंवा कोणालाही शत्रू ठरवून सगळ्या मधमाश्या त्याच्यावर हल्ला करतात. आणि डंख मारतात याचे साधे उदाहरणच द्यायचे झाले तर एखाद्याने जर सहज झाडावरील किंवा इमारतीवरील मोहोळावर जर दगड भिरकावला तर दहा-बारा माणसांच्या गर्दीतूनही त्या व्यक्तीला ओळखून मधमाशा त्यालाच डंख मारतात. कारण दगड भिरकावून मारलेल्या व्यक्तीच्या हाताला किंवा बोटांना विशिष्ट संप्रेरक (फेरोमोन)चा गंध असतो. तो मधमाशा ओळखतात. आणि सर्व मधमाशा त्याचाच पाठलाग करतात.
साधारण १५ ते २० हजार वर्षांपूर्वीपासून मधमाशांपासून मध मिळवण्याचे तंत्र आपल्या पूर्वजांना ज्ञात होते. याचे दाखले भीमबेटेकाच्या (पंचमढी, मध्यप्रदेश) जंगलातील डोंगर कोपऱ्यावरील भीत्तीचित्रांवरून स्पष्ट मिळतात.
त्या काळीदेखील मध गोळा करून त्याचे अन्न म्हणूनच सेवन केले जायचे.
मधाची औषध म्हणून उपयोगिता आयुर्वेदातील प्रसिद्ध शल्यचिकित्सक चरक आणि सुश्रुत यांनी त्यांच्या साहित्यात लिहून ठेवली आहे.
त्याचाच आता सर्रास संदर्भ घेऊन औषधे तयार केली जातात. यापैकी प्रमुख उपचार म्हणून अंगावरील जखम, कापल्यावर किंवा भाजल्यावर त्या जागी मधाचा लेप दिल्यास ती जखम लवकर बरी होते.
मधातील एंटीबॅक्टेरियल ऍक्टिव्हिटीमुळे मधाचे औषधी गुणधर्म वाढतात.
मधमाशीपालनाचे फायदे
मधमाशीपालनाचे अनेक फायदे आहेत. जगातील बहुतेक देशात एकाच जातीच्या मधमाश्या आहेत. मात्र भारत हा एकमेव देश असा आहे की, ज्याच्या वातावरणात चार ते पाच जातींच्या मधमाशांच्या वसाहती नैसर्गिकरित्या आढळतात. त्यांचे संवर्धन व संगोपन करून व्यावसायिक उत्पादन करता येऊ शकते.
आपल्याकडे मधमाशांना आवश्यक फुले, झाडे, वनस्पती व वातावरण अत्यंत पोषक आहे. त्यामुळे मध, मेण व इतर उत्पादन पण भरपूर मिळू शकते.
सर्वात प्रमुख म्हणजे मधमाशीपालनाद्वारे शेतीपीक व फळपिकांचे उत्पादन व प्रजनन अनेक पटीनी वाढते. त्यामुळे शेती व शेतकरी कुटुंबाचेही सामाजिक व आर्थिक सबलीकरण होते.
परागीभवनामुळे शेतीप्रमाणेच औषधी वनस्पती, जंगली वृक्षवेलींचे संवर्धन होते. पर्यायाने जंगली भागातील आदिवासींचे उत्पन्न वाढून त्यांचे शहरी भागात स्थलांतर थांबू शकते.
मधमाशीपालनातून रोजगार
मधमाशीपालन हा बहुआयामी उद्योग असल्यामुळे त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ व मजुरांची गरज आहे.
उदा. मधमाशांसाठी लागणाऱ्या वसाहती. त्यासाठी विशिष्ट पेट्यांचे उत्पादन व पुरवठा, वसाहतींचे संगोपन व वाढ करण्यासाठी प्रशिक्षित मधपाळ, वसाहतींचे स्थानांतरण व वाहतूक व्यवस्था, मधोत्पादन, साठवण तसेच मधाचा दर्जा, परीक्षण, वेस्टनीकरण व विपणनव्यवस्था आदि व्यवस्थेत रोजगार उपलब्ध होतो.
मधमाशीपालन हे मध व अन्य उत्पादन निर्मितीसाठी स्त्री पुरुष, लहान-मोठे असा भेद नाही. कोणीही हा व्यवसाय सहज करू शकतात.
लहान, मध्यम तसेच मोठ्या प्रमाणावरही मधमाशीपालनास सुरुवात करता येते. मधमाशीपालनाकरीता आवश्यक असलेले मकरंद व पराग जवळपास विनामूल्य मिळतात.
मधमाशीपालनाकरीता कमीत कमी जागा, भाग भांडवल, वेळ, कष्ट घ्यावे लागतात. अशा पद्धतीने मधमाशीपालन फायदेशीर आहे.
© दीपक केदू अहिरे
नाशिक
deepakahire1973@gmail.com
www.ahiredeepak.blogspot.com