name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): January 2023

रोजगार निर्मितीचे नवीन साधन : कृषी पर्यटन (Agro tourism)

 रोजगार निर्मितीचे नवीन साधन : कृषी पर्यटन (Agro tourism)



          







भारत वैविध्याने आणि सौंदर्याने नटलेला देश आहे. आजही या देशातील ७० टक्के जनता ही ग्रामीण भागात राहते. देशाला स्वातंत्र्य मिळून पाच तप उलटले तरी ग्रामीण भागाचा उदरनिर्वाह करणारी शेती पूर्णपणे दुर्लक्षित राहिली त्यामुळेच आज आपल्यासमोर शेतकरी आत्महत्येसारखी महाभयान समस्या उभी ठाकली आहे. 

वाढत्या शहरीकरणामुळे शहर आणि गाव यातील दरीही तेवढीच वाढली असल्यामुळे गाव, गावाकडची संस्कृती, शेती, शेतकऱ्यांची जीवनपद्धत अशा अनेक विषयापासून शहरी लोक कोसो दूर राहिलेत. आज पुन्हा एकदा गावाकडे चला असं म्हणण्याची वेळ आली आहे.

शहरी माणसाला या गावाकडच्या मातीची ओढ आहे तर ग्रामीण भागात शेतीसोबत पूरक व व्यवसायांची गरज आहे. या दोन्ही गोष्टींची सांगड घालून कृषीपर्यटन ही संकल्पना आजमितीस आपल्या मातीत रुजू लागली आहे. आता आपण दरवर्षी जागतिक कृषी पर्यटन दिन हा १६ मे रोजी साजरा करतो. 














मोठ्या प्रमाणात वाढणारा व्यवसाय

 

  • सध्या महाराष्ट्रात कृषीपर्यटन व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शेतकऱ्यांनी उभारलेल्या कृषी पर्यटन केंद्रांना शहरी पर्यटकांकडून चांगला प्रतिसादही मिळत आहे. 

  • वाढत्या शहरीकरणामुळे दिवसेंदिवस नागरिकांचा निसर्गापुढे ओढा वाढत आहे. निसर्गाचे हानी न होऊ देता पर्यावरणाचा समतोल राखून पर्यटनाचा आनंद देणारी कृषी पर्यटन केंद्रे हा सक्षम पर्याय शेतकऱ्याना मिळाला आहे.आजमितीस महाराष्ट्रात तीनशेहून अधिक कृषी पर्यटन केंद्रे आहेत. 

  • कृषी पर्यटनातून ग्रामीण विकास आणि ग्रामीण विकासातून महाराष्ट्राचा विकास यासाठी व शेतकऱ्यांच्या हितासाठी महाराष्ट्रात कृषी पर्यटन करणाऱ्या शेतकऱ्यांनी व कृषी पर्यटन संस्थांनी एकत्र येऊन एक महासंघ स्थापन केला आहे.  त्याचे नाव महाराष्ट्र स्टेट ॲग्री अँड रुरल टुरिझम को-ऑपरेशन लि. (मार्ट) आहे.  

  • मध्यंतरीच्या काळात महाराष्ट्राच्या प्रमुख शहरात मार्टने केलेल्या सर्वेक्षणानुसार सुमारे ४२ टक्के लोकांना ग्रामीण भागात एकही नातेवाईक नसल्याचे सिद्ध झाले आहे. शेतकऱ्यांमध्ये होणारी जागृती, शेतीपूरक उत्पन्नाचे साधन म्हणून याकडे बघितले जात असल्याने दिवसेंदिवस कृषी पर्यटन व्यवसाय चांगलेच मूळ धरून बहरू लागला आहे.












पूरक व्यवसाय

 

  • उपलब्ध साधनसामुग्रीत अगदी कमी भांडवली खर्चात केला जाणारा हा पूरक व्यवसाय आहे. शहरी पर्यटकांना ग्रामीण जीवनाची ओळख करून देणे व त्यायोगे शहरी पैसा ग्रामीण भागाकडे वळविणे हा उद्देश साध्य होतो. रोजगार निर्मिती, शेतीमालाला शेतातच ग्राहक हे मुख्य व अत्यंत महत्त्वाचे हेतू साध्य होतात. 

  • ही कृषी पर्यटन केंद्रे प्रत्येक गावात रोजगार निर्मितीचे नवीन साधन म्हणून उदयास येत आहे. 

  • आजच्या नव्या पिढीला शेती, गोठे, चुलीवरचे जेवण, घर, गावाकडच्या प्रथा हे सारं माहीत नसतं. गंमत म्हणजे जर आजच्या मुलांना विचारलं भात कुठे पिकतो? तर मुलं सहज उत्तर देतात. बिग बाजार किँवा सुपर मार्केट इ. यात त्यांचा दोष नाही कारण त्यांनी या सर्व गोष्टी कधी पाहिलेल्याच नाहीत. आणि जे पाहिलेच नाही ते कळेल तरी कसे? 

  • जे अन्न आपण खातो ते आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी काय आणि किती प्रकारच्या प्रक्रियेतून जाते. याची कल्पनाच नसेल तर अन्न वाया घालवू नये याचे महत्त्व पटेलच कसे? 

  • शेतकऱ्यांची दुःख समजण्याची, त्यांच्या आत्महत्येच्या प्रश्नाशी आजची पिढी जोडली जाईलच कशी? म्हणूनच कांदा जमिनीवर उगवतो की जमिनीखाली? शेतकरी आत्महत्या का करतात? या अशा प्रश्नाची उत्तर मिळवायची असतील तर त्यासाठी कृषी पर्यटनाचा मार्ग आहे. हे आता शहरी जणांना मनोमन पटू लागलेय. त्यामुळे काळाची गरज ओळखून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी आता जोमाने कृषी पर्यटन व्यवसाय सुरू केला पाहिजे. 

  • अत्यंत उज्वल असे भवितव्य असणारा असा हा कृषि पर्यटनाचा पूरक व्यवसाय करून तो मुख्य व्यवसाय कसा होईल याचा ध्यास घेतला पाहिजे. 

 













शेतीपूरक अनेक व्यवसायांची जोड देऊन कृषीपर्यटन


  • आज शेतीमालाच्या दराबाबत अनिश्चितता आहे. शेतकरी शेती उत्पादन पिकवतो. त्याला दर निश्चितीचा हक्क नाही यामुळे शेतकऱ्यांना उत्पादनखर्च सुद्धा मिळत नाही. अशा अवस्थेमध्ये कृषीपर्यटन व्यवसायात पर्यटकांचे दर निश्चिती पॅकेज ठरविणे शेतकऱ्यांच्या हातात आहे म्हणून हा व्यवसाय आर्थिकदृष्ट्या स्वातंत्र्य व सामर्थ्य देणारा आहे. 

  • त्याचबरोबर कृषी पर्यटन व्यवसायात प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य आहे. हे राज्यातील अनेक कृषि पर्यटन करणाऱ्या शेतकऱ्यांनी सिद्ध केले आहे. 

  • कृषी पर्यटनाची अगदी सोपी व्याख्या करायची झाली तर शेतकऱ्यांच्या फळत्या फुलत्या शेतीत पर्यटकांसाठी निवास आणि न्याहारीची उत्तम व्यवस्था करून देणे. शेतीपूरक अनेक व्यवसायांची जोड देऊन कृषीपर्यटन करता येते. 














महत्त्वाच्या टिप्स

कृषी पर्यटन करू इच्छिणाऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या टिप्स पुढीलप्रमाणे आहेत.

  • अतिथी देवो भव! ही आपल्या देशाची संस्कृती आहे. सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे आदरातिथ्य...! येणाऱ्या पर्यटकांचे घरच्याच सदस्य असल्याप्रमाणे आदरातिथ्य केले की आपण अर्धी लढाई तेथेच जिंकतो. 

  • कृषीपर्यटनाचा व्यवसाय सुरू करताना सर्व बाजूंचा अभ्यास आवश्यक आहे. त्याचसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्वतःचे मार्केटिंग करणेही महत्त्वाचे ठरते. 

  • आपल्या व्यवसायाची जाहिरात वृत्तपत्रे, मासिके, साप्ताहिके, पर्यटनविषयक मासिके यातून सतत करावी. 

  • आपल्या शेतीची बलस्थाने आपणच विकसित करावीत. नाविन्य आणि वेगळेपण जपणे गरजेचे असते. 

  • आपल्या शेतात पर्यटकांना खिळवून ठेवण्यासाठी शक्यतो नैसर्गिक स्रोताचा जास्तीत जास्त उपयोग करून पर्यटकांना सेवा द्यावी. पर्यटकांसोबत स्वतः जातीने उपस्थित राहावे. विश्वासाचं नातं नवीन पर्यटक तुमच्याशी जोडले जाण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडते. 













दुर्गम भागातही कृषीपर्यटन

  • दुर्गम भागातही कृषीपर्यटन करता येते. कारण आजच्या धावपळीच्या जगात लोकांना निरव शांततेची आवश्यकता असते. त्यामुळे लोक कितीही अडचणी आल्या तरी शांत, निसर्गरम्य ठिकाणी जाण्यास तयार असतात. 

  • शेतीसोबतच निसर्गाशी संबंधित इतर गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या असतात. त्याही पर्यटकांना दाखवता येतात. उदा. विविध पक्षी, प्राणी, झाडे,फुलपाखरे इ. पर्यटकांना घरचे चुलीवर शिजवलेले जेवण मिळाले तर पर्यटक जास्त आनंदी व समाधानी होतात. त्यामुळे या गोष्टींचीही खूप काळजी घ्यायला हवी. 

  • राहण्याची व खाण्यापिण्याची योग्य व व्यवस्थित सोय झाली की पर्यटक पुन्हा तुमच्याकडे भेट नक्की देणार याची खात्री असते. 

  • आठवड्याची सुट्टी (विकेंड) ही वाढती संकल्पना पाहता पर्यटकांना आपल्या केंद्राकडे वळविता येऊ शकते. शेतीचे मूल्यवर्धन म्हणून कृषीपर्यटन करावे. 











वास्तवदर्शी प्रकल्प अहवाल 

  • कृषी पर्यटन व्यवसायासाठी कर्ज प्रकरण सादर करतांना ज्यासाठी कर्ज घ्यायचे आहेत त्याबाबत संपूर्ण माहिती दिली पाहिजे. 

  • प्रकल्प अहवाल नेमका, वास्तव व पारदर्शक असावा. अहवाल बनवून देणाऱ्यास त्याची परिपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. 

  • अहवालात मार्जिन, स्वनिधी बँक साहाय्य, व्याजदर, कर्ज परतफेडीचा कालावधी, येणारा व जाणारा पैसा यांचा समन्वय, प्रतिवर्षी होणारी वाढ, परतफेडीचा तपशील, आर्थिक जमा आदी बाबींचा समावेश हवा. 

  • कर्ज घेण्यासाठी अर्ज करताना लागणारी कागदपत्र पुढीलप्रमाणे आवश्यक असतात. त्यात राहण्याच्या दाखला व फोटो दाखला, ग्रामपंचायतीचा व्यवसाय म्हणून दाखला, ग्रामपंचायत बांधकाम परवाना, इस्टिमेट (अंदाजपत्रक),आर्किटेक्चर दाखला. ज्या जागी बांधकाम करायचे त्या क्षेत्राचा एन.ए. दाखला (कलेक्टर) किंवा झोन दाखला, जागेविषयक संपूर्ण कागदपत्रे, वकील तारण योग्यतेचा दाखला, टायटल व सर्च रिपोर्ट, ज्यांच्या नावावर जमीन आहे त्याचे संमतीपत्रक, जागेचा नकाशा, अन्य गटधारकांची संमती लागते. 

  • कुटुंबातील अन्य सदस्यांची संमती, जोडतारण असल्यास जोडतारणाची कागदपत्रे, आर्थिक कागदपत्रे, आवश्यक प्रमाणपत्रे, जामीनदाराची कागदपत्रे, जामीनदार हा कर्जदाराइतकाच परतफेडीला समप्रमाणात जबाबदार असतो. 

  • कृषीपर्यटन व्यवसाय असल्याने व्याजदर 13 ते 15 टक्यापर्यंत अपेक्षित असतो. कर्ज कालावधी कर्जानुसार 5 ते 10 वर्षापर्यंत असू शकतो. कर्जाचा हप्ता मासिक, त्रैमासिक किँवा वार्षिक असतो. 

  • कर्ज परतफेडीबाबत ड्रायपिरियड मंजूर होऊ शकतो. या कालावधीत फक्त दरमहा व्याज भरावे लागते. कर्ज विनीयोगाचे स्वतंत्र तपशीलवार पत्र देणे गरजेचे आहे. 

  • कृषी पर्यटन विकसनसाठी जमीन सपाटीकरण, ऍप्रोच रोड, तलाव, शेततळे उभारणी, पाणी टाकी, पाईपलाईन कॉटेज, रूम बांधणी, डायनिंग हॉल, फर्निचर खरेदी, किचनमधील उपकरणे, खरेदी, झोपाळा, घसरगुंडी, नौकानयन, बैलगाडी, घोडागाडी, पर्यटकांना फिरवण्यासाठी वाहन खरेदी, सौर ऊर्जा, गोबर गॅस, दैनंदिन खर्चासाठी कॅश क्रेडिट, मालतारण कर्ज इ. घेता येते














ताणतणाव कमी करण्यासाठी कृषी पर्यटन 

  • एकूणच कृषी पर्यटनाकडे व्यावसायिक दृष्टीने पाहावे तरच चांगल्याप्रकारे आर्थिक प्रगती साधता येते. 

  • धकाधकीच्या जीवनात परस्परांतील संवाद कमी होतोच त्यामुळे ताणतणाव वाढतोय. तो कमी करण्यासाठी कृषी पर्यटन हे चांगले माध्यम आहे. 

  • पर्यटकांना निवांतपणा मिळाला की ते आनंदीत होतात. त्यासाठी आपण मात्र त्यांना कमीत कमी आवश्यक अशा पायाभूत सुविधा तरी पुरविल्याच पाहिजेत. 

  • कृषी पर्यटन केंद्रासाठी शक्यतो निसर्गाच्या सानिध्यात जागा निवडावी. रिसॉर्ट व कृषीपर्यटन या दोन्ही वेगवेगळ्या संकल्पना आहेत. हे केंद्र चालवणाऱ्याने नेहमी लक्षात ठेवावयास हवे. 

  • शेतीतून अधिक उत्पन्न वाढविण्याची संकल्पना म्हणजे कृषी पर्यटन होय. यात शेतीला प्रथम प्राधान्यच मिळाले पाहिजे. 

    

















महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात अनेक एकरांवर बहरलेली ही केंद्रे शेतीसोबत नवनवीन संकल्पना, प्रयोग करून कृषी पर्यटन यशस्वीरीत्या राबवत आहेत. शासनाच्या विविध योजना आणि भविष्यातील या क्षेत्रातील वाढती मागणी याची वेळीच दखल घेऊन आपल्याकडील प्रत्येक शेतकऱ्याने कृषी पर्यटनासाठी सुरुवात करायला हवी. खरं तर कृषी पर्यटन ही परदेशी संकल्पना आहे. ब्राझील, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया या देशात ती खूप लोकप्रिय आहे. आपल्या देशातही आता ही संकल्पना मोठ्या प्रमाणात रुजली आहे. परंतु योग्य नियोजन आणि दूरदृष्टीने या गोष्टीकडे पाहिले तर भारत हा कृषि पर्यटनात पहिल्या क्रमांकाचा देश म्हणून उदयास येण्यास जास्त वेळ लागणार नाही.


© दीपक केदू अहिरे, नाशिक


deepakahire1973@gmail.com


www.DigitalKrushiyog.com


#कृषी पर्यटन  #Agro tourism #रोजगार 

#शेतीपूरक व्यवसाय 



भाजीपाला निर्जलीकरणाचा प्रक्रिया उद्योग (vegetable dehydration processing Industry)

 भाजीपाला निर्जलीकरणाचा प्रक्रिया उद्योग 
vegetable dehydration processing Industry

Dehydration


    भाज्या वाळवून ठेवणे हे फार पूर्वीपासून सर्वांच्या परिचयाचे आहे. ज्याप्रमाणे वस्तू किंवा अन्नपदार्थ मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात तेव्हा त्याची साठवणूक केली जाते. या अन्नपदार्थाचा पुढे जेव्हा ते मिळत नाहीत तेव्हा उपयोग होतो. भाज्या, फळे वापरून लोणची, जॅम, चटण्या इ. टिकाऊ पदार्थ सर्वांच्या आवडीचे असतात. जेवणाची डावी बाजू सजविण्यास, अचानक आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी अनेक खाद्यपदार्थ उपयुक्त ठरतात. पापड, कुरडया, बटाटा कीस, पापड्या हे सर्वांना परिचयाचे आहेत. भाज्या हंगामात भरपूर प्रमाणात मिळतात. तुलनेने स्वस्त व ताज्या असतात. म्हणून अशा भाज्या उन्हात वाळवून पुढे उपयोगी ठरतात. भारतातील प्रत्येक प्रांतातून अशी वाळवणे वैविध्यपूर्ण रीतीने तयार करतात. भाज्यांची टंचाई असेल तेव्हा या वाळवलेल्या भाज्यांना भिजवून ताज्या भाजीप्रमाणेच रेसिपी बनवली जाते.

       विदर्भात हिवाळ्यात मेथी, पालक, आंबटचुका, चवळी, वांगी, टोमॅटो इ. पीक भरपूर घेतले जाते. या भाज्या वाळवण्यासाठी कडक उन लागते. पालेभाज्या निवडून, वाळवून चुरा करून हवाबंद डब्यात व पिशव्यात ठेवतात. भुरका भाजी हा चवदार भाजीचा प्रकार करतांना फोडणीत तिखट, आले-लसूण - मिरची पेस्ट, कांदा इ. परतून भाजीची वाळलेली पूड व मीठ घालून आवडीनुसार दही, लिंबू, चिंच इ. घालून पाणी घातले जाते. व एक चविष्ट भाजी पटकन तयार होते.
        युद्धामध्ये सैन्याला नियमित पुरवठा करता यावा म्हणून बटाटे, गाजर, वाटाणे आणि कॉलीफ्लॉवर वगैरे भाज्यांचे निर्जलीकरण सुरू झाले. भाज्या टिकविण्याच्या प्रक्रियांमध्ये डबाबंद करणे, सुकविणे आणि वाळविणे,थंड करणे आणि थंड करून सुकवणे (फ्रीज ड्राईंग) वगैरे प्रक्रिया सरसकट वापरल्या जातात. लोणचे बनविणे किंवा आंबविणे किंवा प्रिझर्वेटीव्ह वापरणे या प्रक्रिया तेवढ्या रुळलेल्या नाहीत. मात्र या सोप्या आणि स्वस्त प्रक्रियांमुळे शेतीत परिवर्तन घडून येईल. 

Dehydration

        सूर्यप्रकाशात वाळविलेल्या भाज्यांचा दर्जा सुमार असतो. कारण या प्रक्रियेत ब्लोचींग सारखी पूर्व प्रक्रिया केलेली नसते. ब्लोचिंगमुळे एन्झाईमची प्रक्रिया थांबते आणि त्यामुळे वाळवलेल्या भाज्यांचा रंग चांगला राहतो. आणि सूर्यप्रकाशात वाळवलेल्या भाज्या कठीण असतात व त्यांना शिजवायला जास्त वेळ लागतो. मोठ्या प्रमाणावर भाज्या टिकवण्यासाठी निर्जलीकरण ही एक चांगली स्वस्त पद्धत आहे. काही भाज्यांच्या निर्जलीकरणाच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती खालीलप्रमाणे :
१. शेंगा बीन्स :  

 कोवळ्या फ्रेंच बीन्स निर्जलीकरणासाठी निवडाव्यात. लहान लांबीचे तुकडे करून ते तुकडे वाफेत ३ ते ६ मिनिटे ब्लॉचींग करून घ्यावेत. ते लहान तुकडे शेंग व दाणे ठिसूळ होईपर्यंत वाळवावेत. वाळविण्याचे गुणोत्तर ७:१ पडते. 
२. कोबी (कॅबेज): 

 बाहेरची पाने आणि मधला दांडा काढून टाकून अर्धा सें.मी. जाडीचे तुकडे किसतात. हे किसलेले तुकडे (श्रेड) ५ ते १० मिनिटे वाफेत उकळत्या किंवा २ टक्के सोडियम बायकार्बोनेटच्या द्रावणात २ ते ३ मिनिटे वाफवितात जर ०.५ टक्के सल्फाईट किंवा बाय सल्फाईटच्या द्रावणात ब्लॉचींग केले तर चांगला रंग येतो. नंतर ६० ते ६५ अंश सें.ग्रे. तापमानाला १२ ते १४ तास सुकवितात. वाळवण्याचे गुणोत्तर १८:१  येते


dehydration











३. कारली : 

  कारलीचे ०.५ सें.मी. जाडीच्या चकत्या कराव्यात.  या  चकत्या उकळत्या पाण्यात ७ ते ८ मिनिटे ब्लॉच केल्यावर ६५ ते ७० अंश तापमानाला ७ ते ९ तास वाळवाव्यात. वाळवण्याचे गुणोत्तर १६.१ पडते. अशा पद्धतीने कारल्याच्या चकत्या कराव्यात.
४. वांगी :  
   वांग्याच्या ०.६ सें.मी.जाडीच्या चकत्या करतात आणि या चकत्या ०.५ टक्के सल्फर डाय-ऑक्साइडच्या द्रावणात ब्लॉचिंग करून घेतात. त्यानंतर ४ ते ६ मिनिटे उकळत्या पाण्यात ब्लॉच करून घेतात. आणि ४९ ते ५४ अंश से.ग्रे.ला ९ ते ११ तास वाळवितात. वाळविण्याचे गुणोत्तर ३३.१ पडते. चकत्या केल्यावर लोखंडाचा स्पर्श होऊ देऊ नये. लोखंडाच्या स्पर्शाने ब्राऊन रंग येतो.
५. कॉलीफ्लॉवर : 

  कॉलीफ्लॉवरचे लहान तुकडे करतात. ते तुकडे ४ ते ५ मिनिटे उकळत्या पाण्यात ब्लॉच करतात. त्यानंतर ०.५ टक्के सल्फर डाय ऑक्साईडच्या द्रावणात एक तास भिजवून पाणी निथळल्यावर धुवून घेऊन ६० ते ६५ अंश तापमानाला १० ते १२ तास वाळवून घेतात. वाळवण्याचे गुणोत्तर ३५:१ पडते.

६. गाजरे : 
  पिवळी गाजरे वाळवायला चांगली असतात. गाजराची शेपटी व देठ कापून टाकतात. त्यांच्या चकत्या करतात. या चकत्या उकळत्या पाण्यात त २ ते ४ टक्के मिठाच्या द्रावणात २ ते ४ मिनिटे ब्लॉच करून ६८ ते ७४ अंश सें. ग्रे. तापमानाला १४ ते १६ तास वाळवितात.वाळविण्याचे गुणोत्तर १८:१ पडते. पूर्व प्रक्रिया म्हणून स्टार्च वापरला तर चांगला रंग येतो. साठवणुकीत चव व रुची वाढते. स्टार्चच्या आवरणामुळे प्राणवायूबरोबर संयोग होत नाही. त्यामुळे रंग बदलत नाही.

Dehydration

७.लसूण 
  लसूण वाळवताना पूर्वप्रक्रिया करत नाहीत. कुड्या वेगळ्या करून ५७ ते ६० अंश तापमानाला वाळवितात. लसणाच्या पावडरीची मोठ्या प्रमाणावर निर्यात होते. तसेच औषधात उपयोग होतो. लसूण जंतुनाशक आहे पण लसूण हवेतील आद्रता शोषून घेत असल्यामुळे पॅकिंग करताना काळजी घ्यावी. 
 स्थानिक जातीच्या लसणापासून निर्यातीसाठी योग्य लसणाची भुकटी तयार होत नाही. त्यामुळे निर्जलीकरणासाठी योग्य जातीच्या लसणाच्या गाठ्यांची निवड करावी लागते. लसणाच्या जातीपैकी जी-१८९,जी-३२३,जी-६४, जी-२६८,जी-१७६,जी-१७७ या जाती निर्जलीकरणासाठी योग्य असल्याचे आढळले. त्यापासून भुकटीचा उतारा चांगला मिळाला आणि भुकटीचा रंग व प्रत चांगली होती.
    लसणाच्या मोठ्या आकाराचे निरोगी गाठे निवडून घेतात. गाठ्यावरील कागदासारखी पातळ साल काढून टाकतात आणि पाकळ्या वेगवेगळ्या करतात. शेतातून काढणी केल्यापासून ३ ते ४ आठवड्याचे गाठ याप्रमाणे लसणाची गाठी निवडतात. कारण पुढे साठवणीत लसणाची गाठी बिघडण्याचा संभव असतो. लसणाच्या पाकळ्यांचे लहान तुकडे करतात आणि वजन करतात. त्यानंतर हे पाकळ्याचे तुकडे स्थिर वजन मिळेपर्यंत ओव्हनमध्ये ६०+२ अंश से. तापमानात वाळवतात. त्यानंतर मिक्सरमध्ये भुकटी तयार करतात. ही भुकटी पॉलिथीनच्या पिशव्यात भरून सीलबंद करतात. या लसणाच्या भुकटीचा रंग मलईसारखा पांढरा असतो.

Dehydration

 
         अशा प्रकारे लसणावर विविध प्रकारची प्रक्रिया करून त्याचा वापर करण्याचा कल वाढत आहे. वाळवलेली भुकटी, लोणचे, कॉन्सन्ट्रेट क्रश, गार्लिक पेस्ट, गार्लिक ड्रॉप्स आणि लसणाचे तेल इ.चा पाकक्रियामध्ये व औषधीत उपयोग करण्यात येतो. कोचिन (केरळ) येथे लसणावर प्रक्रिया करण्याचे अनेक उद्योग आहेत. म्हैसूर येथील केंद्रीय अन्नप्रक्रिया तंत्र व संशोधन संस्थांमध्ये लसणावरील विविध प्रक्रियांचा अभ्यास करून त्याविषयी मार्गदर्शन प्रकल्प उपलब्ध करून दिले आहेत. 

८. भेंडी : 
  लुसलुशीत कोवळ्या भेंड्या तशाच किंवा चकत्या किंवा दोन भाग करून वाळवाव्यात. चकत्या ०.६ सें.मी. जाडीच्या असाव्यात. भेंडीच्या चकत्या ४ ते ८ मिनिटे गरम पाण्यात ब्लॉच कराव्यात. किंवा २ ते ५ मिनिटे वाफेवर ब्लॉच कराव्यात नंतर गार पाण्यात बुडवाव्यात. म्हणजे त्यावरचे जिलेटीनसारखे आवरण निघून जाईल. नंतर ६० ते ६५ अंश सें.ग्रे.ला १२ ते १४ तास सुकवाव्यात. वाळविण्याचे गुणोत्तर १२.१ पडते.

९. नवलकोल :  
   साले काढून नवलकोलचे ०.५ सें.मी. जाडीच्या चकत्या कराव्यात. त्या तशाच वाळवाव्यात. किंवा ३० ते ४० मिनिटे सल्फर डाय ऑक्साईडच्या द्रावणात भिजवाव्यात. नंतर या चकत्या ५४ ते ६० अंश सें.ग्रेड तापमानाला १२ ते १४ तास वाळवाव्यात.

Dehydration











१०. कांदे :  
  कांद्यावरचा पापुद्रा काढून टाकावा. कांद्याचे ०.२५ सें.मी. जाडीच्या चकत्या कराव्यात. चकत्या ५ टक्के मिठाच्या द्रावणात बुडवाव्यात. नंतर ६० ते ६५ अंश तापमानाला ११ ते १३ तास सुकवितात. वाळविताना५७ अंश से.ग्रे. पेक्षा तापमान कमी ठेवावे. वाळविण्याचे गुणोत्तर १०.१ पडते. वाळविलेले उत्पादन दळून पावडर करावी. ही पावडर सूप करण्यासाठी, ग्रेव्ही करण्यासाठी, मसाले करण्यासाठी वापरता येते.

११. वाटाणे : 
  लुसलुशीत हिरवे वाटाणे त्यांना गार्डन पीज म्हणतात. निर्जलीकरणासाठी हे वापरावेत. वाटाणे १ ते २ मिनिटे उकळत्या पाण्यात ब्लॉचिंग करून घ्यावेत. आणि ६० ते ६२ अंश से.ग्रे. तापमानाला वाळवावेत. दिल्लीजवळ एक खास प्रकारची व्हरायटी मिळते. ती खास प्रकारे वाळवितात. या वेगळ्या पद्धतीमध्ये वाटाण्याची त्वचा मेकॅनिकली पंक्चर करतात. त्यामुळे वाटाणे लवकर वाळतात. पूर्व प्रक्रिया म्हणून खाण्याचा सोडा, मॅग्नेशियम ऑक्साईड व पोटॅशियम मेटाबॉइसल्फाइड यांचे मिक्सर करून त्यात थोड्या वेळापूरते भिजवतात. त्यामुळे वाटण्याची साल मऊ होते. टेक्सचुअर चांगले येते .आणि नंतर वापरताना रिहायड्रेशन चांगले होते.
१२. बटाटे : 
   मोठ्या आकाराचे बटाटे घ्यावे. बटाट्यावर कोणताही रोग नसावा. कमीत कमी डोळे असणारे बटाटे पाण्यात चांगले धुवावेत. त्यांची साले काढून नंतर बटाटे पुन्हा धुवून घ्यावेत. हे बटाटे पाण्यात ठेवावेत म्हणजे त्यांना ब्राऊन रंग येत नाही. नंतर बटाट्याचा ०.५ सेंटीमीटर जाडीच्या चकत्या कराव्यात. या चकत्या पोटॅशियम मेटा बायसल्फाईडच्या पाण्यात ठेवाव्यात. म्हणजे नुकसान होत नाही. चकत्या ३ ते ५ मिनिटे उकळत्या पाण्यात ब्लॉच करून घ्याव्यात. नंतर ट्रेवर पसरून ठेवाव्यात. ६० ते ६२ अंश तापमानाला चकत्या ७ ते ८ तास सुकवाव्यात. वाळविण्याचे गुणोत्तर ७.१ पडते. वापरताना बटाट्याच्या ४ ते ५ पट पाणी वापरावे.
     बटाटा पावडरकरीता प्रथम बटाटे स्वच्छ पाण्याने धुऊन त्यांची साल काढून शिजवून घ्यावेत. व अशा शिजवलेल्या बटाट्याचा लगदा ड्रायरमध्ये वाळवून घ्यावा म्हणजे आपणास पावडर मिळेल. ही तयार झालेली पावडर चाळणीद्वारे चाळून घ्यावी. ही पावडर बेकरी व्यवसायात वापरता येते. संशोधनाद्वारे असे दिसून आले आहे की, बेकरी पदार्थात बटाट्याची पावडर २ ते ३ टक्केपर्यंत वापरली तर ते जास्त दिवस ताज्या स्थितीत राहू शकतात.

१३. भोपळा : 
   तयार झालेला भोपळा घ्यावा. त्याचे तुकडे करावेत म्हणजे साल काढता येईल. साल काढून टाकल्यावर भोपळ्याच्या ०.६ सेंटीमीटर जाडीच्या चकत्या कराव्यात. या चकत्या मिठाच्या पाण्यात १० मिनिटे बुडवाव्यात. नंतर २ टक्के मिठाच्या उकळत्या पाण्यात ३ ते ४ मिनिटे ब्लॉच कराव्यात. ६५ ते ७१ तापमानाला ६ ते ११ तास वाळवाव्यात. वाळविण्याचे गुणोत्तर २२.१ पडते.

१४.पालक : 
   पालकाची पाने चांगली धुवून घ्यावीत. ४ ते ५ मिनिटे वाफल्यावर ६३ ते ६८ अंश तापमानावर ७ ते ८ तास वाळवावेत. वाळविण्याचे गुणोत्तर २२:१ येते
१५. टोमॅटो : 
 पिकलेले टोमॅटो उकळत्या पाण्यात ३० ते ६० सेकंद ठेवल्याने त्याची साल सुटते. नंतर टोकदार चाकूने साल काढावे. साले काढलेली टोमॅटो कापून त्याच्या ०.६ सेंमी.च्या चकत्या कराव्यात. नंतर त्या चकत्या ६० ते ६५ अंश तापमानाला ९ ते १० तास वाळवाव्यात. वाळविण्याचे गुणोत्तर २७:१ पडते.

१६.कढीपत्ता,हिरव्या मिरच्या, मुळा : 
  यांचे सुद्धा निर्जलीकरण करता येते. त्यांचा उपयोग रेडी टू सर्व्ह अशा सूप पावडर बनवण्यासाठी करता येतो. हल्ली अशी वाळलेली सूप्स लोकप्रिय होत आहेत. बाजारात मॅगी,नोर अशा कंपन्यांची सूप्स ४०० रुपये किलोहून जास्त भावाने सहज विकली जातात तर शेतकऱ्यांना आपला माल फेकून देण्याची वेळ येते. हे चित्र बदलणे आपल्याच हातात आहे. आपण शेती नव्हे तर शेतात अन्न तयार केले पाहिजे. आपण शेतीमालाचे उत्पादक तसेच प्रक्रिया कारखानदार बनणे ही काळाची गरज आहे. आपणास तंत्रज्ञानाची गरज लागेल आणि यंत्रेसुद्धा लागतील आणि आपण प्रयोग करण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. 

Dehydration

१७. करटोली : 
  करटोली चिरून त्याचे काप करून घ्यावे नंतर स्वच्छ पाण्याने धुऊन उन्हात वाळवावेत. किंवा ट्रे ड्रायरमध्ये ६० ते ७० अंश सेल्सिअस तापमानास २२ ते २४ तास वाळवून घ्यावेत. वाळलेली करटोली मिक्सरमध्ये किंवा पल्वरायझरमध्ये दळून त्याची भुकटी तयार करावी. करटोलीची भुकटी ही औषधी असून त्याचा वापर हा बवासीर, किडनीस्टोन व अपचन यावरील उपचारात केला जातो.
          आपण शेतात अशाच जाती लावाव्यात. ज्या प्रक्रिया करण्यास सुयोग्य आहेत. आपण आपल्या शेतात, आपल्या गावात कुटीरोद्योग म्हणून, लघुउद्योग म्हणून प्रक्रिया केल्या पाहिजेत आणि जर आपली गुंतवणूक मोठी असेल तर आपणास परदेशी सहकार्याच्या देखील संधी आहेत. आपले भविष्य उज्वल करण्यासाठी आपणच पुढाकार घेतला पाहिजे. प्रक्रिया केलेल्या उत्पादनांना डिफेन्स, पंचतारांकित हॉटेल्स आणि शहरातील वेळ कमी असलेली कुटुंबे हे ग्राहक तयार आहेत. पूर्वीचे प्रयोग फसण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ब्लॉचिंग सारख्या प्रक्रिया न करण्यामुळे माल रंगात मार खातो. आपण योग्य तंत्रज्ञान वापरलेच पाहिजे.

Dehydration

१. टोमॅटो व वांगी वाळवताना काप काढून तेलात प्रथम कांदा परतून आले, लसूण, मिरची पेस्ट घालावी. त्यात वांगी किंवा टोमॅटोचे काप परतून एकजीव करावे. थोडेसे पाणी घालून, शिजवून हे मिश्रण कडक उन्हात प्लॅस्टिक शीटवर वाळवावे. त्याचीही सुरेख भाजी तयार होते.

२. याशिवाय हल्ली पाश्चात्य पाककृतीत वापरणारी टोमॅटो पावडर करण्यासाठी टोमॅटोच्या (कडक व लाल) फोडी करून बिया काढून वाळवले जातात मग पावडर करतात यामुळे पटकन पाककृतीत टोमॅटोचा वापर करता येतो. साले काढून टोमॅटो रसही वाळवून ठेवता येतो.

३. थंडीत गाजरे भरपूर प्रमाणात मिळतात. गाजरे स्वच्छ धुऊन, पुसून त्याचा कीस करावा. उन्हामध्ये वाळवावा. परत एकदा मायक्रोओव्हन किंवा सोलर कुकरमध्ये ठेवावा. म्हणजे छान कुरकुरीत होतो. नंतर काचेच्या बाटलीत भरावा. पाहिजे तेव्हा कोमट पाण्यात भिजवून निथळून वापरावा.

४. अगस्तीची फुले, भाजी, भजी करण्यासाठी वापरतात. त्याच्या देठाचे सांडगे छान करतात. आंबट दह्यात धने-जिरेपूड व मीठ घालून देठे बुडवून वाळवावे. पुन्हा दोन दिवसांनी तशीच दोन वेळा पुठे द्यावी कडक वाळवून तळून खातात.

५. गवारी वाळवून तिची भाजी केली जाते. दाण्याचे कूट, मिरची ठेचा, मीठ, तीळ लिंबूरसात गवार घोळवून वाळवली जाते. गावरान बारीक गवार वाळवून तळून छान लागते. भेंडी, मुळ्याची शेंग, कांदे कडक उन्हात वाळवून तळून खिचडी गरम भातासोबत खातात.

६. कस्तुरी मेथी जी हल्ली खूपशा ग्रेव्हीत वापरतात. ती घरी करता येते. मोठ्या पानाची मेथी स्वच्छ धुऊन फक्त पाने कडक उन्हात वाळवतात. डब्यात भरून ठेवावी. पराठे छोले किंवा पंजाबी ग्रेव्हीत वापरावी.

© दीपक केदू अहिरे, नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************

#भाजीपालानिर्जलीकरण #vegetable dehydration
#french beans #कोबी #कारली #वांगी #कॉलीफ्लॉवर #गाजरे #भेंडी #नवलकोल #कांदे #वाटाणे #बटाटा #भोपळा #पालक #Tomato #कढीपत्ता #हिरव्या मिरच्या #मुळा  #करटोली #गवारी

मायक्रोग्रीन शेती व्यवसाय | Microgreen Farming Business : कमी गुंतवणुकीत घरातून जास्त नफा

  🌱 मायक्रोग्रीन शेती व्यवसाय: कमी जागेत जास्त नफा देणारा आधुनिक उद्योग Microgreens Business in Marathi | कमी गुंतवणुकीत जास्त कमाई      ...